Mumbai News: मुंबईतील मुसळधार पावसामुळे मोनोरेलमध्ये वारंवार टेक्निकल बिघाड होत असल्याचं समोर आलं आहे. मुंबईत झालेल्या दोन अपघातांचा विचार करून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रशासनाकडून मोनोरेल मार्गिका तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 20 सप्टेंबर पर्यंत ही सेवा बंद राहणार असल्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे.
ADVERTISEMENT
मोनोरेल सेवेत बरेच अडथळे
चेंबूर ते सात रस्ता मार्गादरम्यान मोनोरेल मार्गिकेची उभारणी करण्यात आली. खरंतर, मुंबईतील मोनोरेल सेवेत बरेच अडथळे आल्याचं समोर आलं आहे. नुकतंच, 19 ऑगस्ट रोजी मुसळधार पावसामुळे एक गंभीर अपघात झाला. सायंकाळी 6:15 वाजेच्या सुमारास म्हैसूर कॉलनीजवळ बराच काळ मोनोरेल थांबली. यामुळे 582 हून अधिक प्रवासी दोन ते तीन तास तिथेच अडकून पडले होते. अखेर, अग्निशमन दलाच्या पथकाने प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. दोन दिवसांपूर्वी, मुसळधार पावसामुळे आचार्य अत्रे नगर स्थानकावर आणखी एक मोनोरेल अडकून पडली होती, ज्यामध्ये सुमारे 200 प्रवासी अडकले होते. त्यावेळी त्यांना सुद्धा सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं.
हे ही वाचा: Govt Job: इंजिनीअर असलेल्या तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! 'या' पदांसाठी निघाली मोठी भरती...
'या' मार्गावर धावते मोनोरेल
संत गाडगे महाराज चौक ते चेंबूर या 19.74 किमी लांब मार्गिकेवर चालणारी मोनोरेल ही देशाची एकमेव प्रणाली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत मोनोरेलमुळे झालेले अपघात आणि टेक्निकल बिघाडांकडे पाहता प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. याच पार्श्वभूमीवर, भविष्यात मोनोरेल सेवेचे सुरक्षित आणि सुरळीत संचालन करण्यासाठी टेक्निकल सुधारणा सुरू करण्यात आल्या आहेत. या नूतनीकरणाच्या काळात, मोनोरेल गाड्यांची दुरुस्ती केली जाईल आणि नवीन गाड्यांचे संचालन अधिक सुरक्षित करण्यासाठी सिग्नलिंग सिस्टममध्येही सुधारणा केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे हैदराबादमध्ये विकसित केलेली कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल सिस्टम (CBTC) पहिल्यांदाच या मार्गावर स्थापित केली जाणार आहे.
हे ही वाचा: मुंबईची खबर: आता मुंबईत 'रॅपिडो'सह धावणार 'या' बाईक टॅक्सी... किती असेल भाडं?
याव्यतिरिक्त, 32 स्थानकांवर इलेक्ट्रॉनिक इंटलॉकिंग सिस्टम लावण्यात आल्या आहेत आणि सध्या, त्याचं परीक्षण सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. प्रवाशांची सुविधा वाढवण्यासाठी 260 वायफाय एक्सेस पॉइंट, 500 आरएफआयडी टॅग, 90 ट्रेन डिटेक्शन सिस्टम आणि बऱ्याच डब्ल्यूएटीसी सिस्टम आधीच लागू करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, वेसाइड सिग्नलिंगचं काम पूर्ण झालं असून ते एकात्मिक चाचणीच्या टप्प्यात आहे.
ADVERTISEMENT
