बीड : बीड जिल्ह्यात हिंसक घटनांची मालिका अजूनही सुरूच आहे. अशातच आता तांदळवाडी भिल्ल गावात शेतीच्या बांधाच्या वादातून कैलास सांगुळे या तरुणावर चौघांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. हल्लेखोरांनी "तुझा संतोष देशमुख करतो" अशी धमकी देत तरुणाच्या डोक्यावर, तोंडावर आणि मानेवर कोयत्याने 10 हून अधिक वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या कैलासवर बीडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
ADVERTISEMENT
गाडी चालवत असतानाच मागून वार केले
सोमवारी (16 जून) रोजी सकाळी ही घटना घडली. कैलास गाडी चालवत असताना हल्लेखोरांनी त्याला रस्त्यात गाठून पाठीमागून कोयत्याने सपासप वार केले. "संतोष देशमुख करू" आणि "सोडू नका, जीव मार" अशा धमक्या देत हल्लेखोरांनी क्रूरपणे हल्ला केला. या हल्ल्यात कैलास जागेवरच बेशुद्ध पडला. हल्ल्याची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल केलं.
गुन्हा दाखलही नाही, आरोपी मोकाट
बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात अद्यापही गुन्हा दाखल झालेला नाही. आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत असे आरोप करत कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. "माझ्या भावाचं काही बरं-वाईट झालं तर पोलीस प्रशासन जबाबदार राहील," असा आक्रोश नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. पोलिसांना तात्काळ आरोपींना अटक करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा >> नोकरीसाठी तरुणी मुंबईला आली आणि झाला अपेक्षाभंग, आत्महत्या केली अन् सुसाईड नोटमध्ये...
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने जिल्ह्यात खळबळ उडवली होती. आता या हल्ल्यात "संतोष देशमुख" यांच्या नावाचा उल्लेख करत धमकी देण्यात आल्याने या प्रकरणाला वेगळं गांभीर्य प्राप्त झालं आहे.
पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई न केल्याने स्थानिकांमध्ये नाराजी पसरली आहे. या प्रकरणी पुढील तपास आणि कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT
