Tokyo Olympics 2020 मध्ये काय आहे महाराष्ट्राच्या खेळाडूंचं Report Card?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्तरार्धात पदकांची कमाई केली. पहिल्या दिवशी वेटलिफ्टींगमध्ये मीराबाई चानूने पदक मिळवून दिल्यानंतर, पी.व्ही.सिंधूच्या रुपाने भारताला दुसरं मिळालं. मध्यंतरीचा काळ भारतीय खेळाडूंसाठी थोडासा खडतर गेला. सिंधूचं कांस्यपद, बॉक्सिंगमध्ये लोवलिनाचं कांस्यपदक, कुस्तीत रवी कुमारचं रौप्यपदक, हॉकीत ४१ वर्षांनी पुरुष संघाला मिळालेलं कांस्यपदक या सर्व पदकांमुळे भारतात सध्या आनंदाचं वातावरण आहे.

परंतू या सर्वांमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व कुठेच पहायला मिळालं नाही. टोकियो ऑलिम्पिकसाठी महाराष्ट्राचे ८ खेळाडू पात्र ठरले होते. ज्यापैकी ६ खेळाडू हे मुख्य स्पर्धेसाठी तर दोन खेळाडू हे पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरले होते. परंतू दुर्दैवाने सहापैकी एका खेळाडूला ऑलिम्पिक पातळीवर आपली छाप पाडता आली नाही. जाणून घेणार आहोत कशी राहिली महाराष्ट्राच्या खेळाडूंची ऑलिम्पिक मधली कामगिरी…

पदकांचा दुष्काळ संपला ! Tokyo Olympics मध्ये भारतीय हॉकी संघाला कांस्यपदक

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

१) राही सरनौबत – महाराष्ट्रातल्या नावाजलेल्या नेमबाजांपैकी एक म्हणून राही सरनौबतचं नाव घेतलं जातं. यंदाच्या ऑलिम्पिकसाठी राही सरनौबतला २५ मी. पिस्तुल प्रकारात स्थान मिळालं होतं. परंतू इथे राही आपली छाप पाडू शकली नाही. २९ जुलै रोजी झालेल्या पहिल्या राऊंडमध्ये Precision प्रकारात राही ४४ खेळाडूंमध्ये थेट २५ व्या स्थानावर फेकली गेली.

३० तारखेला झालेल्या रॅपीड प्रकारात राही सरनौबतची कामगिरी अधिकच खालावली. २५ व्या स्थानावरुन राही थेट ३२ व्या स्थानावर फेकली गेली. रिओ ऑलिम्पिकमध्ये राहीला पात्र ठरता आलं नव्हतं. परंतू यानंतर वर्ल्डकपमध्ये चांगली कामगिरी करत तिने ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलं होतं. परंतू महत्वाच्या स्पर्धेत स्वतःची छाप पाडण्यात राही कमीच पडली.

ADVERTISEMENT

२) तेजस्विनी सावंत – महाराष्ट्रातल्या दिग्गज नेमबाजांपैकी एक म्हणून तेजस्विनी सावंतचं नाव घेतलं जातं. तेजस्विनीच्या खात्यात ७ कॉमनवेल्थ गेम्सची मेडल्स आहेत, ज्यापैकी ३ गोल्ड मेडल आहेत. ५० मी. रायफल थ्री-पोजीशन प्रकारात तेजस्विनीला यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट मिळालं होतं.

ADVERTISEMENT

Knelling, Prone आणि Standing अशा ३ प्रकारात ही स्पर्धा खेळवली जाते. ३१ जुलैला झालेल्या पहिल्या फेरीत तेजस्विनी आपलं आव्हान देऊच शकलं नाही. ३७ खेळाडूंमध्ये तेजस्विनीने ३३ वा क्रमांक पटकावला. या खराब कामगिरीनंतर तेजस्विनी कमबॅक करुच शकली नाही आणि तिचं आव्हान संपुष्टात आलं.

Tokyo Olympics : पहिल्याच प्रयत्नात रवी कुमारचं ‘चंदेरी’ यश

३) प्रवीण जाधव – ऑलिम्पिकचं तिकीट मिळवलेल्या महाराष्ट्रातील खेळाडूंपैकी सर्वात प्रॉमिसिग चेहरा होता प्रवीण जाधव. सातारा जिल्ह्यातील एका लहानश्या गावातून आलेल्या प्रवीणने आंतरराष्ट्रीय पातळीवर पहिल्यांदाच भारताचं प्रतिनिधीत्व केलं. शेतमजूर आई-बाप असलेल्या प्रवीण जाधवकडून यंदा महाराष्ट्राला तिरंदाजी प्रकारात चांगल्याच अपेक्षा होत्या.

मिश्र दुहेरीत दिपीका कुमारीसोबत, पुरुष दुहेरीत अतानू दास आणि तरुणदीप रॉयसोबत तर एकेरीत प्रवीणने आश्वासक कामगिरी करत स्वतःची चमक दाखवून दिली. परंतू त्याची मजल पदकापर्यंत पोहचू शकली नाही.

Tokyo Olympics 2020 : ‘सर्वजण क्रिकेटला पाठींबा देत असताना त्यांनी हॉकीची निवड केली’

४) अविनाश साबळे – ३ हजार मी. स्टिपलचेस प्रकारात अविनाश साबळेला टोकियो ऑलिम्पिकचं तिकीट मिळालं होतं. महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील छोट्याश्या गावातून आलेल्या अविनाश साबळेने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली होती.

ऑलिम्पिकमध्ये ३० जुलै रोजी झालेल्या स्पर्धेत ८:१८:१२ अशी वेळ नोंदवत राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली, परंतू अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्यात तो अपयशी ठरला.

