अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिराच्या निर्माणावरुन महाराष्ट्र विधानसभेत रणकंदन झालेलं पहायला मिळालं. विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी सभागृहात बोलत असताना, “राम मंदिराच्या नावाने लोकांकडून पैसे जमा केले जात आहेत. जे व्यक्ती पैसे देत नाहीत त्यांना धमकी दिली जात आहे. कोणत्या अधिकाराच्या अंतर्गत महाराष्ट्रात राम मंदिराच्या नावाने पैसे गोळा करण्याची परवानगी दिली जात आहे याचं उत्तर सरकारने द्यावं” अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
अवश्य वाचा – सर्व मुस्लीम मंत्र्यांनी राजीनामा द्यावा ! आमदार अबु आझमींची मागणी
राम मंदिरासाठी पैसे गोळा करण्याचा ठेका दिला आहे का याचं उत्तर सरकारने द्यावं असं म्हणत नाना पटोलांनी भाजपवर घणाघात केला. नाना पटोलेंच्या भाषणानंतर विरोधीपक्ष आक्रमक झालेला पहायला मिळाला. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी खंडणी गोळा करणाऱ्यांना समर्पण कळणार नाही असं म्हणत हिंमत असेल तर राम मंदिरावर वेगळी चर्चा लावा असं आव्हान सरकारला केलं. यानंतर भाजप आमदारांनी विधानसभेत जय श्रीरामचे नारे दिले. सभागृहातला गोंधळ पाहून अखेरीस अध्यक्षांनी १० मिनीटांसाठी सभागृह तहकूब केलं.
दरम्यान चौथ्या दिवसाच्या कामकाजात जळगाव मधील पोलीसांनी विद्यार्थिनींना कपडे काढून नाच करायला लावल्याचं धक्कादायक प्रकरण तर औरंगाबादमधील कोविड सेंटरमध्ये डॉक्टरने महिला रुग्णासोबत छेडछाड केल्याच्या घटनेचे पडसादही पहायला मिळाले. राज्यातील ढासळलेल्या कायदा-सुरक्षाव्यवस्थेवरुन विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडलं आहे.