Pitru Paksha 2021 : श्राद्धाचं महत्त्व काय असतं आणि प्रमुख तिथी कोणत्या?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पितृपक्ष हा भाद्रपद महिन्यात येणारा पंधरा दिवसांचा कालावधी असतो. या कालावधीत पितरांना घास ठेवण्याची, श्राद्ध करण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे. हिंदू धर्मात पितृ पक्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या पूर्वजांचं, मृत नातलगांचं श्रद्धेने केलेलं स्मरण याचा अर्थ होतो श्राद्ध. श्राद्धविधी केले जातात ते याच कालावधीत. पितरांना मुक्ती मिळावी म्हणून श्राद्ध कर्म केलं जातं.

धार्मिक मान्यता अशीही आहे की जर तुमचे पितर नाराज असतील तर तुमची प्रगती होत नाही. अनेक अडथळे त्या प्रगतीत निर्माण होतात. त्यामुळेच पितृ पक्षामध्ये पितरांचा आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्यांना मोक्ष मिळावा या हेतूने पिंड दान केलं जातं. श्राद्ध घातलं जातं. भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील प्रतिपदा तिथीपासून सर्वपित्री अमावस्येपर्यंतचा काळ म्हणजे पितृ पक्ष. या वर्षी हा काळ 20 सप्टेंबर 6 ऑक्टोबर असा आहे. मात्र 20 तारखेला षौष्ठोपदी पौर्णिमा आली असल्याने त्या दिवशी श्राद्ध केलं गेलं नाही. ही तिथी ज्या पितरांची असेल त्यांचं श्राद्ध पंचमी किंवा षष्टमीला घातलं जावं असं या वर्षी पंचागात नमूद कऱण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पितृपक्षाचं महत्त्व काय?

पितृपक्षात श्राद्ध आणि तर्पण केल्याने पितर प्रसन्न होतात अशी धारणा आहे. तसंच ते प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात अशीही श्रद्धा आहे. त्यांची कृपादृष्टी झाली तर माणसाच्या आयुष्यात येणारी अनेक संकटं, अडथळे दूर होतात असं म्हटलं जातं. ज्योतिषाचार्य अरविंद मिश्र यांनी सांगितल्यानुसार जर श्राद्ध केलं गेलं नाही तर आत्म्याला मुक्ती मिळत नाही. पितृ पक्षात नियमित रूपाने दान आणि पुण्य केल्याने कुंडलीतून पितृ दोषही नाहीसा होऊ शकतो. पितृ पक्षात श्राद्ध कर्म करणं, पिंडदान आणि तर्पण या तिन्ही विधींना विशेष महत्त्व आहे.

ADVERTISEMENT

पितृपक्षात आपण आपल्या पितरांची आठवण करायची असते. हे श्राद्ध करण्याची वेळ दुपारची असते. दुपारच्या वेळेत श्राद्ध आणि पिंडदान केलं जातं. त्यानंतर पिंडाला तर्पण केलं जातं. हातात काळे तीळ घेऊन दक्षिण दिशेला उभं राहून जल दिलं जातं. दक्षिण ही यमाची दिशा आहे त्या दिशेला पितर असतात अशीही मान्यता आहे. त्यामुळे दक्षिण दिशेला उभं राहून तर्पण दिलं जातं. तसंच ज्या तिथीला मृत्यू झाला आहे त्या तिथीला वस्त्र, अन्न दान करणं याचीही प्रथा आहे.

ADVERTISEMENT

पितृपक्षात घरातील व्यक्ती मृत झाल्यावर, त्या तिथीला त्यांचे श्राद्ध केले जाते. हे श्राद्ध मातृ व पितृ वंशपरंपरेतील मागील तीन पिढ्यांचे स्मरण करण्यासाठी केले जाते. वडील, आजोबा, पणजोबा अशा तीन पिढ्यांच्या नावांचा उल्लेख करून, हे स्मरण केले जाते. श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केले जाणारे दिवंगत व्यक्तींचे स्मरण. श्रद्धापूर्वक हे विधी करताना, प्रयत्नपूर्वक कार्य करण्याची एक समन्वयी भूमिका आपल्या धर्मशास्त्राने घालून दिली आहे. केवळ हिंदू धर्मशास्त्रातच असा अन्न, पाणी देण्याचा विचार मांडला गेला आहे, असे नाही. तर, पारशी, ख्रिस्ती, मुस्लीम, जैन अशाही धर्मांमध्ये पितरांना अन्न, पाणी देण्याची प्रथा आहे.

