मुस्लिम राष्ट्रांमध्येही अजानसाठी भोंगे नसतात, मग भारतातच का?- अनुराधा पौडवाल

मुंबई तक

• 03:30 AM • 08 Apr 2022

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला जे भाषण केलं. त्यानंतर मशिदीवरच्या भोंग्यांचा मुद्दा चांगलाच गाजतोय. या वादात आता सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनीही उडी घेतली आहे. मुस्लिम राष्ट्रांमध्येही मशिदीवर भोंगे नसतात मग भारतातच ते का असतात ? असा प्रश्न अनुराधा पौडवाल यांनी विचारला आहे. काही वर्षांपूर्वी सोनू निगमने असंच मशिदीच्या भोंग्याबाबत वक्तव्य केलं होतं, तेव्हा […]

Mumbaitak
follow google news

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला जे भाषण केलं. त्यानंतर मशिदीवरच्या भोंग्यांचा मुद्दा चांगलाच गाजतोय. या वादात आता सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनीही उडी घेतली आहे. मुस्लिम राष्ट्रांमध्येही मशिदीवर भोंगे नसतात मग भारतातच ते का असतात ? असा प्रश्न अनुराधा पौडवाल यांनी विचारला आहे. काही वर्षांपूर्वी सोनू निगमने असंच मशिदीच्या भोंग्याबाबत वक्तव्य केलं होतं, तेव्हा त्याला माफी मागावी लागली होती. तसंच आपले केसही काढावे लागले होते. आता अनुराधा पौडवाल यांनी या वादात उडी घेतली आहे.

हे वाचलं का?

‘ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील त्याच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि..’, राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

काय म्हणाल्या अनुराधा पौडवाल?

‘मी गाण्याच्या निमित्ताने देशविदेशात फिरले आहे. मी कुठेही असं पाहिलं नाही. मुस्लिम राष्ट्रांमध्येही मशिदींवर भोंगे नाहीत. मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मात्र भारतात या सगळ्याला कारण नसताना जास्त महत्त्व दिलं जातं आहे. मशिदींवर भोंगे लावून अजान केली जाते. मिडल इस्टमध्ये अजानवर बंदी घालण्यात आली आहे. मुस्लिम देशांमध्येही लाऊडस्पीकर नाहीत तरीही भारतातच का?’ असा प्रश्न अनुराधा पौडवाल यांनी विचारला आहे.

अनुराधा पौडवाल यांनी हेदेखील म्हटलं आहे की जर देशात अशाच पद्धतीने मशिदीवरचे भोंगे सुरू राहिले तर लोकं हनुमान चालीसाही लाऊडस्पीकर लावूनच म्हणतील. याचा फायदा काय होणार? तर काहीही नाही अकारण वाद वाढला जाईल असं होणं हे खूपच क्लेशदायक आहे. रमजानचा महिना सुरू झाला आहे अशात अनुराधा पौडवाल यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यामुळे हा वाद पेटणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सोनू निगमने जेव्हा मशिदीबाबत वक्तव्य केलं होतं तेव्हा अनेक धर्मगुरू त्याच्या विरोधात उभे ठाकले होते. त्यानंतर त्याला माफीही मागावी लागली होती आणि आपले केसही काढावे लागले होते.

आधी कुटुंबाला सांगा मुंबई महापालिकेत जाऊ नका; राज ठाकरे कडाडले! भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

काय होतं सोनू निगमचं वक्तव्य?

२०१७ मध्ये सोनू निगमने एक ट्विट केलं होतं. ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. मशिदीवरचे लाऊडस्पीकर ही एक प्रकारची गुंडगिरी आहे, या आशयाचं ट्विट सोनू निगमने केलं होतं. एवढंच नाही तर मशिदीवरचे भोंगे वाजतात मी मुस्लिम नाही तरीही मला त्या अजानच्या आवाजाने उठावं लागतं. भारतात धर्माच्या नावावर सुरू असलेली जबरदस्ती कधी थांबणार? असा प्रश्नही सोनूने विचारला होता. यावरून बराच वाद निर्माण झाला होता. त्यानंतर सोनू निगमच्या विरोधात फतवाही जारी झाला होता. यानंतर सोनू निगमला माफी मागावी लागली तसंच केस काढून मुंडणही करावं लागलं होतं.

    follow whatsapp