Baramati Lok Sabha : रोहित पवारांच्या अश्रूंचा फुटला बांध, शरद पवारांकडे बघत म्हणाले, 'पुन्हा असं बोलू नका'

मुंबई तक

05 May 2024 (अपडेटेड: 05 May 2024, 05:51 PM)

Rohit Pawar Speech : बारामतीतील शेवटच्या प्रचार सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांनी शरद पवारांना पुन्हा असं न बोलण्याचे आवाहन केले.

रोहित पवारांना अश्रू अनावर का झाले?

बारामतीच्या सभेत रोहित पवार रडले.

follow google news

Baramati Lok Sabha election 2024 : (वसंत मोरे, बारामती) बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ शरद पवारांची शेवटची सभा झाली. यासभेत भाषण करताना रोहित पवारांना अश्रू अनावर झाले. यावेळी रोहित पवारांनी शरद पवारांना असं बोलू नका अशी विनंती केली. नेमकं काय घडलं, जाणून घ्या. (Rohit Pawar cried while speaking in Baramati)

हे वाचलं का?

सभेत एक व्हिडीओ दाखवण्यात आला. ज्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मटकी फोडताना दिसत आहे. हा व्हिडीओ दाखवून रोहित पवार म्हणाले, "मलिदा गँगचा सदस्य. काय केलं, तर मटका फोडला. मटका कधी फोडला जातो? अहो, जेव्हा पक्ष फुटला. मी आणि काही पदाधिकारी साहेबांसोबत बसलो होतो. चर्चा करत होतो. साहेब टीव्हीकडे बघत होते. त्यांनी चेहऱ्यावर नाही दाखवलं. आम्ही त्यांना प्रश्न विचारले. बाहेर जाण्यापूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं की, अजिबात काळजी करू नका."

रोहित पवारांना अश्रू का अनावर झाले?

"आपल्याला स्वाभिमानी महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यासाठी आपल्याला नवी पिढी तयार करायची आहे. ताकद द्यायची आहे. जोपर्यंत नवी पिढी ही जबाबदारी घेत नाही, जबाबदारी घेण्यासाठी तयार होत नाही, तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही. असे शरद पवारांचे शब्द होते", असे बोलताच रोहित पवार रडायला लागले.

हेही वाचा >> रावसाहेब दानवेंना अर्जून खोतकरांची साथ का हवीये? 

"साहेब, मी तुम्हाला विनंती करतो, हे जे वक्तव्य तुम्ही केलं, ते कृपया पुन्हा करू नका. तुम्ही आमचा जीव आहात. तुम्ही आमचा आत्मा आहात. जे लोक तुम्हाला त्रास देतात. मोठे नेते कितीही असले आणि काही ते बोलले तरी सर्वसामान्य कार्यकर्ते आणि अख्खं कुटुंब तुमच्याबरोबर आहे", असे रोहित पवार म्हणाले. 

"होय, शरद पवार आत्मा, कारण..." अमोल कोल्हे काय बोलले?

अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान मोदींच्या टीकेला उत्तर दिले. ते म्हणाले, "पंतप्रधान येऊन गेले. पंतप्रधानांनी शरद पवारांचा उल्लेख अस्वस्थ आत्मा म्हणून केला. भटकती आत्मा म्हणून उल्लेख केला. आज अभिमानाने पंतप्रधानांना नम्रपणे सांगू ईच्छितो की, होय, शरदचंद्र पवार महाराष्ट्राचा आत्मा आहे. होय, पवारसाहेब युवकांचा आत्मसन्मान आहेत. होय, पवार साहेब ज्या माताभगिनींना ३३ टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण दिलं. ११ टक्के संरक्षण दलात आरक्षण दिलं. त्या प्रत्येक माताभगिनीचा आत्माभिमान आहेत. आणि कदाचित पंतप्रधानांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी... कारण असं आहे की, भगवद्गगीतेतील एक श्लोक ते पवारसाहेबांना आत्मा म्हणताना विसरून गेले."

हेही वाचा >> "जयंत पाटलांनी ठाकरेंना सांगितलं की...", शेट्टींचा मोठा गौप्यस्फोट 

"भगवद्गगीतेत लिहिलंय की, आत्मा तो आहे, ज्याला शस्त्राने भेदता येत नाही. ज्याला अग्नीने जाळता येत नाही. ज्याला पाण्याने विझवता येत नाही. भिजवता येत नाही. वाऱ्याने सुकवता येत नाही आणि हा आत्मा महाराष्ट्राचा आत्मा. त्याच्या आत्मसन्मानासाठी उद्या महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी, प्रत्येक कष्टकरी, प्रत्येक युवक आणि प्रत्येक महिला ही जिवाची बाजी लावल्याशिवाय राहणार नाही. कारण हा महाराष्ट्राचा आत्मा गेली ५५ वर्ष अव्याहतपणे, या महाराष्ट्राच्या, हिंदुस्थानच्या आत्मसन्मानासाठी झटतोय", असे अमोल कोल्हे म्हणाले. 

    follow whatsapp