Indurikar Maharaj daughter engagement ceremony controversy : आपल्या नर्मविनोदी आणि स्पष्ट भाषाशैलीतून समाजातील अनेक प्रश्नांवर प्रबोधन करणारे प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indurikar Maharaj) सध्या त्यांच्या कन्येच्या साखरपुड्यामुळे चर्चेत आले आहेत. इंदुरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी आणि साहिल चिलप यांचा साखरपुडा नुकताच संगमनेर (Sangamner) येथील वसंत लॉन्स येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, विविध स्तरांतून त्यावर मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
ADVERTISEMENT
इंदुरकर महाराजांनी त्यांच्या कीर्तनात साधं लग्न केलं तरी मुलं होतात, असा उपदेश केला होता. मात्र, आता त्यांच्या कन्येचा साखरपुडा शाही थाटात झाल्याने नेटकऱ्यांनी बेधडक सवाल केले आहेत. नेटकऱ्यांनी त्यांच्या आवाजातील व्हिडीओ त्यांच्या कन्येच्या साखरपुड्यातील व्हिडीओला बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून लावले आहेत.
या पार्श्वभूमीवर मुंबई डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी इंदुरीकर महाराजांवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. “दुसऱ्यांना संस्कार आणि समज देणारे इंदुरीकर महाराज आपल्या मुलीच्या साखरपुड्यासाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करतात,”
ते पुढे म्हणाले, “आपल्या कीर्तनातून इंदुरीकर महाराज लोकांना सांगतात की मुलांच्या लग्नसमारंभात साधेपणा ठेवा, अनाठायी खर्च करू नका, कर्ज घेऊ नका. मात्र स्वतःच त्यांनी मोठ्या दिमाखात साखरपुडा केल्याने समाजासमोर चुकीचा संदेश गेला आहे. ‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’ या म्हणीप्रमाणे वागले असते, तर त्यांनी खऱ्या अर्थाने आदर्श निर्माण केला असता.”
तळेकर यांनी पुढे टीका करताना म्हटले की, “साखरपुड्यातच एवढा खर्च झाला असेल, तर लग्नसमारंभात करोडोंची उधळपट्टी होणार यात शंका नाही. कीर्तनातून उपदेश करणारे इंदुरीकर महाराज स्वतःच्या जीवनात त्या तत्वांचा अवलंब करत नाहीत, ही गोष्ट वारकरी संप्रदायासाठी निराशाजनक आहे. त्यांनी जसे उपदेश केले तसेच आचरण केले असते, तर संप्रदायाला नक्कीच अभिमान वाटला असता.”
इंदुरीकर महाराजांचे जावई कोण आहेत?
इंदुरीकर महाराजांच्या कन्येचा साखरपुडा संपन्न झाल्यानंतर त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. अनेक नेटकऱ्यांनी इंदुरीकर महाराजांच्या कन्येस भावी आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्याचदरम्यान, “इंदुरीकर महाराजांचे जावई कोण आहेत?” या प्रश्नाची उत्सुकता अनेकांना लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंदुरीकर महाराजांचे जावई साहिल चिलप हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेडे येनेरे गावचे मूळ रहिवासी आहेत. सध्या ते व्यवसायानिमित्त नवी मुंबईत वास्तव्यास आहेत. साहिल चिलप यांचा वडिलोपार्जित ट्रान्सपोर्ट व्यवसाय असून, त्यांच्या ताब्यात अनेक वाहने आहेत. याशिवाय त्यांचा शेती आणि बांधकाम व्यवसाय असल्याचीही माहिती सोशल मीडियावर चर्चेत आहे.
दरम्यान, निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे खरे नाव निवृत्ती काशीनाथ देशमुख आहे. ते अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी या गावचे रहिवासी आहेत. याच गावावरून त्यांना “इंदुरीकर महाराज” हे नाव मिळाले. त्यांनी बी.एस्सी. आणि बी.एड. पर्यंत शिक्षण पूर्ण केले असून, शिक्षणानंतर त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य सुरू केले. त्यांच्या थेट, विनोदी आणि प्रबोधनात्मक कीर्तनशैलीमुळे ते अल्पावधीतच महाराष्ट्रभर लोकप्रिय झाले. आज त्यांच्या कीर्तनांना प्रचंड गर्दी जमते आणि राज्यभर त्यांचे लाखो चाहते आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











