सातारच्या दोन ज्येष्ठ नागरिकांनी केलं असं काम की, तुम्हीही कराल कौतुक

इम्तियाज मुजावर

• 01:50 PM • 19 Jul 2022

साताऱ्यातील दोन मांझींनी रस्त्यावरील भली मोठी दरड हटवून पर्यटकांसाठी रस्ता मोकळा केला. दोघांनीही वयाची पन्नाशी गाठली असली, तरी त्यांनी तरुणांना लाजवेल अशी कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागांमध्ये गेले काही दिवस जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भाग हा अतिदुर्गम समजला […]

Mumbaitak
follow google news

साताऱ्यातील दोन मांझींनी रस्त्यावरील भली मोठी दरड हटवून पर्यटकांसाठी रस्ता मोकळा केला. दोघांनीही वयाची पन्नाशी गाठली असली, तरी त्यांनी तरुणांना लाजवेल अशी कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांचं मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागांमध्ये गेले काही दिवस जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे ठिकठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भाग हा अतिदुर्गम समजला जातो.

हे वाचलं का?

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या ठिकाणी दळणवळण कठीण होऊन बसतं. सतत पडणाऱ्या जोरदार पावसाने रस्त्यावर दरडी कोसळून रस्ते बंद होतात. यामुळे याठिकाणच्या लोकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. अशाच एकासमस्येला भांबवली गावातील लोकांना सामोरं जावं लागलं. कास शेजारील भांबवली गावाकडे जाणाऱ्या रस्त्यात काही दिवसांपूर्वी दरड कोसळली होती. त्यामुळे भांबवली गाव आणि वज्राई धबधब्याकडे जाणारा रस्ता पुर्णपणे बंद झाला होता म्हणून ग्रामस्थ आणि पर्यटकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत होतं.

ही समस्या लक्षात घेऊन प्रशासनाच्या यंत्रणेची वाट न पाहता दोन स्थानिक ज्येष्ठ समाजसेवकांनी पुढाकार घेत दरड हटवून पर्यटकांना रस्ता मोकळा केला. चंद्रकांत मोरे (वय 65), तर बळीराम सपकाळ (वय 50) असं या ज्येष्ठ मंडळींचं नाव आहे. भर पावसात प्रचंड मेहनत घेऊन केलेल्या या कामाबद्दल पर्यटक आणि स्थानिक ग्रामस्थ त्यांचं कौतुक करतआहेत.

भांबवली-वज्राई धबधबा सातारा जिल्ह्यातील महत्त्वाचं पर्यटन स्थळ

भांबवली- वज्राई धबधबा हा भारतातील तीन टप्प्यात कोसळणारा सर्वात उंच धबधबा असल्यामुळे या ठिकाणी भेट देण्यासाठी पर्यटक पुणे, मुंबई अशा लांबच्या जिल्ह्यातून हजेरी लावत असतात. मात्र रस्ता बंद असल्यामुळे अनेक पर्यटकांना निराश होऊन माघारी जावं लागत होतं. मात्र मोरे आणि सपकाळ यांनी पुढे येऊन रस्ता मोकळा केल्यानेपर्यटकांना निसर्गाचा आस्वाद घेता येत आहे.

दरवर्षी पावसामुळे धबधब्याकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दरड कोसळण्याचे प्रकार घडत असतात. म्हणून प्रशासनाने लक्ष घालून कायमस्वरुपी यावर तोडगा काढावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटकांकडून होत आहे.

    follow whatsapp