या वर्षी आलेल्या पितृपक्षाच्या तिथी

21 सप्टेंबर- प्रतिपदा श्राद्ध

22 सप्टेंबर -द्वितिया श्राद्ध

23 सप्टेंबर-तृतीया श्राद्ध

24 सप्टेंबर-चतुर्थी श्राद्ध

25 सप्टेंबर-पंचमी श्राद्ध

26 सप्टेंबर-षष्टी श्राद्ध

27 सप्टेंबर-षष्टी श्राद्ध

28 सप्टेंबर-सप्तमी श्राद्ध

29 सप्टेंबर- अष्टमी श्राद्ध

30 सप्टेंबर- नवमी श्राद्ध

1 ऑक्टोबर-दशमी श्राद्ध

2 ऑक्टोबर-एकादशी श्राद्ध

3 ऑक्टोबर-द्वादशी श्राद्ध

4 ऑक्टोबर-त्रयोदशी श्राद्ध

5 ऑक्टोबर-चतुर्दशी श्राद्ध

6 ऑक्टोबर- सर्वपित्री अमावस्या श्राद्ध

पितृपक्षात शुभ कार्य का नसतं?

आपले पूर्वज आदरणीय असतात. असे मानले जाते की, पितृ पक्षाच्या वेळी ते आपल्यामध्ये येतात. अशात हे 15 दिवस त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्याशी आध्यात्मिकरित्या जुळण्यासाठी असतात. अशा परिस्थितीत आपल्या सवयी, छंद आणि शुभ कार्यावर मर्यादा घालून त्यांच्याबद्दल आपला आदर आणि समर्पण दिसून येते. जेणेकरुन पूर्वजांना कळू शकेल की त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना अजूनही त्यांची उणीव जाणवते. असे मानले जाते की, आपल्याप्रति आपल्या मुलांचे प्रेम पाहून पितर त्यांच्यावर प्रसन्न होतात आणि त्यांना आशीर्वाद देऊन जातात त्यामुळे या काळात शुभ कार्यांचे जसं की मुंज, लग्न, बारसं यांचं मुहूर्त नसतात. तसंच या कालावधीत लग्नासंदर्भातली बोलणीही केली जात नाहीत.

भाद्रपद महिन्यातच का येतो पितृ पक्ष?

पितृपक्ष हा भाद्रपद महिन्यातच का येतो, याविषयी धर्मशास्त्रात खगोलशास्त्राचा आधार भूमिका मांडल्याचे दिसते. दक्षिणायन, उत्तरायण अशी सूर्याभोवतीच्या पृथ्वी प्रदक्षिणेची कालमापन गणना आहे. पृथ्वीवरील एक दिवस हा २४ तासांचा मानला गेला आहे. पण जे मृत झाले, त्यांचा वर्षभराचा कालावधी म्हणजे एक दिवस, असे मानले जाते. उत्तरायणाचा काळ हा देवांचा दिवस आणि दक्षिणायनाचा काळ ही देवांची रात्र आहे. तसेच दक्षिणायन हा पितरांचा दिवस आणि उत्तरायण ही पितरांची रात्र असते. कर्क संक्रांत ते धनु संक्रांतीचा कालावधी हा पितरांचा होय. मध्यान्हात पितरांना भोजन (अन्नपाणी) देण्यासाठीचा काळ म्हणजे पितृपंधरवडा म्हणजेच भाद्रपद वद्य प्रतिपदा ते अमावस्या हा कालावधी होय, अशी मान्यता आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT