शाळेत उशिरा आल्याने शिक्षिकेने 100 उठाबशा काढायला सांगितल्या, वसईतील 6 वीत शिकणाऱ्या अंशिकाचा बालदिनीच मृत्यू

मुंबई तक

15 Nov 2025 (अपडेटेड: 15 Nov 2025, 03:47 PM)

Vasai News : शाळेत उशिरा आल्याने शिक्षिकेने 100 उठाबशा काढायला सांगितल्या, वसईतील 6 वीत शिकणाऱ्या अंशिकाचा बालदिनीच मृत्यू

Vasai News

Vasai News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

शाळेत उशीरा आल्याने 100 उठाबशा काढल्या

point

शिक्षिकेने दिलेल्या शिक्षेमुळे सहावीतील अंशिकाचा दुर्दैवी मृत्यू

प्रवीण नलावडे, वसई : देशभरात बालदिन उत्साहात साजरा होत असताना वसईमध्ये मात्र या दिवशी दुर्दैवी घटना घडली. शाळेत दहा मिनिटे उशीर झाल्याचा राग येऊन शिक्षिकेने 13 वर्षीय विद्यार्थिनीला 100 उठाबशा काढण्यास सांगितले. या कठोर शिक्षेमुळे विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना वसई पश्चिमेतील सातीवली परिसरातील श्री हनुमंत विद्या हायस्कूल येथे घडली.

हे वाचलं का?

बालदिनाच्या दिवशीच अंशिकाचा झाला मृत्यू

मृत विद्यार्थिनीचे नाव अंशिका गौड (वय 13) असे असून ती सहावीत शिक्षण घेत होती. अंशिका ८ नोव्हेंबर रोजी रोजच्या प्रमाणे शाळेत आली होती. मात्र शाळेत पोहोचायला तिला सुमारे दहा मिनिटांचा उशीर झाला. शिक्षकेने अंशिका आणि तिच्यासोबतच्या काही विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढून उठाबशांची शिक्षा दिली. काही विद्यार्थ्यांनी 10 ते 20 उठाबशा काढल्यानंतर थांबले, परंतु घाबरलेल्या अंशिकाने तब्बल 100 उठाबशा काढल्या. या घटनेनंतर दुसऱ्याच दिवशी अंशिकाची तब्येत बिघडू लागली. तिला वसईतील आस्था हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती अधिक बिघडत गेल्याने पुढील उपचारांसाठी तिला मुंबईला हलवण्यात आले. मात्र सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले आणि बालदिनाच्या दिवशीच अंशिकाचा मृत्यू झाला.

हेही वाचा : एकाच कंपनीत दोघांमध्ये प्रेमसंबंध... पण 'त्या' कारणामुळे विवाहित महिलेची निर्घृण हत्या! मृतदेहाचे तुकडे केले अन्...

संबंधित शाळेला कोणतीही अधिकृत मान्यता नसल्याची माहितीही समोर

या प्रकरणाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) तीव्र भूमिका घेतली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी शाळेत धडक देत प्रशासनाला जाब विचारला आणि शाळेच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले. शिक्षिकेवर गुन्हा दाखल होईपर्यंत शाळा उघडू दिली जाणार नाही, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. दरम्यान, संबंधित शाळेला कोणतीही अधिकृत मान्यता नसल्याची माहितीही समोर येत आहे. अनधिकृत शाळेमध्ये विद्यार्थ्यांवर अशा प्रकारची कठोर वागणूक दिल्याने पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

एकाच कंपनीत दोघांमध्ये प्रेमसंबंध... पण 'त्या' कारणामुळे विवाहित महिलेची निर्घृण हत्या! मृतदेहाचे तुकडे केले अन्...