Gujrat Election: “सगळ्यांनी ऐका, आज जे गुजरातमध्ये घडलं तेच उद्या मुंबई महापालिकेत घडणार”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Mangal Prabhat Lodha : गुजरातमध्ये भाजपने अभूतपूर्व विजय मिळवला आहे. जे एक्झिट पोल समोर येत होते त्यात भाजपला ११० ते १२५ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला गेला होता. मात्र हे सगळे अंदाज मोडित काढत भाजपने १५०+ जागांवर विजय मिळवला आहे. यानंतर आता मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जी अत्यंत सूचक आहे.

काय म्हटलं आहे मंगलप्रभात लोढा यांनी?

भाजपने गुजरातमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे. अंतिम निकाल अद्याप हाती आलेले नाहीत तरीही भाजपला १५० पेक्षा जास्त जागा मिळणार हे निश्चित झालं आहे. भाजपची गुजरातमध्ये एकहाती सत्ता येणार हे स्पष्ट झालं आहे. अशात मंगलप्रभात लोढा यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंना थेट इशाराच दिला आहे. गुजरात ही फक्त नांदी आहे. आज जे गुजरातमध्ये घडलं तेच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत घडणार आहे असं मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं आहे.

आणखी काय म्हणाले मंगलप्रभात लोढा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची निर्णयक्षमता, कार्यकुशलता या सगळ्याला आम्हा भाजप कार्यकर्त्यांचा प्रणाम. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहा दिवसांपेक्षा जास्त वेळ गुजरातमध्ये राहून प्रचार केला. गुजरातमधल्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. त्याचाच हा विजय आहे. मोदीजींवर गुजरातच्या जनतेने श्रद्धा दाखवली आहे. एक नवा इतिहास सुरू झाला आहे. आज गुजरातमध्ये भाजपने विक्रमी विजय मिळवला आहे. गुजरातमध्ये जे काही घडलं आहे तेच उद्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत घडणार आहे. ही फक्त नांदी आहे, सर्वांनी ऐकून घ्या. हा इशारा देत मंगलप्रभात लोढा यांनी महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंना दिला आहे. एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत मंगलप्रभात लोढा यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मंगलप्रभात लोढा यांच्या या वक्तव्याबाबत अद्याप कुठलीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र संजय राऊत यांनी गुजरात निवडणुकीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. आप आणि भाजप यांच्यात बहुदा तुम्ही दिल्ली घ्या गुजरात आम्हाला द्या असं काहीतरी डील झालं असावं असं वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. तीन प्रमुख निवडणुकांमध्ये दिल्ली भाजपच्या हातून गेलं, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने टक्कर दिल्याने भाजपला संघर्ष करावा लागतो आहे. गुजरातमध्ये भाजपने बाजी मारली आहे. आम्ही तिन्ही पक्षांचं अभिनंदन करतो असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT