पुणे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पुण्याच्या कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे नेहमीच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. काल (19 फेब्रुवारी) देखील चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यक्रमात असंच एक विधान केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी असे म्हटले आहे की, ‘नरेंद्र मोदी यांचा मुसलमानांना विरोध असण्याचं कारण नाही. अब्दुल कलाम यांना देखील राष्ट्रपती त्यांनीच केल आहे. ते काही मुस्लिम आहेत म्हणून त्यांना बाजूला ठेवलं नव्हतं. तर एक कर्तुत्ववान, संशोधक म्हणून त्यांना मोदींना राष्ट्रपती केलं होतं.’ चंद्रकांत पाटलांच्या विधानामुळे मात्र, सोशल मीडियात त्यांना आता ट्रोल केलं जाऊ लागलं आहे.
पंतप्रधान अटलबिहारींच्या कार्यकाळात एपीजे अब्दुल कलाम हे राष्ट्रपती झाले होते. त्यामुळे याचा संबंध मोदींशी कसा काय लावण्यात येत आहे? असा प्रश्न अनेकजण विचारु लागले आहेत. दरम्यान, आपल्या या भाषणात चंद्रकांत पाटलांनी असा दावा केला आहे की, भाजप हा पक्ष मुस्लिमविरोधी नाही. बिहारमध्ये देखील मुस्लिम महिलांनी मोठ्या प्रमाणात मोदींना मतदान केलं.
ही देखील बातमी पाहा: फडणवीसांचे लाडके असलेले गोपीचंद पडळकर सतत वादात का असतात?
पाहा नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील!
‘आमचा सर्व मुसलमानांना विरोध असण्याचं कारण नाही.. मोदींनी तर सगळ्या प्रकारे प्राधान्य दिलं. अब्दुल कलामांना त्यांनी राष्ट्रपती केलं. ते काय मुसलमान आहे म्हणून त्यांना बाजूला ठेवलं? एक कर्तृत्ववान माणूस, एक संशोधक माणूस… म्हणून त्यांना राष्ट्रपती केलं. महिला… मुस्लिम महिला त्यांच्या पायात बेडी आहेत. ती तोडण्यासाठी तीन तलाकचा कायदा केला.’
‘बिहारमध्ये विजय मिळालं त्याचं विश्लेषण करा. रांगेने मुस्लिम महिलांनी मतदान केलं मोदींनी. ते याचसाठी की तुम्ही आमच्या पायातली बेडी तोडली. नाहीतर आमचा नवरा तलाक… तलाक.. तलाक असं म्हणून आम्हाला ढकलून घराच्या बाहेर काढायचा. पण याबाबत तुम्ही कायदा केला. बिहारमध्ये मुस्लिम मेजॉरिटी असणाऱ्या सीमांत नावाच्या भागामध्ये २९ पैकी १४ जागा या भाजपला मिळाल्या. त्यावेळी रांगेने मुसलमान महिलांनी नवऱ्यांना सांगितलं. ‘तुमको क्या करना है करो, हम तो मोदी को मतदान करेंगे’…
‘मग आता सांगा मोदी मुस्लिमविरोधी आहेत? की आम्ही मुस्लिमविरोधी आहोत? पण चित्र असं रंगवलं जातं की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुसलमान सैन्य होते… होतेच.. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली ती मुघलांचं साम्राज्य गाडून केली.’ असं वक्तय चंद्रकांत पाटलांनी आपल्या भाषणात केलं आहे.