बेफाम लाटा, बेलगाम वारा… तरीही बहाद्दरांनी वाचवले शेकडो जीव; समुद्रातील थराराची कहाणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: तौकताई चक्रीवादळाने (Tauktae Cyclone ) महाराष्ट्रापासून (Maharashtra) गुजरातपर्यंत अक्षरश: होत्याचं नव्हतं करुन टाकलं आहे. विशेषत: किनारपट्टी भागात या वादळामुळे जोरदार वारे वाहत होते. याशिवाय मुसळधार पाऊस देखील बरसत होता. पण याच सगळ्या भयंकर अवस्थेत मुंबईजवळ (Mumbai) भर समुद्रात एक बोट या वादळात सापडली ज्यामध्ये तब्बल 273 जण होते. ही बोट वादळादरम्यान, समुद्रातच प्रचंड हेलकावे घेऊ लागली आणि कोणत्याही क्षणी तिला जलसमाधी मिळेल अशी तिची स्थिती झाली.

याच गोष्टीची माहिती मिळताच भारतीय नौदलाच्या (Indian Navy) अजस्त्र नौका त्या दिशेने रवाना झाल्या आणि त्यांनी अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. या सगळ्याचा थरार कॅमेऱ्यात देखील कैद झाला असून त्याचीच गोष्ट आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

चक्रीवादळामुळे एक भली बोट भर मध्य समुद्रात सापडली असून तिच्यावरील लोक मदतीची याचना करत आहेत. ही माहिती मिळताच भारतीय नौदलातील बहाद्दर जवान आपल्या जीवाची तमा न करता थेट भर समुद्रात शिरले. बेफाम लाटा आणि बेलगाम वारा या कशाचीही तमा न बाळगता भारतीय नौदलाकडून बचाव कार्य सुरु केलं आणि शेकडो जणांचे जीव वाचवले. आज (मंगळवार) सकाळपर्यंत तब्बल 177 लोकांना वाचविण्यात आलं आहे. अद्यापही इतर काही जणांना वाचविण्यासाठी नौदलाकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी आयएनएस कोच्ची आणि आयएनएस कोलकाता हे बचाव कार्य करत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

70 वर्षात असं कधीही घडलं नव्हतं, मुंबईतील चक्रीवादळाचा नेमका इतिहास काय?

आपल्या बचावकार्यादरम्यान नौदलाने सांगितलं की, ‘एक मोठी नौका (Barge 305) ही भर मध्य समुद्रात अडकली होती आणि ज्यामध्ये 273 जण होते. त्यातील 177 जणांना वाचविण्यात आलं आहे. याशिवाय कुलाब्यानजीक आणखी एक बोट अडकली होती. ज्यामध्ये 137 लोक होते. त्यांना वाचविण्यासाठी देखील नौदलाची एक तुकडी पाठविण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

भर समुद्रातील थरार

ADVERTISEMENT

दरम्यान, हे बचाव कार्य किती भयंकर होतं हे आपल्याला खालील व्हीडिओमधून पाहता येईल. एकीकडे तुफान वारा आणि पाऊस सुरु असताना नौदलाचे जवान या कशाचीही पर्वा न करता प्रत्येक व्यक्तीचा जीव वाचावा यासाठी गेले अनेक तास प्रयत्न करत होते. वाऱ्याचा प्रचंड झोत आणि क्षणाक्षणाला खवळणारा समुद्र असं असून देखील नौदल आपल्या बोटींसह रात्रभर बचाव कार्य करतच होतं. त्यामुळेच आतापर्यंत 177 जणांना वाचविण्यात त्यांना यश आलं असून अद्यापही तहान-भूक विसरुन नौदलाचे जवान खोल पाण्यात प्रत्येक जीव वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत.

अनेक टीम अलर्ट मोडवर

तौकताई चक्रीवादळामुळे नौदलाच्या अनेक टीम आधीपासूनच अलर्टवर ठेवण्यात आल्या होत्या. त्यासाठी भारतीय नौदलाने वेगवेगळ्या टीम तैनात करुन ठेवल्या होत्या. जवळजवळ 11 डायव्हिंग टीम या दोन दिवसांपासून सज्ज होत्या.

चक्रीवादळामुळे कोणत्या स्वरुपाचं मोठं नुकसान झालं तर त्यासाठी रिपेअर अँड रेस्क्यू टीम देखील तयार करण्यात आली होती. तर पश्चिम सी-बोर्डमधील अनेक मोठ्या बोटी देखील अलर्टवर होत्या. यातील अनेक बोटी आता मदतकार्यात गुंतल्या आहेत.

Tauktae Cyclone Effect : मोडून पडला संसार…कोकणात वादळाने होत्याचं नव्हतं केलं

तौकताई चक्रीवादळाने महाराष्ट्रासह गुजरातला देखील तडाखा दिला आहे. त्यामुळे तेथील किनारपट्टी भागाचं देखील बरंच नुकसान झालं आहे. मात्र, मुंबईत काल ज्या पद्धतीने या वादळाचा तडाखा पाहायला मिळाला तो अभूतपूर्व असाच होता. कारण याआधी कधीही अशा स्वरुपाचं वादळ मुंबईकरांना पाहायला मिळालं नव्हतं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT