Lok Sabha Election 2024: पवारांचा मल्ल.. शशिकांत शिंदेंना हलक्यात घेणं उदयनराजेंना जाणार जड?

निलेश झालटे

ADVERTISEMENT

शशिकांत शिंदे उदयनराजेंना पडणार भारी?
शशिकांत शिंदे उदयनराजेंना पडणार भारी?
social share
google news

सातारा: ज्या ठिकाणच्या लोकसभा पोटनिवडणुकीमुळं महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवेळी वातावरण फिरलं आणि सिटींग खासदार असलेल्या उदयनराजेंना पराभवाचा सामना करावा लागला, त्या सातारा लोकसभा मतदारसंघाकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून आहे. एकीकडे उदयनराजेंचं नाव युतीकडून फिक्स मानलं जात असताना अद्याप जाहीर मात्र होत नाही. अशात राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. आमदार शशिकांत शिंदे हे साताऱ्याच्या मैदानात शड्डू ठोकणार आहेत. 

महायुतीकडूनही उमेदवाराची घोषणा करण्यात आली नसली, तरी खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जवळपास निश्चिीत मानली जात आहे. म्हणजे उदयनराजेंनी अनेकदा स्वत:च्या उमेदवारीबाबत घोषणा केली आहे, त्यामुळं आता उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे असा सामना साताऱ्यात रंगणार हे ठरलं आहे.. आता हा सामना नक्की कसा असणार? शशिकांत शिंदे उदयनराजेंना कशी फाईट देणार? शशिकांत शिंदेंची बलस्थानं नक्की कोणती आहेत हेच आपण जाणून घेऊयात... 

शशिकांत शिंदे यांचं गाव तसं तर साताऱ्यातल्या जावळी तालुक्यातलं हुमगाव. वडील माथाडी कामगार असल्यामुळं लहानपणापासून ते मुंबईत राहिले. आण्णासाहेब पाटील यांच्याशी त्यांच्या वडीलांचा अत्यंत जवळचा संबंध होता. बीकॉमपर्यंतंचं शिक्षण घेतलेले शशिकांत शिंदे हे माथाडी बोर्डात क्लार्क म्हणून नोकरीला लागले. माथाडी कामगार आंदोलन, चळवळी त्यांनी लहानपणापासूनच पाहिलेल्या. याच माथाडी कामगार चळवळीत शिवाजीराव पाटील हे आण्णासाहेब पाटील यांच्यानंतर माथाडी संघटनेची धुरा हाती घेतली होती. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शिवाजीराव पाटील आणि बाबूराव रामिष्टे यांच्यात इथं जोरदार संघर्ष झाला. यावेळी शशिकांत शिंदेंनी महत्त्वाची आणि आक्रमक भूमिका घेतली. आणि शिवाजीरावांच्या गटाचा विजय झाला आणि इथेच शशिकांत शिंदे हे नेतृत्व उदयास आलं. यानंतर त्यांना संघटनेची जबाबदारी देण्यात आली. त्यानंतरची वेगवेगळी आंदोलनं आणि कामगाऱांच्या लढ्यात शशिकांत शिंदे आघाडीवर दिसून आले आणि चर्चेत आले. 

शशिकांत शिंदे सुरुवातीपासूनच शरद पवारांच्या जवळचे. 1999 ला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. यावेळी जावळी तालुक्यात तत्कालीन शिवसेनेचे आमदार सदाशिव सपकाळ यांच्याविरोधात राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नव्हता. त्यावेळी शिवाजीराव पाटील यांच्याशी पवारांचं बोलणं झालं आणि तिथे शशिकांत शिंदेंचं नाव पुढं आलं. अचानक आणि अनपेक्षितपणे शशिकांत शिंदेंना उमेदवारी देण्यात आली. यावेळी तशी त्यांची जावळीशी जवळीकही नव्हती, आणि समोर तगडा उमेदवार. मात्र प्रचाराचा झंझावात आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचं कसब या बळावर त्यांनी आश्चर्यकारकपणे वयाच्या 38व्या वर्षी पहिल्याच दमात जावळी विधानसभा जिंकून दाखवली. त्यांची ओळख जायंट किलर अशी झाली. पुन्हा 2004 ला ते दुसऱ्यांदा तिथून आमदार झाले. 2009 ला जावळी मतदारसंघाची पुनर्रचना झाली. मग पवारांनी त्यांना कोरेगाव मतदारसंघात उतरवलं. त्यावेळी वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील ज्या महसूल मंत्री होत्या, त्यांचं आव्हान शशिकांत शिंदे यांच्यासमोर होतं. मात्र त्यांनी इथेही बाजी मारली आणि शालिनीताईंना पराभवाचा धक्का दिला. 

ADVERTISEMENT

2014 साली सुद्धा त्यांनी कोरेगावचं मैदान मारलं. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे हे उदयनराजेंच्या प्रचारात आघाडीवर होते. झंझावाती प्रचार करुन त्यांनी उदयनराजेंना राष्ट्रवादीकडून लोकसभेवर पाठवण्यासाठी मोठी भूमिका बजावलेली. मात्र तीनच महिन्यात उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादीला सोडचिठ्टी देत भाजपमध्ये प्रवेश केला. पोटनिवडणूक लागली आणि उदयनराजेंसमोर श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रवादीनं संधी दिली. शरद पवारांचं ते पावसातलं भाषण गाजलं. वातावरण फिरलं आणि उदयनराजेंना पराभूत व्हावं लागलं. इथेही श्रीनिवास पाटील यांच्यासाठी शशिकांत शिंदेंनी लावलेली ताकद महत्वाची होती. 

