जरा जपून… ‘त्या’ ट्विटवरुन शरद पवारांचा सचिनला सल्ला

देशातील शेतकरी आंदोलनाबाबत पॉप स्टार रिहानाने केलेलं ट्विट आणि त्यानंतर त्याला प्रत्युत्तर स्वरुपात केलेलं सचिन तेंडुलकरचं ट्विट यावरुन सध्या देशात बराच वादंग सुरु आहे. याच सगळ्या गदारोळात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सचिनला ‘एक’ सल्ला दिला आहे. ‘आपलं क्षेत्र सोडून इतर गोष्टींबाबत बोलताना जरा काळजी घ्यावी.’ अशा शब्दात पवारांनी सचिनला कानपिचक्या दिल्या आहेत. […]

mumbaitak

mumbaitak

मुंबई तक

• 01:27 PM • 06 Feb 2021

follow google news

देशातील शेतकरी आंदोलनाबाबत पॉप स्टार रिहानाने केलेलं ट्विट आणि त्यानंतर त्याला प्रत्युत्तर स्वरुपात केलेलं सचिन तेंडुलकरचं ट्विट यावरुन सध्या देशात बराच वादंग सुरु आहे. याच सगळ्या गदारोळात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सचिनला ‘एक’ सल्ला दिला आहे. ‘आपलं क्षेत्र सोडून इतर गोष्टींबाबत बोलताना जरा काळजी घ्यावी.’ अशा शब्दात पवारांनी सचिनला कानपिचक्या दिल्या आहेत. पुण्यातील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.

हे वाचलं का?

नव्या कृषी कायद्याला विरोध करताना शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन सुरु केलं आहे. यावरुन विरोधकांनी देखील सरकारला सातत्याने धारेवर धरलं आहे. अशावेळी रिहानाच्या ट्विटनंतर सचिन तेंडुलकरने केलेल्या ट्विटमुळे देशात बऱ्याच वेगवेगळ्या स्वरुपाच्या प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. याचबाबत आज (शनिवार) जेव्हा शरद पवारांना विचारण्यात आलं की, कृषी कायद्याबाबत सचिनने केलेल्या ट्विटबाबत आपलं मत काय आहे? त्यावर बोलताना पवार म्हणाले की, ‘आपलं क्षेत्र सोडून इतर गोष्टींबाबत बोलताना जरा काळजी घ्यावी. असा माझा सचिनला सल्ला आहे. ‘सेलिब्रिटी आणि सचिन तेंडुलकरच्या प्रतिक्रियांवर अनेक सामान्य लोक तीव्रपणे व्यक्त होत आहेत. त्यामुळे आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी. असा माझा सचिनला सल्ला राहील.’

पाहा शेतकरी आंदोलनावर शरद पवार काय म्हणाले:

‘सरकारने वरिष्ठ पातळीवर चर्चा करावी कदाचित त्यातून मार्ग निघण्याची शक्यता आहे. याशिवाय शेतकरी नेत्यांनी सुद्धा सरकारशी चर्चा करावी. स्वातंत्र्यानंतर कधीही असं घडलं नाही. सरकारने ही टोकाची भूमिका घेतल्यावरुन त्यांचे धोरण काय आहे हे स्पष्ट होतं. अन्नदाता जर रस्त्यावर बसतोय तर त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. इतके दिवस जर ते रस्त्यावर बसतायत तर त्याचा विचार करायला पाहिजे. त्यामुळेच आपल्याला आंतरराष्ट्रीय पातळीवरून देखील याची दखल घेतली गेल्याचं पाहायला मिळत आहे. आपले पंतप्रधान तिकडे बोलले होते आणि आता त्याची प्रतिक्रिया येत आहे.’ असं म्हणत पवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

    follow whatsapp