कोळशाच्या कमतरतेमुळे देशावर वीज संकट? जाणून घ्या केंद्र सरकार काय म्हणतंय…

मुंबई तक

• 04:09 PM • 10 Oct 2021

महाराष्ट्रासह देशातील प्रमुख राज्यांमध्ये कोळशाच्या कमतरतेमुळे वीजेचं संकट येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. परंतू केंद्र सरकारने या सर्व वीज संकटाच्या चर्चा निराधार असल्याचं म्हटलं आहे. कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा खंडीत होण्याची शक्यता नसल्याचंही केंद्र सरकारने म्हटलं आहे. संसदीय कार्य आणि कोळसा-खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करुन देशवासियांना वीजपुरवठा खंडीत होणार नाही […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्रासह देशातील प्रमुख राज्यांमध्ये कोळशाच्या कमतरतेमुळे वीजेचं संकट येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. परंतू केंद्र सरकारने या सर्व वीज संकटाच्या चर्चा निराधार असल्याचं म्हटलं आहे. कोणत्याही परिस्थितीत वीज पुरवठा खंडीत होण्याची शक्यता नसल्याचंही केंद्र सरकारने म्हटलं आहे.

हे वाचलं का?

संसदीय कार्य आणि कोळसा-खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ट्विट करुन देशवासियांना वीजपुरवठा खंडीत होणार नाही असं आश्वासन दिलं आहे. “देशातील कोळसा उत्पादन आणि पुरवठा परिस्थितीचा आढावा घेतला. मी सर्व देशवासियांना आश्वासन देतो की देशात वीज पुरवठा खंडित होण्याचा कोणताही धोका नाही. कोल इंडिया लिमिटेडकडे 24 दिवसांची कोळशाची मागणी पूर्ण करण्यासाठी 43 दशलक्ष टन कोळसासाठा उपलब्ध आहे.”

आपल्या ट्विटमध्ये देशवासियांना आश्वासन देताना प्रल्हाद जोशी म्हणाले, “औष्णिक ऊर्जा प्रकल्पांचा कोळसासाठा दररोज कोळसा पुरवठा करून वाढविला जात आहे. मान्सूनच्या परतीसोबत कोळसा पाठवण्यामध्ये आणखी वाढ होईल, ज्यामुळे कोळशाचा साठा वाढेल. देशात पुरेसा कोळसा साठा आहे हे मी पुन्हा एकदा सांगतो. भीती निर्माण करणाऱ्या कोणत्याही अफवांनी फसवू नका.”

ऐन सणासुदीच्या काळात महाराष्ट्रावर लोडशेडिंगचं संकट?; वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच बंद

केंद्रीय उर्जामंत्री आर.के.सिंग यांनीही वीज खंडीत होण्याच्या बातम्यांवर स्पष्टीकरण दिलं आहे. “दिल्लीला आवश्यक तितकी वीज मिळत आहे आणि ती मिळत राहील. केवळ दिल्लीच नाही तर देशातील सर्व वीज केंद्रांना गरजेनुसार गॅस मिळत राहील.”

आजच्या तारखेला 4 दिवसांपेक्षा जास्त स्टॉक आहे. काल 1.8 दशलक्ष टनापेक्षा जास्त साठा होता. सध्या 4 दिवसांचा स्टॉक असून हळूहळू वाढत आहे. पूर्वीप्रमाणे, जरी 17 दिवसांचा साठा नसला तरी 4 दिवसांपेक्षा जास्त आहे आणि येत्या काही दिवसांत तो अधिक चांगला होईल. आम्ही आयात थोडी कमी केली आहे. उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी काम केले जात आहे.

महाराष्ट्रात महावितरणने ग्राहकांना वीजेचा वापर जबाबदारीने करण्याचं आवाहन केलं आहे. कोळशाच्या टंचाईमुळे महावितरणला वीजपुरवठा करणाऱ्या विविध औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांतील १३ संच सद्यस्थितीत बंद पडले आहेत. त्यामुळे तब्बल ३३३० मेगावॅट विजेचा पुरवठा ठप्प पडला आहे. विजेची ही तूट भरून काढण्यासाठी तातडीच्या वीजखरेदीसह जलविद्युत व अन्य स्त्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरु आहे. राज्यात विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून शर्थीचे प्रयत्न सुरु असून वीजग्राहकांनी मागणी व उपलब्धता यामध्ये समतोल राखण्यासाठी सकाळी ६ ते १० व सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत विजेचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

    follow whatsapp