वन मंत्री संजय राठोड यांच्यावर उद्धव ठाकरेंची कोणतीही नाराजी नाही. संजय राठोड यांचा राजीनाम घेतला जाईल, उद्धव ठाकरे नाराज आहेत वगैरे बोललं जातंय पण हे सगळं दाखवण्याकरता आहे. नाराजी वगैरे काहीही नाही. नाराजी असती तर संजय राठोड यांच्यावर कारवाई झाली असती. त्यांचा राजीनामा घेतला गेला असता असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. राज्यात अनाचार, भ्रष्टाचार आणि दुराचार सुरू आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे संजय राठोड यांच्यावर नाराज आहेत असं जे बोललं जातं आहे त्या सगळ्या पेरलेल्या बातम्या आहेत. या बातम्यांना काहीही अर्थ नाही. नाराजी असती तर एव्हाना कारवाई झाली असती. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे छोट्या- छोट्या गोष्टींवर ट्विट करत असतात. मग संजय राठोड, पूजा चव्हाण प्रकरणावर एकही ट्विट का केलं नाही? ज्या ऑडिओ क्लिप्स बाहेर आल्या त्यातला आवाज कुणाचा आहे याचं उत्तर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे का नाही? कारण या सगळ्यांचं सगळं ठरलं आहे. संजय राठोड यांना अभय देण्यात आलं आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
कायद्याचं राज्य आहे कुठे?
महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहेच कुठे? पोलिसांवर प्रचंड दबाव आहे. एका मुलीचा मृत्यू होतो आणि मंत्र्याला वाचवलं गेलं आहे त्यामुळे चुकीचा पायंडा पडलाच आहे. अनेक भक्कम पुरावे या प्रकरणात पहिल्या दिवसापासून आहेत. इतके पुरावे असताना पोलिसांनी काहीच कारवाई का केली नाही? जर माध्यमांनी या सगळ्या गोष्टी समोर आणल्या नसत्या तर हे सगळं प्रकरण संपूनही गेलं असतं. या सगळ्यात पोलिसांचं जे वर्तन पाहण्यास मिळालं त्यावरून चित्रा वाघ यांनी जी भूमिका मांडली ती १०० टक्के योग्य आहे. अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर मंत्री आहे, आमदार आहे, अधिकारी आहे हे लक्षात घेऊन कारवाई करायची असते का? असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.
पूजा चव्हाण प्रकरणात १२ ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. एखादा गुन्हा घडल्यानंतर जे पुरावे असतात त्यांची साखळी जोडायची असते. ती इथे आहे तरीही काहीही कारवाई होत नाही याचाच अर्थ स्पष्ट आहे की त्यांना अभय देण्यात आलं आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.