Crime News :गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यात गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात धांगध्रा येथील एका कालव्यात (कॅनाल) शांतीगिरी गोस्वामी नावाच्या व्यक्तीचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. त्या वेळी स्थानिक पोलिसांनी हा एक आकस्मिक मृत्यू असल्याचे मानून या प्रकरणाची फाईल बंद करून टाकली होती. मात्र, अहमदाबाद क्राईम ब्रँचला सुमारे दोन महिन्यांपूर्वी आपल्या गुप्त सूत्रांकडून एक अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली की, शांतीगिरी यांचा मृत्यू आकस्मिक नव्हता किंवा त्यांनी आत्महत्याही केली नव्हती, तर एका सुनियोजित आणि थंड डोक्याने रचलेल्या कारस्थानांतर्गत त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. हा धागा पकडून क्राईम ब्रँचच्या 2 पीएसआय (PSI) आणि 10 पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने सलग दोन महिने अहोरात्र काम करत या प्रकरणातील एकामागून एक कड्या जोडल्या. अखेर पोलिसांनी शांतीगिरी यांची 50 वर्षीय पत्नी जागृती गोस्वामी आणि तिचा 54 वर्षीय प्रियकर कांतीलाल ऊर्फ भरत साबरिया या दोघांना अटक करून या भयानक हत्याकांडाचा उलगडा केलाय.
ADVERTISEMENT
हेही वाचा : प्रेयसीचा मोबाईल चेक केला अन् संतापला, प्रियकराने सगळंच संपवलं, उसाच्या शेतात अर्धनग्नावस्थेत...
अहमदाबाद क्राईम ब्रँचचे एसीपी (ACP) भरत पटेल यांनी प्रसारमाध्यमांसमोर या मर्डर मिस्ट्रीच्या संदर्भात जे धक्कादायक खुलासे केले, ते ऐकून सर्वांचीच झोप उडाली. आरोपी महिला जागृती हिचे पहिले लग्न सुखदेवगिरी गोस्वामी याच्याशी झाले होते, ज्याच्यापासून तिला दोन मुले आहेत. परंतु, लग्नाच्या काही काळानंतरच जागृतीचे मन तिच्याच दीरावर म्हणजेच पतीच्या मोठ्या भावावर, शांतीगिरी यांच्यावर जडले. या दोघांमधील अनैतिक संबंध या थराला गेले की, जागृती आपल्या दोन्ही लहान मुलांना आणि पहिल्या पतीला वाऱ्यावर सोडून जेठ शांतीगिरी याच्यासोबत पळून गेली. या दोघांनी नंतर लग्न केले आणि ते दुसऱ्या एका गावात भाड्याने घर घेऊन पती-पत्नी म्हणून राहू लागले. मात्र, जागृतीच्या अनैतिक संबंधांचे जाळे इथेच थांबले नाही, कारण तिचा हा दुसरा पती शांतीगिरी हा पेशाने ट्रक ड्रायव्हर होता. तो जेव्हा जेव्हा माल घेऊन आपल्या ट्रकसह प्रवासावर निघायचा, तेव्हा सुमारे 20 ते 25 दिवसांनंतरच घरी परतत असे. पतीच्या याच दीर्घ अनुपस्थितीचा आणि घरातल्या एकटेपणाचा गैरफायदा घेऊन जागृती आपल्याच शेजारी राहणाऱ्या कांतीलाल ऊर्फ भरत साबरिया याच्या प्रेमात पडली. कांतीलाल तिच्या प्रेमात इतका वेडा झाला होता की, त्याने जाणीवपूर्वक शांतीगिरीशी मैत्री केली आणि त्यांच्या घराच्या अगदी जवळ एक खोली भाड्याने घेतली. शांतीगिरी घराबाहेर जाताच या दोघांचे उघडपणे भेटणे सुरु झाले आणि अनैतिक कृत्य सुरू व्हायचे.
