अमरावतीमध्ये कोरोनाचा कहर सुरूच असल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तरीही एका दिवसात ९२६ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर कोरोनामुळे दिवसभरात सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. लॉकडाऊननंतरही एवढ्या मोठ्या प्रमाणात रूग्णसंख्या आढळल्याने अमरावतीकरांचं टेन्शन वाढलं आहे. जिल्हा प्रशासनाने लोकांना नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे. काळजी घेण्यासंबंधीचे निर्देशही दिले आहेत तरीही लोक हलगर्जीपणा करत आहेत. त्यामुळे लोकांना याची किंमत मोजावी लागते आहे.
आज महाराष्ट्रात ६ हजार २१८ नवे रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत, ज्यापैकी ९२६ रुग्ण हे एकट्या अमरावतीत आहेत. सध्याच्या घडीला राज्यात २ लाख ७९ हजार २८८ लोक होम क्वारंटाईन आहेत तर २ हजार ४८४ लोक हे संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्रात आजच्या घडीला ५३ हजार ४०९ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. ज्यापैकी एकट्या अमरावतीत ५ हजार ५९५ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. ज्यामुळे अमरावती हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरतो आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे अमरावतीत 21 फेब्रुवारीपासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मागील २४ तासांमध्ये ९०० पेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुंबई, पुण्याच्या जवळपास जाणारी ही रूग्णसंख्या आहे. सध्या अमरावतीत ५ हजार ५९५ अॅक्टिव्ह रूग्ण आहेत.
मास्क वापरा, हात धुवा, सॅनेटायझरचा वापर करा असं आवाहन वारंवार करण्यात येतं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही विदर्भातल्या पाच शहरांबद्दल आणि तिथल्या वाढत्या कोरोना रूग्णांबद्दल चिंता व्यक्त केली. एवढंच नाही तर लॉकडाऊन टाळायचा असेल तर महाराष्ट्रातल्या नागरिकांनी अधिकाधिक काळजी घेणं आवश्यक आहे तरच तो टळू शकेल असंही म्हटलं आहे. एवढंच नाही तर संचारबंदी, जमावबंदी, लॉकडाऊन यासंदर्भातले निर्देश हे त्या- त्या जिल्ह्यांना देण्यात आले आहेत. अमरावतीत दोन दिवसांपासून लॉकडाऊन आहे तरीही मागील चोवीस तासात ९०० पेक्षा जास्त पॉझिटिव्ह रूग्ण अमरावतीत आढळले आहेत. ही बाब नक्कीच चिंता वाढवणारी आहे.