Crime News : बहिणीच्या प्रेमप्रकरणातून झालेल्या वादात एका 16 वर्षीय भावाला आपला जीव गमवावा लागला आहे. बहिणीच्या प्रियकरानेच ही हत्या केल्याचे समोर आले आहे. किशोर असं 16 वर्षीय मृत मुलाचं नाव आहे. याप्रकरणी शाहिद अन्सारी या 24 वर्षीय तरुणासह त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. किशोरची हत्या करुन त्याचा मृतदेह एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत फेकून देण्यात आला होता. अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी या हत्याकांडाचा उलगडा केला असून या हत्येमागील धक्कादायक कारण समोर आले आहे. झारखंडची राजधानी रांची येथील हे प्रकरण आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : जवानाच्या डोक्यावर विळ्याने सपासप वार, 'त्या' कारणामुळे बायको उठली जीवावर!
अपमानाचा बदला
या प्रकरणातील मुख्य आरोपी शाहिद अन्सारी याचे मृत मुलाच्या बहिणीशी प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी शाहिद त्या मुलीला भेटण्यासाठी लोहरदगा येथे गेला होता. मात्र तिथे मुलीच्या कुटुंबीयांनी त्याला रंगेहात पकडले आणि त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे शाहिदला अपमानित झाल्यासारखे वाटत होते. याअपमानाचा बदला घेण्यासाठी त्याने मुलीच्या भावाला संपवण्याचा कट रचला. या कटात त्याने आपल्या काही साथीदारांनाही सामील करुन घेतले होते.
इमारतीत फेकला मृतदेह
हत्येच्या दिवशी शाहिदने किशोरला नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका निर्जन ठिकाणी बोलावले. किशोर तिथे पोहोचताच शाहिद आणि त्याच्या साथीदारांनी पूर्वनियोजित कटानुसार त्याच्यावर चाकू आणि दांडक्याने हल्ला चढवला. आरोपींनी अत्यंत निर्घृणपणे त्याची हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जवळच असलेल्या एका निर्माणाधीन इमारतीत फेकून दिला. घटनेनंतर आरोपी पसार झाले होते. मात्र पोलिसांनी तपासचक्र फिरवत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तपासादरम्यान पोलिसांनी हत्येसाठी वापरलेला चाकू, दांडके आणि गुन्ह्याच्या वेळी आरोपींनी घातलेले कपडेही जप्त केले आहेत.
हे ही वाचा : मंदिरात एकटी आल्याचं पाहिलं, अन् 3 तरुण 'दिल ना दिया' म्हणत मागे लागले; शेवटी तरुणीने काय केलं? पाहा VIDEO
आरोपींना अटक
या घटनेमुळे पीडित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी पकडलेल्या दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली जात असून या कटात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करुन त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्याची प्रक्रिया सुरि आहे. वैयक्तिक वादातून एका निष्पाप अल्पवयीन मुलाचा बळी गेल्यामुळे या समाजातील वाढत्या हिंसक प्रवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
ADVERTISEMENT











