मुरबाड : पावसाच्या एक दोन सरी झाल्या, की भटकंती करणाऱ्या तरूणांचे ग्रूप ट्रेकिंगसाठी डोंगर दऱ्यांकडे वळू लागतात. यंदा महाराष्ट्रात पाऊस लवकर आला आणि निसर्ग बहरला. पण या वातावरणात भटकंती करण्यासाठी जाणाऱ्यांसाठी हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. मुसळधार पाऊस, सोसाट्याचा वारा आणि वाटा निसरड्या झालेल्या असतात जीव धोक्यात घालणारे अनेकजण जीवाला मुकतात हे अनेक घटनांमधून समोर आलंय. साताऱ्यातील पिंपोडे बुद्रुक येथील मूळ रहिवासी असलेल्या 21 वर्षीय साईराज धनेश चव्हाणसोतही तेच घडलं.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >>महिला हॉटेलमध्ये प्रियकरासोबत आलेली रंगात, पतीची अचानक एंट्री.. थेट छातावरून मारली उडी
14 पर्यटकांचा ग्रूप अडकला, 13 जण वाचले पण...
साईराज चव्हाण याचा सिद्धगडावर गिर्यारोहणादरम्यान खोल दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. रविवारी नवी मुंबईतील 14 पर्यटकांचा गट सिद्धगडावर ट्रेकिंगसाठी आला होता. जोरदार पाऊस, दाट धुके, सोसाट्याचा वारा आणि निसरड्या डोंगरामुळे ही दुर्घटना घडली. मुरबाड पोलीस, मुरबाड-शहापूर रेस्क्यू टीम आणि स्थानिकांच्या अथक प्रयत्नांनंतर अडकलेल्या इतर 13 पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात यश आले. सोमवारी दुपारनंतर साईराजचा मृतदेह खोल दरीत आढळला. आज (दि. 18) रेस्क्यू पथकाने मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
भारतीय सैन्यात भरती होण्याची होती साईराजची इच्छा
साईराज (हल्ली रा. तळोजा) हा धाडसी तरुण होता आणि त्याने यापूर्वी अनेक किल्ल्यांवर गिर्यारोहण केलं होतं. भारतीय सैन्यदलात सामील होण्याची त्याची तीव्र इच्छा होती, पण अलीकडेच झालेल्या एनडीए परीक्षेत थोड्या गुणांनी यशाने त्याला हुलकावणी दिली होती. त्याच्या पश्चात आई, वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे. होतकरू तरुणाच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
हे ही वाचा >>"धर्मांतरासाठी आलेल्यांचा सैराट करा....", बक्षीस जाहीर करत काय म्हणाले गोपीचंद पडळकर?
दरम्यान, या घटनेनंतर मुरबाडचे तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी पर्यटकांना सावधानतेचे आवाहन केलं आहे. "पावसाळ्यात डोंगरवाटा आणि किल्ल्यावरील पायवाटा पाण्यामुळे आणि चिखलामुळे निसरड्या होतात. त्यामुळे पाय घसरण्याचा आणि दरीत पडण्याचा धोका वाढतो. पर्यटकांनी या काळात धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे," असे त्यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
