Crime News : कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूमधील अनेकल परिसरात अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. होन्नाकलासपूर येथील रहिवासी आणि रिअल इस्टेट एजंट गोपाळ ऊर्फ गोपी यांचे गुंडांनी फिल्मी स्टाईलने अपहरण केले आणि त्यानंतर तामिळनाडूमध्ये नेऊन त्यांची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून संतप्त नातेवाईकांनी आरोपींच्या घरावर दगडफेक केल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
ही घटना 8 मार्च रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली असून गोपाळ हे त्यांचे मित्र सतीश यांच्यासोबत कारने घरी परतत होते. करपूर गेटजवळ दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या कारला मुद्दाम धडक दिली. अपघाताचा अंदाज घेऊन गोपाळ आणि त्यांचा मित्र कारखाली उतरताच हल्लेखोरांनी त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. डोळ्यांची जळजळ होत असल्याने गोपाळ यांना काही समजण्याच्या आतच गुंडांनी त्यांना जबरदस्तीने स्वतःच्या कारमध्ये टाकून तिथून पळ काढला.
हेही वाचा : शेतात जातो असे सांगून अल्पवयीन मुलगा घरी परतला नाही, 15 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, मृतदेह नाल्यात आढळला
पोलीस तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार या हत्येमागे मोहन बाबू नावाच्या व्यक्तीचा हात असल्याचा संशय आहे. गोपाळ आणि मोहन बाबू हे पूर्वी रिअल इस्टेट व्यवसायात एकत्र काम करत होते. मात्र त्यांच्यातील वादाचे मूळ 10 वर्षांपूर्वीचे आहे. गोपाळ यांनी स्वाती नावाच्या तरुणीशी लग्न केले होते. ज्या तरुणीवर मोहन बाबूचे एकतर्फी प्रेम होते. याशिवाय व्यवसायातील प्रगतीमुळे देखील तो गोपाळ यांचा द्वेष करत होता आणि दोन वर्षांपूर्वीही त्याने गोपाळ यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
अपहरणांनंतर सतीश यांनी तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. परंतु 9 मार्च रोजी तामिळनाडूतील डेनकनिकोटे येथे गोपाळ यांचा मृतदेह आढळून आला. हत्येची बातमी पसरताच नातेवाईकांनी अनेकल पोलीस ठाण्याला घेराव घातला आणि आरोपीच्या घरावर दगडफेक केली. दरम्यान मुख्य आरोपी मोहन बाबू यानेही आत्महत्या केल्याची चर्चा आहे मात्र याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या प्रकरणात 25 लाख रुपयांच्या सुपारीचा कोनातून पोलीस आता अधिक तपास करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











