Maharashtra : अहमदनगरमध्ये हिंसेचा भडका! दगडफेक, गाड्या जाळल्या, दोन गटात प्रचंड राडा

मुंबई तक

05 Apr 2023 (अपडेटेड: 05 Apr 2023, 11:38 AM)

Ahmednagar violence News : छत्रपती संभाजीनगरनंतर अहमदनगर शहरात हिंसेचा भडका उडाला असून, दोन गटात झालेल्या राड्यात 6 जण जखमी झाले आहेत.

Maharashtra, Ahmednagar, rioters, six people injured

Maharashtra, Ahmednagar, rioters, six people injured

Google CTA

बिहार, पश्चिम बंगालमध्ये हिंसक घटनांनी शांततेला तडे गेलेले असतानाच आता महाराष्ट्रात सलग दुसऱ्या आठवड्यात हिंसेचा भडका उडाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला लागून असलेल्या अहमदनगर जिल्ह्यात दोन गटात मोठा राडा झाला. झेंडा लावण्यावरून सुरू झालेला वाद विकोपाला गेला आणि जाळपोळ आणि दगडफेकीपर्यंत हा वाद चिघळला. या घटनेत 6 जण जखमी झाले आहेत.

हे वाचलं का?

अहमदनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर महामार्गावरवरील वारूळवाडीतील गजराज नगरमध्ये मंगळवारी रात्री दोन गट भिडले. झेंडा लावण्यावरून वाद सुरू झाला आणि त्यानंतर दोन्ही गटातील लोक आमने-सामने आले.

संबंधित बातमी – छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात राडा, नेमकं काय घडलं?

झेंडा लावण्यावरून सुरू झालेला वाद मारहाणीपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर लाठ्या आणि लोखंडी रॉडने दोन्ही गटातील तरुण एकमेकांवर तुटून पडले. मारहाणीनंतर काही समाजकंटकांनी परिसरातील वाहनांना लक्ष्य केलं. गाड्याची तोडफोड करत आग लावण्यात आली.

अहमदनगरमध्ये हिंसा : परिसरात मोठा बंदोबस्त

मंगळवारी (4 एप्रिल) रात्री 8.30 ते 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. समाजकंटकांनी दोन मोटारसायकली जाळल्या, तर चारचाकी वाहनांची तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी परिसरात धाव घेतली.

अहमदनगर जिल्ह्यात हिंसेचा भडका उडाला. दोन गटात झालेल्या राड्यात 6 जण जखमी झाले.

 

दोन्ही बाजूच्या जमावाला पांगवून पोलिसांनी परिसरात शांतता प्रस्थापित केली. दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून, स्थिती तणावपूर्ण आहे. पोलिसांकडून मोठा बंदोबस्त करण्यात आला असून, या घटनेत 6 जण जखमी झाले आहेत.

पोलीस अधीक्षक राकेश ओला काय म्हणाले?

या हिंसक घटनेबद्दल बोलताना अहमदनगरचे पोलीस अधीक्षक राकेश यांनी सांगितले की, “गजराज नगरच्या बाजूला वारूळवाडी ठिकाण आहे. काही मुलांमध्ये वाद झाला. गाड्याची तोडफोड करण्यात आली. काही जखमी झाले आहेत. याचा तपास सुरू आहे. काही लोक वेगवेगळ्या अफवा पसरवत आहे, यावर लोकांनी विश्वास ठेवू नये. या घटनेतील आरोपींवर योग्य कारवाई करू,” अशी माहिती ओला यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगरमध्ये काय घडलं होतं?

29 मार्चला छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंसक घटना घडली होती. गाडीला धक्का लागल्याच्या शुल्लक कारणावरून दोन गट भिडले होते. हा वाद इतका पेटला की, प्रचंड आर्थिक नुकसान झालं. समाजकंटकांनी थेट पोलिसांच्या वाहनांना लक्ष्य केलं होतं. पोलिसांची वाहनं पेटवून दिली. त्याचबरोबर इतरही वाहनांना आग लावली गेली होती. दगडफेक आणि जाळपोळीमुळे किराडपुऱ्यात मोठा तणाव निर्माण झाला होता. किराडपुऱ्याबरोबरच जवळच असलेल्या ओहर गावातही अशीच घटना घडली होती.