Nuclear War: अर्ध्या तासात 10 कोटी लोकांचा मृत्यू, जाणून घ्या अणुयुद्ध झाल्यास काय होईल?

अचानक सकाळी मोठा आवाज झाला आणि क्षणार्धात हजारो लोक मेले तर? प्रचंड मोठा स्फोटानंतर सर्वत्र शांतता आणि काही वेळाने लोकांच्या रडण्याचा, किंचाळण्याचा आवाज येऊ लागला तर? असाच काहीसा प्रकार ऑगस्ट 1945 मध्ये घडला होता. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुहल्ला केला होता. हे हल्ले इतके जोरदार होते की काही मिनिटांतच लाखो लोक मरण […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:49 AM • 02 Mar 2022

follow google news

अचानक सकाळी मोठा आवाज झाला आणि क्षणार्धात हजारो लोक मेले तर? प्रचंड मोठा स्फोटानंतर सर्वत्र शांतता आणि काही वेळाने लोकांच्या रडण्याचा, किंचाळण्याचा आवाज येऊ लागला तर? असाच काहीसा प्रकार ऑगस्ट 1945 मध्ये घडला होता. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुहल्ला केला होता. हे हल्ले इतके जोरदार होते की काही मिनिटांतच लाखो लोक मरण पावले आणि त्यानंतरही वर्षानुवर्षे लोक मृत्यूमुखी पडतच होते.

हे वाचलं का?

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात पुन्हा अणुयुद्धाचा धोका वाढला आहे. ही लढत जवळपास निर्णायक वळणावर आली असली तरी धोका टळलेला नाही. अमेरिकेसह पाश्चिमात्य देश युक्रेनला मदत करत आहेत आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आधीच इशारा दिला आहे की, इतर देशांनी हस्तक्षेप केल्यास असे परिणाम होतील की जे यापूर्वी कधीही पाहिले गेले नाहीत. काही तज्ज्ञांच्या मते, पुतिन यांचा हा इशारा म्हणजेच अणुयुद्धाला सुरुवात होऊ शकते.

जपानवर झालेल्या अण्वस्त्र हल्ल्यातून जे वाचले ते आजही तो दिवस आठवून प्रचंड घाबरतात. अणुयुद्धामुळे फक्त आणि फक्त विनाशच होऊ शकतो. दुसरं काहीही हाती लागणार नाही.

अणुयुद्ध झाले तर काय होईल?

द इंटरनॅशनल कॅम्पेन टू अबॉलिश न्यूक्लियर वेपन (ICAN) ही स्वित्झर्लंडमधील संस्था आहे. या संस्थेला 2017 मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कारही मिळाला आहे. ICAN च्या मते, एक अणुबॉम्ब एका झटक्यात लाखो लोकांचा बळी घेईल. त्याच वेळी, जर 10 किंवा शेकडो बॉम्ब पडले, तर लाखो मृत्यू तर होतीलच पण पृथ्वीची संपूर्ण हवामान व्यवस्था बिघडेल.

कोट्यवधी लोकांचे मृत्यू होतील

ICAN च्या मते, एक अणुबॉम्ब संपूर्ण शहर नष्ट करेल. आजच्या काळात अनेक अण्वस्त्रे वापरली गेली तर त्यात करोडो लोक मारले जातील. त्याचवेळी, अमेरिका आणि रशियामध्ये मोठे अणुयुद्ध झाले तर मृतांचा आकडा 10 कोटींचा देखील पुढे असेल.

मुंबई, जिथे प्रत्येक एक किलोमीटरच्या परिघात 1 लाखांहून अधिक लोक राहतात, तिथे हिरोशिमासारखा अणुबॉम्ब पडला तर आठवडाभरात 8.70 लाखांहून अधिक मृत्यू होतील. अमेरिका आणि रशिया यांच्यातील अणुयुद्धात 500 अणुबॉम्ब वापरल्यास अर्ध्या तासात 10 कोटींहून अधिक लोक मारले जातील.

