सातारा : मोबाईलच्या अतिवापरावरून दिलेला सल्ला ठरला जीवघेणा; अल्पवयीन रूममेटने गळा आवळून केला खून

मुंबई तक

29 Oct 2025 (अपडेटेड: 29 Oct 2025, 09:54 AM)

Satara Crime : सातारा : मोबाईलच्या अतिवापरावरून दिलेला सल्ला ठरला जीवघेणा; अल्पवयीन रूममेटने गळा आवळून केला खून

Satara Crime

Satara Crime

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मोबाईलच्या अतिवापरावरून दिलेला सल्ला ठरला जीवघेणा

point

अल्पवयीन रूममेटने गळा आवळून केला खून

सातारा : मोबाईलचा अतिवापर करू नको असा सल्ला देणे एका तरुणाला जीवावर बेतले. सातारा जिल्ह्यातील लोणंद येथील माळीआळीत सोमवारी रात्री घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. केवळ किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलाने रागाच्या भरात आपल्या रूममेटचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत तरुणाचे नाव गणेश संतोष गायकवाड (वय 22, रा. पिंपळसुटी, ता. शिरूर, जि. पुणे) असे आहे.

हे वाचलं का?

मोबाईलबाबत सल्ला देणाऱ्याचे डोके भिंतीवर आपटून संपवलं 

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश गायकवाड लोणंद एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत काम करत होता. त्याच्यासोबत राहणारा मुलगा अल्पवयीन असून तो शिक्षणासाठी लोणंद येथे आला होता. दोघांची ओळख एका खानावळीत झाली आणि त्यांनी एकाच खोलीत राहून निम्मे भाडे वाटून घेण्याचा निर्णय घेतला होता. सोमवारी संध्याकाळी दोघांमध्ये मोबाईलच्या अतिवापर आणि अभ्यासावरील दुर्लक्ष या कारणावरून वाद झाला. गणेशने संबंधित मुलाला "मोबाईल कमी वापर, अभ्यासावर लक्ष दे" असा सल्ला दिला. या गोष्टीचा राग मनात धरून अल्पवयीन मुलगा रात्री गणेश झोपल्यानंतर संतापाच्या भरात हिंसक बनला. त्याने आधी गणेशचे डोके भिंतीवर आपटले आणि नंतर त्याच्याच कमरेच्या पट्ट्याने गळा आवळून ठार मारले. या हृदयद्रावक घटनेत गणेशचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा : ऑनलाइन गेमचा नाद नडला, 32 वर्षीय तरुणाने बायको-पोरांचाही विचार न करता थेट...

लोणंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टेमच्या तपासणीसाठी पाठविला. प्राथमिक चौकशीत खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. थोड्याच वेळात अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून चौकशी सुरु आहे. या घटनेमुळे संपूर्ण लोणंद परिसरात खळबळ उडाली आहे. केवळ मोबाईल वापरावरून जीवघेणा वाद होऊ शकतो, हे ऐकून अनेकांना धक्का बसलाय. मोबाईलच्या व्यसनामुळे युवकांचे आयुष्य अंधारात ढकलले जात असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. या घटनेने पुन्हा एकदा मोबाईलच्या व्यसनाचे आणि तरुण पिढीत वाढत असलेल्या रागाच्या गंभीर परिणाम समाजासमोर आणले आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

65 वर्षीय वृद्ध महिलेवर अत्याचार करत दगडाने ठेचून हत्या, ठाणे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार