उजनीच्या पाण्यावरुन संघर्ष कायम, इंदापुरात आंदोलनाला सुरुवात

उजनी धरणाच्या पाणीवाटपावरुन निर्माण झालेला संघर्ष अजुनही शांत होण्याचं नाव घेत नाहीये. उजनी धरणातलं ५ टीएमसी पाणी इंदापुरातील गावांना वळवण्याच्या पालकमंत्री दत्ता भरणेंच्या निर्णयाला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्थगिती दिली. सोलापुरात या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं असलं तरीही इंदापुरात आता या निर्णयाविरोधात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. उजनीच्या पाण्यावरुन महाविकास आघाडीत ठिणगी, शिवसेना आमदाराची शरद […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:26 AM • 19 May 2021

follow google news

उजनी धरणाच्या पाणीवाटपावरुन निर्माण झालेला संघर्ष अजुनही शांत होण्याचं नाव घेत नाहीये. उजनी धरणातलं ५ टीएमसी पाणी इंदापुरातील गावांना वळवण्याच्या पालकमंत्री दत्ता भरणेंच्या निर्णयाला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी स्थगिती दिली. सोलापुरात या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं असलं तरीही इंदापुरात आता या निर्णयाविरोधात आंदोलनाला सुरुवात झाली आहे.

हे वाचलं का?

उजनीच्या पाण्यावरुन महाविकास आघाडीत ठिणगी, शिवसेना आमदाराची शरद पवारांवर घणाघाती टीका

इंदापुरातील काही शेतकऱ्यांनी आज पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर येऊन झाडाच्या फांद्या आणि टायर जाळत जयंत पाटलांच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे उजनीच्या पाणीवाटपावरुन राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था कोंडीत अडकल्यासारखी झाली आहे. इंदापुरात आज झालेल्या आंदोलनात आरपीआयच्या कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी सहभाग घेत जयंत पाटलांच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी केली.

काय आहे वादाचा मुद्दा??

२२ एप्रिल रोजी सोलापूरचे पालकमंत्री यांनी उजनी धरणातून ५ टीएमसी पाणी इंदापुरच्या २२ गावांसाठी वळवण्याच्या निर्णयाला मान्यता मिळवली. इंदापूरच्या २२ गावांसाठी पुण्यावरुन येणारं पाणी हे उजनी धरणात साठवलं जातं, यातील ५ टीएमसी पाणी हे २२ गावांना देण्यात येणार होतं.

परंतू या निर्णयाला सोलापुरातील पुढाऱ्यांनी विरोध दर्शवला. सोलापुरात निर्णयाला होणारा विरोध पाहता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दत्ता भरणेंच्या निर्णयाला स्थगिती दिली. परंतू याच स्थगितीच्या निर्णयामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटला फेकलं गेलंय. इंदापुरात आज या निर्णयाविरोधात आंदोलनं झाली ज्यात एका कार्यकर्त्याने आत्मदहनाचाही प्रयत्न केला.

दुसरीकडे पंढरपुरात आज उजनी धरणातून पाणीवाटपाच्या निर्णयाला स्थगिती मिळाल्यानंतर संघर्ष समितीने विठ्ठलाच्या मुर्तीला जलाभिषेक करुन आपला आनंद साजरा केला. परंतू इंदापुरात होणारा विरोध पाहता येणाऱ्या काळात उजनीचं पाणी सरकारला चांगलंच अडचणीत आणणार असं दिसतंय.