Maharashtra : अहमदनगरमध्ये हिंसेचा भडका! दगडफेक, गाड्या जाळल्या, दोन गटात प्रचंड राडा
Ahmednagar violence News : छत्रपती संभाजीनगरनंतर अहमदनगर शहरात हिंसेचा भडका उडाला असून, दोन गटात झालेल्या राड्यात 6 जण जखमी झाले आहेत.
ADVERTISEMENT

बिहार, पश्चिम बंगालमध्ये हिंसक घटनांनी शांततेला तडे गेलेले असतानाच आता महाराष्ट्रात सलग दुसऱ्या आठवड्यात हिंसेचा भडका उडाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला लागून असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात दोन गटात मोठा राडा झाला. झेंडा लावण्यावरून सुरू झालेला वाद विकोपाला गेला आणि जाळपोळ आणि दगडफेकीपर्यंत हा वाद चिघळला. या घटनेत 6 जण जखमी झाले आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर महामार्गावरवरील वारूळवाडीतील गजराज नगरमध्ये मंगळवारी रात्री दोन गट भिडले. झेंडा लावण्यावरून वाद सुरू झाला आणि त्यानंतर दोन्ही गटातील लोक आमने-सामने आले.
संबंधित बातमी – छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा, नेमकं काय घडलं?
झेंडा लावण्यावरून सुरू झालेला वाद मारहाणीपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर लाठ्या आणि लोखंडी रॉडने दोन्ही गटातील तरुण एकमेकांवर तुटून पडले. मारहाणीनंतर काही समाजकंटकांनी परिसरातील वाहनांना लक्ष्य केलं. गाड्याची तोडफोड करत आग लावण्यात आली.
अहमदनगरमध्ये हिंसा : परिसरात मोठा बंदोबस्त
मंगळवारी (4 एप्रिल) रात्री 8.30 ते 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. समाजकंटकांनी दोन मोटारसायकली जाळल्या, तर चारचाकी वाहनांची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी परिसरात धाव घेतली.
