नितेश राणेंच्या निलंबनाची मागणी करत सभागृहात घोषणाबाजी, आदित्य ठाकरेंना ‘म्याव म्याव’ चिडवणं भोवणार?

मुंबई तक

• 07:47 AM • 27 Dec 2021

राज्य सरकारचं अधिवेशन आणि वाद हे समीकरण काही नवं नाही. आज पुन्हा एकदा अधिवेशनात वादाचा अंक पाहण्यास मिळाला. याचं कारण होतं भाजप आमदार नितेश राणे यांच्या निलंबनाची मागणी. दोन दिवसांपूर्वी नितेश राणे आणि भाजपचे आमदार विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करत असताना आदित्य ठाकरे सभागृहात आले. त्यावेळी नितेश राणे यांनी म्याव म्याव असा आवाज काढत आदित्य ठाकरेंना […]

Mumbaitak
follow google news

राज्य सरकारचं अधिवेशन आणि वाद हे समीकरण काही नवं नाही. आज पुन्हा एकदा अधिवेशनात वादाचा अंक पाहण्यास मिळाला. याचं कारण होतं भाजप आमदार नितेश राणे यांच्या निलंबनाची मागणी. दोन दिवसांपूर्वी नितेश राणे आणि भाजपचे आमदार विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन करत असताना आदित्य ठाकरे सभागृहात आले. त्यावेळी नितेश राणे यांनी म्याव म्याव असा आवाज काढत आदित्य ठाकरेंना चिडवलं. मात्र आदित्य ठाकरे त्यावर दुर्लक्ष करून निघून गेले. मात्र हाच मुद्दा आज सभागृहात गाजतो आहे.

हे वाचलं का?

शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्यासह सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांनी नितेश राणेंच्या निलंबनाची मागणी केली आहे. आमदार भास्कर जाधव यांनी नितेश राणे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत त्यांना निलंबित करावं असं म्हटलं आहे. सभागृहाची प्रथा, परंपरा आणि प्रतिष्ठा राखण्यासाठीचा विषय आता पुन्हा एकदा आज सभागृहात याच निमित्ताने चर्चेला आला. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मी अंगविक्षेप करून मोदींची नक्कल केल्याप्रकरणी मला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागायला लावली होती. मी माफीही मागितली. आता नितेश राणे यांनी केलेलं वर्तन हे सभागृहाची परंपरा राखणारं आहे का? असा सवाल भास्कर जाधव यांनी केला आहे.

‘बाळासाहेबांमुळेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान, नाहीतर…’ भास्कर जाधव यांची भाजपवर घणाघाती टीका

12 आमदारांच्या निलंबनांतर नितेश राणेंनी माझ्याबाबतीत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. नेत्यांचा वारंवार अपमान होत आहे असा आरोपही भास्कर जाधव यांनी केला. “चंद्रकांत पाटलांची घोषणा होती आहे तसा घेऊ आणि पाहिजे तसा घडवू. तुम्ही त्यांना घडवले की तुम्हाला त्यांनी घडवले हे सांगण्याची गरज आहे. त्याचवेळी त्यांनी थांबवायला पाहिजे होते. त्यांनी थांबवले नाही म्हणून काळ सोकावला आहे. अशा सदस्याला कायमस्वरुपी निलंबित करा अशी माझी मागणी आहे,” असे भास्कर जाधव म्हणाले.

भास्कर जाधव यांच्या मागणीनंतर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नितेश राणे यांना निलंबित करा अन्यथा त्यांनी सभागृहात येऊन हात जोडून माफी मागायला सांगा अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली.

अधिवेशनात आदित्य ठाकरेंची एंट्री, नितेश राणेंनी म्यॉव म्यॉव आवाज काढत डिवचलं

नेमका वाद काय होता?

शिवसेनेचे पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य ठाकरे हे 23 डिसेंबर रोजी जेव्हा अधिवेशनासाठी विधानसभेत आले होते तेव्हा भाजपचे आमदार पायऱ्यांवर आंदोलन करत होते. त्याचवेळे आदित्य ठाकरेंना पाहून नितेश राणे यांनी ‘म्यॉव, म्यॉव’ असा आवाज काढून आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली.

आदित्य ठाकरे सभागृहाकडे त्याच पायऱ्यांवरून जात होते जिथे विरोधी आमदार निदर्शने करत होते. ‘आम्ही तिघे भाऊ भाऊ, सगळा माल वाटून खाऊ’ अशा घोषणा भाजपचे आमदार पायऱ्यांवर बसून देत होते. अशातच नितेश राणे यांची नजर आदित्य ठाकरेंवर पडली. आदित्य ठाकरे यांना पाहून नितेश राणेंनी ‘म्याव म्याव’ असा मांजरीचा आवाज काढायला सुरुवात केली. पण आदित्य ठाकरेंनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आणि ते विधिमंडळात दाखल झाले.

    follow whatsapp