मिलिंद नार्वेकर पोहचले टेंभी नाक्यावर : आनंद दिघेंनी सुरु केलेल्या नवरात्रौत्सवाला हजेरी

मुंबई तक

• 06:11 AM • 29 Sep 2022

ठाणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी बुधवारी रात्री उशिरा ठाण्यातील टेंभी नाक्यावर जाऊन धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या ‘जय दुर्गेश्वरी’ उत्सवाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी आनंद दिघे यांचे आणि जय आंबेचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी जाऊन देवीचे दर्शन […]

Mumbaitak
follow google news

ठाणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी बुधवारी रात्री उशिरा ठाण्यातील टेंभी नाक्यावर जाऊन धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या ‘जय दुर्गेश्वरी’ उत्सवाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी आनंद दिघे यांचे आणि जय आंबेचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी जाऊन देवीचे दर्शन घेतले.

हे वाचलं का?

रश्मी ठाकरेही राहणार उपस्थित :

दरम्यान, गुरुवारी उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे या देखील टेंभी नाक्यावरील उत्सवाला हजेरी लावणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये देवीच्या महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. या महाआरतीला ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी-शिवसैनिक उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी या उत्सवाला ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनीही उपस्थिती लावली आहे.

ठाण्यातला उत्सव आनंद दिघेंनी केला सुरू

टेंभी नाका परिसरात ४४ वर्षांपूर्वी आनंद दिघे यांनी नवरात्र उत्सव सुरू केला होता. त्यांच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांनी हा वारसा पुढे सुरू ठेवला. यंदा त्यांच्या बंडानंतरचा हा पहिलाच उत्सव आहे. दरम्यान या देवीच्या दर्शनासाठी रश्मी ठाकरे जाणार असल्याचे वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गर्दी गोळा करण्यासाठी मुंबईतून महिला आणल्या जातील : शितल म्हात्रे

या उत्सवाला रश्मी ठाकरे हजेरी लावणार असल्याने गर्दी गोळा करण्यासाठी मुंबईतून महिला आणल्या जातील असा आरोप शिंदे गटाने व्यक्त केला आहे. शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी रश्मी ठाकरेंच्या ठाण्यातील या दौऱ्यासंर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना या दौऱ्या निमित्ताने गर्दी जमवण्याचा प्रयत्न ‘शिल्लक सेने’कडून केला जाईल असे म्हटले आहे.

म्हात्रे यांनी टि्वटमध्ये म्हटले की, पहिल्यांदा रश्मी वहिनी ठाण्याला जात आहेत. त्यामुळे महिला कमी पडताय किंवा गर्दी करावी या दृष्टीने ते महिलांना ठाण्याला जायला सांगताय. मुंबईतल्या माहिला ठाण्याला जाणार वहिनींसाठी तर मला वाटतं हे फारच केविलवाणं आहे,” अशी टीका त्यांनी केली आहे. याला रश्मी ठाकरे काय उत्तर देणार हे आज सांयकाळी कळेल.

    follow whatsapp