एवढेच नाही तर जगात सध्या 1% पेक्षा कमी अण्वस्त्रे युद्धात वापरली गेली तरी 2 अब्ज लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर येतील. यासोबतच संपूर्ण आरोग्य यंत्रणाही उद्ध्वस्त होईल, त्यामुळे जखमींना उपचार देखील मिळू शकणार नाहीत.

संपूर्ण पृथ्वीची व्यवस्था विस्कळीत होईल

हिरोशिमावर जो अणुबॉम्ब टाकण्यात आला होता, त्याच आकाराचे जर 100 बॉम्ब टाकण्यात आले तर पृथ्वीची संपूर्ण व्यवस्था बिघडेल. अशा हल्ल्यामुळे हवामान व्यवस्थेवर वाईट परिणाम होऊन शेतीही नष्ट होईल.

सध्या जग ग्लोबल वॉर्मिंगशी झुंजत आहे, पण अणुयुद्धामुळे पृथ्वीचे तापमान झपाट्याने कमी होऊ लागेल. कारण या हल्ल्यांमुळे इतका धूर निघेल की पृथ्वीच्या पृष्ठभाग गोठून जाईल. असा अंदाज आहे की जेव्हा असं काही घडेल तेव्हा किमान 10% ठिकाणी सूर्यप्रकाश पोहचू शकणार नाही.

त्याच वेळी, जर जगभरातील सर्व अण्वस्त्रे वापरली गेली, तर पृथ्वीच्या स्ट्रॅटोस्फियरमध्ये 150 मिलियन टन धूर गोठेल. स्ट्रॅटोस्फियर हा पृथ्वीचा बाह्य पृष्ठभाग आहे जो ओझोन थराच्या वर आहे.

एवढेच नाही तर जगातील बहुतांश भागात पाऊस पडणार नाही. जागतिक पर्जन्यमान 45% ने कमी होईल आणि यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान -7 ते -8 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. याची तुलना केल्यास 18 हजार वर्षांपूर्वी जेव्हा हिमयुग होतं तेव्हा तापमान -5 डिग्री सेल्सियस होते. म्हणजेच जग 18 हजार वर्षे मागे जाईल.

हिरोशिमा-नागासाकीवर हल्ला झाला तेव्हा काय घडलेलं?

दुसऱ्या महायुद्धात जपान गुडघे टेकायला तयार नव्हता. तेव्हा अमेरिकेने त्यांच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकले. हिरोशिमावर 6 ऑगस्ट 1945 आणि नागासाकीवर 9 ऑगस्ट 1945 रोजी बॉम्ब टाकण्यात आले होते.

1945 च्या अखेरीस हिरोशिमावर पडलेल्या बॉम्बमुळे 1.40 लाख लोकांचा मृत्यू झाला होता. नागासाकीवर टाकलेल्या बॉम्बचे किरणोत्सर्ग पर्वतांमुळे केवळ 6.7 किमीपर्यंत पसरले होते. 1945 च्या अखेरीस 74 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. हल्ल्यानंतर जमिनीच्या पृष्ठभागाचे तापमान 4 हजार अंश सेल्सिअसवर पोहोचले होते.

Russia Ukraine war : रशियाकडून युक्रेनमध्ये अंदाधूंद हवाई हल्ले; खेरसन शहर घेतलं ताब्यात

जेव्हा एखादा अणुबॉम्ब पडतो तेव्हा त्याचा विनाश व्हायला फक्त 10 सेकंद लागतात. पण त्याचा प्रभाव अनेक दशके टिकतो. बॉम्बस्फोटानंतर अनेक वर्षे लोक अजूनही ल्युकेमिया, कर्करोग आणि फुफ्फुसाच्या धोकादायक आजारांशी लढत होते. एवढेच नाही तर लाखो लोकांची दृष्टी गेली होती.