एक 26 वर्षीय कबड्डीपटू अन् 25 हल्लेखोर, कुणी कुणाला संपवलं?

एका कबड्डीपटूची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. 25 जणांच्या एका टोळक्याने बेदम मारहाण करत त्याची हत्या केली.

Crime News

Crime News

मुंबई तक

13 Jun 2026 (अपडेटेड: 13 Jun 2026, 12:46 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

एक कबड्डीपटू अन् 25 हल्लेखोर

point

कुणी कुणाला संपवलं?

Crime News : एका 26 वर्षीय राज्यस्तरीय कबड्डीपटूची काठ्या आणि लोखंडी सळ्यांनी बेदम मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मनोज असे मृत खेळाडूचे नाव असून, तो राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील रावर गावचा रहिवासी होता. गुरुवारी (11 जून) रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली. मनोज त्याच्या स्कॉर्पिओ गाडीतून दोन मित्रांसह पाली येथे जात असताना, 4 ते 5 गाड्यांमधून आलेल्या 20 ते 25 हल्लेखोरांनी त्याचे अपहरण केले आणि त्याला बेदम मारहाण करून लांबा गावाजवळ फेकून दिले.

हे वाचलं का?

डोके, हात अन् पायांवर वार

मनोजच्या चुलत भावाने दिलेल्या माहितीनुसार, मनोज गुरुवारी रात्री नवीन वाहन खरेदी करण्यासाठी 8 लाख रुपये घेऊन पालीसाठी निघाला होता. त्यांची गाडी पाली जिल्ह्यातील शिवपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोहोचली असता, हल्लेखोरांनी त्यांची स्कॉर्पिओ अडवली. हल्लेखोरांनी मनोजला बळजबरीने स्वतःच्या गाडीत ओढले, तर त्याच्यासोबत असलेल्या इतर दोन मित्रांनी तिथून पळ काढून जीव वाचवला. यानंतर आरोपींनी मनोजला बिलाडा भागात नेऊन त्याच्या डोक्यावर, हातावर आणि पायांवर काठ्या व लोखंडी सळ्यांनी वार केले.

हे ही वाचा : धाराशिव : सरकारी कर्मचाऱ्याला 'लुटेरी दुल्हन'ने 27 लाखांना लुटले, कसं टाकलं जाळं?

नातेवाईकांचे आंदोलन

ग्रामस्थांकडून माहिती मिळाल्यानंतर मनोजच्या नातेवाईकांनी आणि मित्रांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्याला बेशुद्ध अवस्थेत जोधपूरच्या मथुरादास माथूर (MDM) रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी आणि ग्रामस्थांनी आरोपींच्या अटकेची मागणी करत रुग्णालयाच्या शवागाराबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे. याप्रकरणी पाली जिल्ह्यातील शिवपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, मनोजसोबत असलेल्या दोन मित्रांची पोलीस कसून चौकशी करत आहेत.

हे ही वाचा : राजघराण्यातील सवतींमध्ये वाद, एकीने रायफल काढली अन्...; धक्कादायक प्रकरण

जुन्या वैमनस्यातून हल्ला

पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार मनोजचा आरोपींसोबत पूर्वी काही वाद झाला होता आणि त्याच्याविरुद्ध बिलाडा पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हाही दाखल होता, ज्यामध्ये पोलीस त्याचा शोध घेत होते. याच जुन्या वैमनस्यातून हा हल्ला झाला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. आरोपी जोधपूर जिल्ह्यातीलच असून त्यांना लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.