ADVERTISEMENT

पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील जिंकले खरे मात्र इकडे विधानसभेत शिवसेनेच्या महेश शिंदेंसारख्या नवख्या उमेदवाराविरोधात शशिकांत शिंदेंचा तीन हजार मतांनी निसटता पराभव झाला. मात्र, शशिकांत शिंदे यांची ताकद माहिती असल्यानं शरद पवारांनी लगेच तीनेक महिन्यात शशिकांत शिंदेंना विधानपरिषदेवर घेतले. 

सातारा जिल्ह्यात दहा वर्ष राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केल्यानं त्यांचा गावागावात संपर्क आहे. सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो, आणि बालेकिल्ला म्हणून नाव मिळवण्यामध्ये शशिकांत शिंदेंचं योगदान सर्वात महत्त्वाचं आहे. याच गोष्टींचा शशिकांत शिंदेंना उदयनराजेंसमोर लढताना सर्वाधिक फायदा होऊ शकतो. 

साताऱ्यात यावेळीही युती आणि आघाडीकडून उमेदवारांच्या नावाची चर्चा होत असताना एकीकडे उदयनराजे ठाम दिसून आले होते तर दुसरीकडे शशिकांत शिंदे यांनी देखील शरद पवार यांची भेट घेऊन ‘कोण लढणार आहेत का बघा, नाही तर मी आहेच’ असे आधीच सांगून टाकले होते. त्यानुसार खासदार शरद पवार यांनी आपला हुकमी एक्का शशिकांत शिंदे यांचे नाव निश्चित केले आहे. शिंदेंचा उमेदवारी अर्ज लवकरच दाखल केला जाणार आहे. त्यासाठी खुद्द खासदार शरद पवार साताऱ्यात येणार आहेत.
   
या मतदारसंघाची खासियत म्हणजे जेव्हापासून राष्ट्रवादीची स्थापना झालीय तेव्हापासून म्हणजे 1999 पासून सातारा लोकसभेचा खासदार हा राष्ट्रवादीचाच राहिलाय.  १९९९ला लक्ष्मणराव पाटील,  २००४ ला श्रीनिवास पाटील,  2009, 2014 आणि 2019 ला उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडून आले. उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडल्यानंतर 2019 ला झालेल्या पोटनिवडणुकीतही राष्ट्रवादीनंच बाजी मारली आणि श्रीनिवास पाटील पुन्हा खासदार झाले होते. 

राज्यातील राजकारणात २०१९ पासून नाट्यमय घडामोडी घ़डल्यात. जून २०२२ मध्ये शिवसेना पक्षात फूट पडली, जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील दोन गट पडले. सातारा लोकसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं श्रीनिवास पाटील आणि सारंग पाटील यांनी लोकसभा मतदारसंघात जनसंपर्क वाढवला होता. श्रीनिवास पाटील आणि सारंग पाटील या दोघांपैकी कुणाला तरी उमदेवारी मिळेल अशी चर्चा होती.  श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीचं कारण देत लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतली. शरद पवारांपुढं उमेदवारी कुणाला द्यायची यासंदर्भात पेच निर्माण झाला. श्रीनिवास पाटील यांनी माघार घेताना सारंग पाटील यांचं नाव सुचवलं पण शरद पवार याला राजी झाले नाहीत. त्यामुळं सारंग पाटील यांचं नाव मागं पडलं. 

बाळासाहेब पाटील, सत्यजितसिंह पाटणकर, सुनील माने यांची नावं लोकसभेसाठी चर्चेत असली तरी त्यांची लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं तयारी झालेली नसल्याचं दिसत असल्यानं त्यांची देखील नावं मागं पडली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत चर्चा केली. मात्र, पक्षचिन्हाच्या मुद्यावर त्यांचं नाव मागं पडलं. यामुळं शरद पवारांपुढं लोकसभा मतदारसंघातील निष्ठावंत शिलेदार असलेल्या शशिंकात शिंदे यांच्या नावाचा विचार करण्याशिवाय पर्याय उरला नाही.
 
युतीकडून ही जागा भाजपला सुटणार असल्याचं बोललं जात आहे. आणि अर्थातच हे तिकीट उदयनराजे यांनाच मिळणार हे जवळपास निश्चित आहे. तशी उदयनराजेंनी जोरात तयारी देखील सुरु केलीय. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी कर्जतच्या मेळाव्यात बोलताना बारामती, रायगड, शिरुर आणि सातारा ही जागा लढवणार असल्याचं सांगितलं होतं. सातारा लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या पक्षाकडून आमदार मकरंद पाटील यांचे बंधू जिल्हा बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील हे इच्छुक होते. मात्र, लोकसभेच्या जागा वाटपात हा मतदारसंघ भाजपकडे गेल्याचं जवळपास फायनल आहे. 

वाईमध्ये झालेल्या महायुतीच्या मेळाव्याला मकरंद पाटील, नितीनकाका पाटील उपस्थित नव्हते. त्यामुळं उमेदवारी न मिळाल्यास ते लोकसभा निवडणूक अपक्ष लढवतात का हे पाहावं लागणार आहे. त्यामुळं महाविकास आघाडीकडून शशिकांत शिंदे, महायुतीकडून उदयनराजे भोसले अशी दुरंगी लढत दिसत असली तिरंगी लढतीचं चित्र नाकारता येत नाही.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मतदारसंघात महायुतीची ताकद अधिक दिसत असली आणि उदयनराजे यांची बाजू भक्कम मानली जात असली तरी कोणत्याही क्षणी गेम बदलवण्याची ताकद असलेले शरद पवार यांची साथ आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रतीची सहानुभूती आणि काँग्रेसची योग्य साथ मिळाल्यास शशिकांत शिंदे यांचं आव्हान उदयनराजे यांना जड जाणार असल्याचं बोललं जात आहे. 
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT