Jalgaon Crime News : पाचोरा शहरातील तरुण व्यावसायिक रवींद्र संजय मोरे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात धक्कादायक ट्वीस्ट समोर आलाय. सुरुवातीला लॉजमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत रवींद्रचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती, परंतु आता तपासात समोर आलेल्या माहितीमुळे हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. पाचोरा शहरातील गोराडखेडा रोडवरील एका लॉजमध्ये रवींद्र मोरे आणि त्याच्या अल्पवयीन प्रेयसीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत 25 वर्षीय रवींद्र मोरे याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याची अल्पवयीन प्रेयसी दोरीचा फास तुटल्यामुळे सुदैवाने बचावली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा : निवडणुकीसाठी 22 गुंठे जमीन विकली, पण पराभूत झाला, आता शिंदेंच्या निर्णयाने आनंद गगनात मावेना
प्रेमप्रकरणातून टोकाचे पाऊल आणि कायदेशीर कारवाई
या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती वाढली असून, आता मृताच्या प्रेयसीविरुद्धही आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केवळ प्रेयसीच नव्हे तर संबंधित लॉजचे मालक सुरज शिंदे आणि व्यवस्थापक नितीन जंजाळ यांनाही आरोपी करण्यात आले आहे. रवींद्र मोरे यांचा महिन्याभरापूर्वीच साखरपुडा झाला होता, अशा स्थितीत त्यांनी आणि त्यांच्या प्रेयसीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील सर्व पैलूंचा सखोल तपास केला जात आहे. पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा : समजून घ्याः बांगलादेशी भारतात घुसतात कसे? पाहा कोणी केला भांडाफोड
नातेवाईकांचा संताप आणि पोलीस ठाण्यातील तणाव
रवींद्र मोरे यांच्या मृत्यूबाबत त्यांच्या नातेवाइकांनी सुरुवातीपासूनच तीव्र संशय व्यक्त केला होता. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास आणि पंचनामा प्रक्रियेस झालेला विलंब यामुळे संतप्त झालेल्या नातेवाइकांनी आणि नागरिकांनी पाचोरा शहरात तीव्र आंदोलन छेडले. छत्रपती शिवाजी महाराज चौकासह विविध ठिकाणी ठिय्या आंदोलन केल्यानंतर, शेकडो आंदोलकांचा मोर्चा थेट पाचोरा पोलीस ठाण्यावर धडकला. यावेळी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडून आंदोलकांनी पोलीस ठाण्याच्या आवारात प्रवेश केला. परिस्थिती इतकी तणावपूर्ण होती की, आंदोलकांनी जळगाव येथे शवविच्छेदन करून आणलेला रवींद्रचा मृतदेह थेट पोलीस ठाण्यात आणला. पोलीस प्रशासनाने लॉजचा मालक आणि व्यवस्थापकाला अटक केल्याची माहिती दिल्यानंतर आणि या प्रकरणाच्या निष्पक्षपाती तपासाचे आश्वासन दिल्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.
ADVERTISEMENT