५) चिराग शेट्टी – चिराग शेट्टीने बॅडमिंटन दुहेरी प्रकारात सात्विकसाईराज रणकीरेड्डीसोबत भारताचं प्रतिनिधीत्व केलं. पहिला सामना जिंकत या जोडीने चांगली सुरुवात केली होती. परंतू यानंतर कामगिरीत सातत्य न राखता आल्यामुळे तांत्रिक निकषाच्या आधारावर सामना जिंकल्यानंतरही त्यांचा प्रवास संपुष्टात आला.

२०१८ साली झालेल्या राष्ट्रकुल खेळांमध्ये चिरागने सात्विकसोबत रौप्यपदकाची कमाई केली होती.

याव्यतिरीक्त विष्णू सर्वानन हा राज्यातला खेळाडू सेलिंग प्रकारात टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला होता. परंतू पदकांच्या शर्यतीत या खेळाडूचं आव्हानही तोकडचं पडलं. एक काळ असा होता की राष्ट्रीय स्पर्धा असो किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धा…महाराष्ट्रातल्या खेळाडूंचं या स्पर्धेवर वर्चस्व असायचं. परंतू गेल्या काही वर्षांपासून एकीकडे हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडीशा, सिक्कीम, मणीपूर यांच्यासारखी राज्य कौतकुास्पद कामगिरी करत असताना महाराष्ट्र यामध्ये मागे पडताना दिसतोय.

Tokyo Olympics 2020 : हॉकीमधलं हे मेडल क्रिकेट वर्ल्डकपपेक्षा मोठं – गौतम गंभीर

महाराष्ट्रात गेल्या २० वर्षांपासून क्रीडा पत्रकारिता करणारे मुक्त पत्रकार अभिजीत कुलकर्णी यांच्याशी ‘मुंबई तक’ने संवाद साधत या परिस्थितीबद्दल जाणून घेतलं. अभिजीत यांच्या मतानुसार, ऑलिम्पिक पातळीवर महाराष्ट्राचे खेळाडू आपला ठसा उमटवू शकत नाहीत, यामागचं एकमेव आणि सोपं कारण म्हणजे महाराष्ट्राला क्रीडा धोरणचं नाही.

“महाराष्ट्राला क्रीडा धोरणच नाही, खेळासाठी, खेळाडूंसाठी राज्यात पुरेशा सुविधा नाहीत. राज्यात क्रीडा प्रबोधिनीसारखी एक संस्था गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहे. सुरुवातीचा काहीकाळ या संस्थेचं कामकाज चांगलं सुरु होतं, परंतू नंतर काही कारणांमुळे या संस्थेचं सर्वच बिनसलं. अनेक खेळाडूंना सुविधा मिळत नाहीत, प्रशिक्षकांना मानधनाशिवाय काम करावं लागतं. महाराष्ट्रात सध्या जे काही मोजके खेळाडू आणि प्रशिक्षक काम करत आहेत त्यांची स्वतःच्या जीवावर धडपड सुरु असते.”

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेत केल्या अनेक वर्षांपासून अंतर्गत राजकारण आणि वाद सुरु आहेत. त्यामुळे राज्यात खेळांची परिस्थिती कशी आहे याकडे त्यांचं लक्षच नसतं. बॅडमिंटनसारखा खेळ, ज्याचा सराव करण्यासाठी एक चांगली जागा, कोचची गरज असते. त्या खेळासाठीही फार कमी सरावकेंद्र आहेत. राज्यात आज जिल्हा पातळीवर क्रीडा संकुल असतं पण तिकडे प्रशिक्षकांची वानवा असते. राज्यातल्या बहुतांश क्रीडा संघटना या राजकारण्यांच्या हातात असून त्यांचा कल परिस्थिती सुधारण्याकडे कधीच नसतो असं परखड मत कुलकर्णी यांनी व्यक्त केलं.

कुस्ती हा महाराष्ट्राच्या हक्काचा खेळ मानला जातो. परंतू ऑलिम्पिक पातळीवर खेळण्याची वेळ येते तेव्हा महाराष्ट्राचे मल्ल त्यात मागे पडतात. अनेक मल्ल असे असतात की जे ऑलिम्पिकसाठी प्रयत्नच करत नाहीत. आजही राज्यात कुस्ती खेळायची असेल तर तुम्हाला कोणत्या तरी तालमीचं किंवा क्लबचं सदस्य व्हावं लागतं. राज्यात अजुनही कुस्ती बहुतांश ठिकाणी आखाड्यात खेळली जाते. कुस्ती हा खेळ त्याचे नियम दिवसागणित बदलत असताना महाराष्ट्राच्या कुस्तीवीरांना अपग्रेड होण्याची इच्छा दिसत नाही. यंदाही महाराष्ट्रातले मोजके मल्ल ऑलिम्पिक पात्रता फेरीत खेळले होते. काही खेळांमध्ये राज्य सरकार खेळाडूंना चांगली आर्थिक मदत करत ही गोष्ट खरी असली तरीही ही मदत तळागाळापर्यंत पोहचत नाही हे देखीव तितकंच खरं आहे.

खेळाडूंना सरकारी नोकऱ्या, बढती, सरावासाठी पूर्ण वेळ देणं याबाबतीत इतर राज्य महाराष्ट्राच्या पुढे आहेत. राज्यात खेळाडूंना सरकारी नोकरी लागली की त्यांचा किमान काही तास ड्युटी ही करावीच लागते. त्यामुळे राज्यात असलेल्या क्रीडा धोरणाची वानवा हे महाराष्ट्राचे खेळाडू ऑलिम्पिक पातळीवर चांगली कामगिरी न करु शकण्यामागचं सर्वात मोठं कारण आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT