दिवसभरात कधीही भोंग्यांवरून बांग दिली तर हनुमान चालीसा वाजणारच, राज ठाकरेंचा इशारा

मुंबई तक

04 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:49 AM)

मुंबईत आज १ हजारांपेक्षा जास्त मशिदींनी बांग दिली नाही. मात्र १३५ मशिदींनी पहाटे पाचच्या आधी बांग दिली होती. त्यांच्यावर हे सरकार कारवाई करणार का? आणि काय कारवाई करणार असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विचारला आहे. आमचं आंदोलन अद्याप संपलेलं नाही. पहाटेच नाही तर दिवसभरात कधीही बांग दिली तरीही हनुमान चालीसा लावणारच असा इशाराही राज […]

Mumbaitak
follow google news

मुंबईत आज १ हजारांपेक्षा जास्त मशिदींनी बांग दिली नाही. मात्र १३५ मशिदींनी पहाटे पाचच्या आधी बांग दिली होती. त्यांच्यावर हे सरकार कारवाई करणार का? आणि काय कारवाई करणार असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विचारला आहे. आमचं आंदोलन अद्याप संपलेलं नाही. पहाटेच नाही तर दिवसभरात कधीही बांग दिली तरीही हनुमान चालीसा लावणारच असा इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे.

हे वाचलं का?

आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आंदोलनाची पुढची भूमिका स्पष्ट केली. मुंबईतल्या १३५ मशिदींवर काय कारवाई करणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर राज ठाकरे म्हणाले की आमचं आंदोलन अद्याप संपलेलं नाही. जर दिवसभरातल्या कोणत्याही वेळी बांग दिली गेली तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा वाजवली जाणारच लक्षात ठेवा असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे. हा विषय एक दिवसाचा नाही. ४ मे संपल्यावर आंदोलन संपलं असं नाही हे रोज सुरू राहणार आहे असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

शरद पवारांना हिंदू शब्दाची अ‍ॅलर्जी, औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे बरसले

आज मुंबईतल्या १००५ मशिदींनी सकाळची अजानच लावली नाही त्यांना आम्ही काय विषय मांडत होतो तो त्यांना समजला त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. तसंच कुणीही हे समजू नये की आजचा विषय संपला म्हणजे भोंग्यांचा विषय संपला असं मुळीच नाही असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. यानंतरही सुप्रीम कोर्टाने दिलेल्या मर्यादा पाळून ४५ ते ५५ डेसिबल (घरातल्या मिक्सरचा आवाज) जर अजान दिली तर आमचं काही म्हणणं नाही. कारवाई आमच्यावर केली जाते आहे. धरपकड आमच्या कार्यकर्त्यांची केली जाते आहे. आमच्यावरच कारवाई का? असाही प्रश्न राज ठाकरेंनी विचारला आहे.

महाराष्ट्रातल्या हिंदू बांधवांनाही मी आवाहन करतो आहे की हा विषय एक दिवस झाला आणि संपला असं नाही. अनधिकृत भोंगे खाली उतरवले गेलेच पाहिजेत. तसंच रोज लक्ष ठेवावं लागेलच. दिवसाच्या कोणत्याही प्रहरी अजान लागली तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावली गेलीच पाहिजे असंही राज ठाकरेंनी सांगितलं. हा विषय अजिबात धार्मिक नाही. पण तुम्ही जर तुमच्या धर्माला चिकटून राहणार असाल तर आम्हीही आमच्या धर्माला घट्ट चिकटून आहोत हे दाखवून देऊ असंही राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

एवढंच नाही तर राज ठाकरे पुढे म्हणाले की माझ्या माहितीनुसार अनेक मशिदी या अनधिकृत आहेत मग त्यांना पोलीस अधिकृतरित्या परवानगी कशी देतात? तसंच आम्ही जर संमती मागितली तर एक दिवसाची, दहा दिवसांची संमती दिली जाते मग ३६५ दिवसांची संमती यांना कशी मिळते? असेही प्रश्न राज यांनी विचारले आहेत.

    follow whatsapp