Ahmednagar Crime : अहिल्यानगर जिल्ह्यात मानवी संवेदनांना हादरवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. तीन महिन्यांच्या दिव्यांग बालकाचा स्वतःच्या आई-वडिलांनीच गळा दाबून खून केला आणि मृतदेह दूरवर नेऊन टाकून दिल्याचा प्रकार प्रकाशात आला आहे. या प्रकरणात पोलिसांनी आई-वडिलांसह तिसऱ्या व्यक्तीला अटक केली असून घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
ADVERTISEMENT
संगमनेर तालुक्यातील आंबील खालासा येथील रहिवासी अशोक धोंडीराम माळी यांना 4 डिसेंबर रोजी सकाळी मुळा नदीच्या पात्रातील झुडपांमध्ये एका अर्भकाचा मृतदेह आढळला. काही दिवसांपूर्वीच मृतदेह कुजत असल्याने ओळख पटविणे कठीण झाले होते. माहिती मिळताच संगमनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पाळेमुळे खोदून काढण्यात आलेला हा मृतदेह दोन ते तीन महिन्यांच्या बालकाचा असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर तपासाला वेग आला.
घटनास्थळी मिळालेल्या प्राथमिक पुराव्यांवरून पोलिसांनी विविध दिशांनी तपास सुरू केला. सीसीटीव्ही फूटेज, मोबाईल लोकेशन तसेच स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीद्वारे पोलिसांना संशय एका दाम्पत्यावर गेला. पुढील तपासात उघड झालं की, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शिवपूर, आव्हाणा येथील प्रकाश पंडित जाधव (वय 37) आणि त्यांची पत्नी सविता (वय 32) यांनी जन्मलेल्या दिव्यांग बालकाचा खून केला होता.
हेही वाचा : लग्नानंतर हुंड्याची मागणी, शारीरिक छळ, पतीचे अनैतिक संबंध अन्... महिला पोलीस कॉन्स्टेबलचे पतीवर गंभीर आरोप
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चकित करणारी कबुली दिली. मुलाच्या दिव्यांगत्वामुळे घरात वाढणारा ताण आणि आर्थिक ओढाताण याचा कंटाळा आल्याने त्यांनी मुलाला संपवण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. या कामी वाहनचालक असलेल्या हरिदास गणेश राठोड (32) या मित्राचीही मदत त्यांनी घेतल्याचे समोर आले. तिघांनी मिळून बाळाचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात नेऊन टाकून दिला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या अमानुष कृत्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. तीन महिन्यांच्या निरपराध बालकाचा जीव घेण्यामागे पालकांनी दाखवलेली निर्घृण मानसिकता आणि सामाजिक जबाबदारीचा पूर्ण अभाव यावर नागरिकांनी कडक शब्दात टीका केली आहे.
संगमनेर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास अतिशय गांभीर्याने करण्यात येत असून आरोपींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे. बालक हत्येचा हा प्रकार समाजमनाला चटका लावणारा ठरत आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











