मुंबई: गेल्या 48 तासांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांत पाऊस सुरू आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढून त्याचे डिप्रेशनमध्ये रूपांतर झाले. हे डिप्रेशन पुढे सरकत सध्या झारखंड आणि छत्तीसगडच्या परिसरात पोहोचले आहे. या हवामान प्रणालीचा परिणाम महाराष्ट्रात, विशेषतः विदर्भात, पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT
पुढील काही तासांत डिप्रेशनची तीव्रता होणार कमी
कमी दाबाच्या क्षेत्राचे डिप्रेशनमध्ये रूपांतर झाल्यामुळे त्याची तीव्रता वाढली होती. त्यानंतर ही प्रणाली पुढे सरकत रांचीच्या आसपासच्या परिसरात पोहोचली आहे. पुढील सहा ते आठ तासांत डिप्रेशनची तीव्रता हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याचा प्रभावही कमी होईल, असा अंदाज आहे.
हे ही वाचा>> बीडमध्ये तब्बल दोन कोटींचं बनावट खाद्य तेल कसं तयार करण्यात आलं?
मात्र, सध्या हे डिप्रेशन सक्रिय असल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होत आहे. प्रणाली पुढे सरकत असताना तिच्यामुळे वाहणारे वारे महाराष्ट्राच्या दिशेने येत असून, त्याचा सर्वाधिक परिणाम विदर्भात होत आहे.
नैऋत्य वाऱ्यांमुळे मध्य महाराष्ट्रातही पाऊस
बंगालच्या उपसागरातील प्रणालीसोबतच नैऋत्य मोसमी वारेही सक्रिय आहेत. अरबी समुद्रातून येणाऱ्या या साऊथ-वेस्ट विंड्सचा परिणाम मध्य महाराष्ट्रातील काही भागांवर होत आहे. त्यामुळे घाट परिसरातही पावसाची शक्यता कायम आहे.
शनिवारी कुठे येलो अलर्ट?
पुढील 48 तासांचा अंदाज पाहता शनिवारी विदर्भातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. गोंदिया आणि भंडाऱ्यासह संपूर्ण विदर्भातील अनेक भागांत पावसाची शक्यता आहे.
हे ही वाचा>> 'अल निनो'नंतर आता या Typhoon Dolphin चं टेन्शन, पाऊस थांबणार की धो-धो कोसळणार?
अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. यासोबतच काही ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह थंडरस्टॉर्मची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
याशिवाय पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरासाठी शनिवारी येलो अलर्ट देण्यात आला आहे.
रविवारीही विदर्भात पावसाचा अंदाज
रविवारीही विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.
रायगड आणि साताऱ्याच्या घाट परिसरासाठीही रविवारी येलो अलर्ट देण्यात आला आहे.
पुढील 48 तासांत कुठे जास्त पाऊस?
एकूण परिस्थिती पाहता, पुढील 48 तासांत महाराष्ट्रात पावसाचा सर्वाधिक प्रभाव विदर्भात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. विदर्भासोबतच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
राज्यातील इतर शहरी भागांसाठी सध्या मोठा अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र, घाट परिसर आणि विदर्भातील पावसाची परिस्थिती लक्षात घेता पुढील दोन दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत.
ADVERTISEMENT












