Virat-Rohit मधला अंतर्गत वाद कॅप्टन्सी सोडण्यासाठी कारणीभूत? कोहलीच्या ‘त्या’ मागणीवर BCCI नाराज

मुंबई तक

• 05:35 AM • 17 Sep 2021

विराट कोहलीने टी-२० संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली. गुरुवारी संध्याकाळी विराटने आपण टी-२० विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडण्याचं जाहीर केलं. वर्कलोड मॅनेजमेंटचं कारण देत विराटने यापुढे फक्त वन-डे आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं सांगितलं. परंतू विराटच्या या निर्णयामागे रोहित-विराटमधला अंतर्गत वाद कारणीभूत असल्याचं बोललं जातंय. विराटने अचानक जाहीर […]

Mumbaitak
follow google news

विराट कोहलीने टी-२० संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली. गुरुवारी संध्याकाळी विराटने आपण टी-२० विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडण्याचं जाहीर केलं. वर्कलोड मॅनेजमेंटचं कारण देत विराटने यापुढे फक्त वन-डे आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं सांगितलं.

हे वाचलं का?

परंतू विराटच्या या निर्णयामागे रोहित-विराटमधला अंतर्गत वाद कारणीभूत असल्याचं बोललं जातंय. विराटने अचानक जाहीर केलेल्या निवृत्तीच्या निर्णयाआधी पडद्यामागे काही हालचाली घडल्या ज्यामुळे बीसीसीआय विराटवर नाराज असल्याचं बोललं जातंय.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहलीने रोहित शर्माला वन-डे आणि टी-२० संघाच्या उप-कर्णधार पदावरुन हटवावं यासाठी निवड समितीशी चर्चा केल्याचं कळतंय. रोहित शर्माचं वय आता ३४ असल्यामुळे विराटला वन-डे संघासाठी लोकेश राहुल तर टी-२० संघासाठी ऋषभ पंत हा उप-कर्णधार हवा होता. BCCI ने यावर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रीया दिलेली नसली तरीही विराटच्या या मागणीवर संघटनेतील काही अधिकारी नाराज झाल्याचं समोर येतंय.

बीसीसीआयमधील एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, “जर भारतीय संघाने टी-२० विश्वचषकात चांगली कामगिरी केली नाही तर आपलं कर्णधारपद जाणार आहे याची विराटला कल्पना आलेली होती. यामुळेच त्याने स्वतःवरचं दडपण थोडसं कमी केलं, यापुढे तो टी-२० संघात एक खेळाडू म्हणून असेल. विराट कोहली जर टी-२० स्पर्धेत कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करत नसेल तर वन-डे मधून त्याच्याकडून अपेक्षा कशी करता येईल?”

याआधीही विराट आणि रोहित शर्मामधल्या अंतर्गत वादाचा मुद्दा समोर आला होता. २०१९ विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भारतीय संघातले वाद उफाळून समोर आले होते. यानंतरच्या वेस्ट इंडिज दौऱ्यात पत्रकारांनी विराटला या वादाबद्दल प्रश्न विचारला होता, परंतू त्यावेळी विराटने असा कोणताही वाद नसल्याचं सांगितलं.

भारताच्या एका माजी क्रिकेटपटूनेही पीटीआयशी बोलत असताना विराटच्या कर्णधारपदाच्या शैलीवर टीका केली आहे. “कर्णधार म्हणून विराटचा सर्वात मोठा अवगूण असेल तर तो म्हणजे संवादाचा अभाव. महेंद्रसिंह धोनी संघाचा कर्णधार असताना त्याची रुम खेळाडूंसाठी सदैव उघडी असायची. खेळाडू त्याच्या रुममध्ये जाऊन गेम खेळायचे, जेवायचे, आपले प्रॉब्लेम सांगायचे. मैदानाबाहेर विराट कोहली असा संवाद साधत नाही. याउलट रोहितमध्ये मला धोनीची झलक दिसते. आपल्या ज्युनिअर खेळाडूंना शाबासकी देणं, त्यांना प्रोत्साहन देणं, जेवणासाठी बाहेर घेऊन जाणं, खडतर काळात त्यांच्या पाठीशी राहणं ही काम रोहित चांगल्या पद्धतीने करतो.”

टी-२० क्रिकेटमध्ये कोण असेल Virat Kohli चा उत्तराधिकारी? दोन खेळाडूंची नाव चर्चेत

सध्याच्या घडीला विराटच्या राजीनाम्यानंतर रोहित शर्मा आणि लोकेश राहुल हे दोन खेळाडू टी-२० संघाचा कर्णधार होण्यासाठी आघाडीवर आहेत. याव्यतिरीक्त बीसीसीआय ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह या खेळाडूंचा विचार उप-कर्णधारपदाच्या जागेसाठी करु शकतं.

कर्णधारपद सोडण्याच्या Virat Kohli च्या निर्णयावर Jay Shah म्हणतात…

    follow whatsapp