हेही वाचा : पालघर: वऱ्हाडाच्या ट्रकवर कंटेनर आदळला, भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू
सुपारी किलरकडून फसवणूक अन् स्वतःच आवळला गळा
जेव्हा जेव्हा शांतीगिरी आपल्या ट्रक फेरीवरून घरी परत येत असे, तेव्हा तो जागृती आणि कांतीलाल यांच्या प्रेमसंबंधांच्या आड येऊ लागला. यातूनच त्या दोघांनी त्याला कायमचे रस्त्यातून हटवण्याचा भयानक कट रचला. सुरुवातीला कांतीलाल आणि जागृती यांनी शांतीगिरीची हत्या करण्यासाठी युनिस नावाच्या एका व्यक्तीला 25 हजार रुपयांची सुपारी दिली होती. युनिस एका रात्री शांतीगिरीचा गेम करण्यासाठी त्याच्या खोलीत घुसला खरा, पण तिथे शांतपणे झोपलेल्या शांतीगिरीला पाहून त्याची हिम्मत झाली नाही. शातीर युनिसने एक नामी युक्ती लढवली; त्याने झोपलेल्या शांतीगिरीचा आपल्या मोबाईलवर एक फोटो काढला आणि तो जागृतीला पाठवून दिला. आपण शांतीगिरीचा काटा काढला आहे, असा खोटा निरोप देऊन त्याने जागृतीकडून हत्येचे 25 हजार रुपये वसूल केले आणि तो तिथून फरार झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा जागृतीने आपल्या पतीला जिवंत फिरताना आणि आरामात चहा पिताना पाहिले, तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने तात्काळ ही फसगत आपल्या मुख्य प्रियकराला म्हणजेच कांतीलालला सांगितली. सुपारी किलरकडून मिळालेल्या या धोक्यानंतर, आता या दोघांनी स्वतःच शांतीगिरीची हत्या करण्याचे निश्चित केले आणि संधी मिळताच त्यांनी शांतीगिरीला घरातच गाठून त्याच्यावर हल्ला केला.
चौथ्या प्रियकराच्या मदतीने मृतदेहाची विल्हेवाट आणि पोलिसांची कारवाई
क्राईम ब्रँचचे एसीपी भरत पटेल यांनी सांगितले की, प्रत्यक्ष हत्येच्या वेळी मुख्य प्रियकर कांतीलाल याने शांतीगिरीचा गळा अत्यंत ताकदीने आवळला, तर पत्नी जागृतीने बेडवरील उशी घेऊन शांतीगिरीचे तोंड आणि नाक तोपर्यंत दाबून धरले, जोपर्यंत त्याची श्वासोच्छवास पूर्णपणे थांबला नाही. हत्येनंतर प्रचंड घाबरलेल्या या दोघांनी तातडीने शांतीगिरीचा मृतदेह खोलीत असलेल्या बेडच्या (पलंग) मागे लपवून ठेवला. आता त्यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान हे मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे होते. यासाठी जागृतीने वेळ न घालवता थेट आपल्या चौथ्या आशिकाला म्हणजेच दीपक ऊर्फ मुन्ना याला फोन लावला. दीपक देखील जागृतीसाठी काहीही करण्यास तयार होता, त्यामुळे तो आपल्या एका मित्राची कार मागून घेऊन आला. यानंतर जागृती, मुख्य प्रियकर कांतीलाल आणि मदत करणारा हा चौथा प्रियकर दीपक या तिघांनी मिळून शांतीगिरीचा मृतदेह कारमध्ये टाकला आणि तो धांगध्रा येथील कालव्यात फेकून दिला, जेणेकरून हा एक अपघात वाटावा. हत्येनंतर या प्रकरणावर पांघरूण घालण्यासाठी जागृती आणि कांतीलाल यांनी गावात अशी अफवा पसरवली की, शांतीगिरीला कुठे तरी खूप दूर एक चांगली नोकरी मिळाली आहे आणि तो आपला ट्रक घेऊन गेला आहे, तसेच त्याचा मोबाईल नंबरही बदलला असून तो काही महिन्यांनंतरच परत येईल.
या संपूर्ण कारस्थानाचा भांडाफोड झाल्यानंतर अहमदाबाद क्राईम ब्रँचच्या पथकाने मुख्य आरोपी पत्नी जागृती आणि तिचा मुख्य प्रियकर कांतीलाल या दोघांना अटक केली आहे. आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या दोघांची कस्टडी पुढील तपासासाठी सुरेंद्रनगर पोलिसांकडे सोपवली जाणार आहे. याशिवाय, मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आणि पुरावे नष्ट करण्यात मदत करणाऱ्या जागृतीच्या चौथ्या प्रियकरावर म्हणजेच दीपक ऊर्फ मुन्ना याच्यावरही सुरेंद्रनगर पोलिसांकडून कडक कायदेशीर कारवाई केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणात अत्यंत थक्क करणारी बाब म्हणजे, जागृतीचा पहिला पती सुखदेवगिरी हा आजही आपल्या स्वतःच्या दोन मुलांसोबतच, जागृती आणि तिच्या दीरापासून म्हणजेच मृत शांतीगिरीपासून जन्माला आलेल्या तिसऱ्या मुलाचाही सांभाळ एकटाच करत आहे.
ADVERTISEMENT











