नांदेड: नांदेडमध्ये वडिलांनी सत्तेसाठी स्वतःच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वृत्तानुसार, आरोपी व्यक्तीला तीन मुले होती आणि त्याला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी निवडणूक लढायची होती. महाराष्ट्र निवडणूक कायद्यातील 'दोन अपत्यांच्या' अटीमुळे तो अपात्र ठरत होता. केवळ, निवडणूक लढवण्यासाठी आरोपीने आपल्या मुलीची हत्या करण्याचा कट रचला. त्याने तेलंगणात जाऊन स्वत:च्या मुलीची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली.
ADVERTISEMENT
6 वर्षांच्या मुलीला कालव्यात फेकलं अन्...
संबंधित प्रकरण हे नांदेडमधील असून येथील केरुड गावातील रहिवासी असलेला पांडुरंग कोंडामंगले याला सोमवारी (1 फेब्रुवारी) अटक करण्यात आली. संबंधित आरोपीने 29 जानेवारी रोजी तेलंगणाच्या निजामाबादमधील निजामसागर कालव्यात आपल्या 6 वर्षांच्या मुलीला फेकलं आणि त्यात तिचा मृत्यू झाला. इतकेच नव्हे तर, आरोपीला हत्येची योजना आखण्यात मदत केल्याबद्दल पोलिसांनी केरुडचे विद्यमान सरपंच गणेश शिंदे यांनाही अटक केल्याची माहिती समोर आली आहे.
हे ही वाचा: मुलीने रॅपिडो बुक केली; रस्त्यात चालकाने केला बलात्कार, नेमकं काय घडलं?
पोलिसांचा तपास
मिळालेल्या माहितीनुसार, निजामाबादमधील निजामसागर कालव्यात एका 6 वर्षांच्या मुलीचा भयानक अवस्थेत मृतदेह आढळला. त्यानंतर, या घटनेची माहिती मिळताच बोधन ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी अज्ञात मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू केलं. काही तासांतच, मुखेड तालुक्यातील पोलिसांनी बोधन पोलिसांशी संपर्क साधला. तपासादरम्यान, पीडितेचं नाव प्राची असून ती पांडुरंगची मुलगी असल्याचं समोर आलं. काही दिवसांपूर्वी प्राची अचानक गायब झाल्याचे पोलिसांना समजलं.
हे ही वाचा: राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणामागील गूढ! अजितदादांना नेमकं काय हवं होतं?
सरपंच पदाच्या खुर्चीसाठी पोटच्या मुलीची हत्या
तपासादरम्यान, संशय आल्याने अधिकाऱ्यांनी पांडुरंगच्या मोबाईल फोन टॉवर लोकेशनचा शोध घेतला आणि तो प्राचीला तेलंगणाला घेऊन आल्याचं आढळून आलं. त्यानंतर कठोर चौकशीदरम्यान, आरोपीने त्याचा गुन्हा कबूल केला. अधिकाऱ्यांचा असा आरोप आहे की विद्यमान सरपंच गणेश यांनी पांडुरंगला सरपंचपदासाठी निवडणूक लढवण्यास प्रोत्साहित केलं होते. मात्र, तीन मुलांचा पिता असल्याकारणाने पांडुरंग निवडणूक लढवण्यास पात्र नव्हता. निजामाबादचे पोलीस आयुक्त साई चैतन्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, सविस्तर तपासानंतर गुन्ह्याची उकल झाली आहे आणि प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली असून यासंबंधी पुढील तपास सुरू आहे.
ADVERTISEMENT











