महाविकास आघाडीच्या ‘महामोर्चा’ला भाजप देणार उत्तर! राज्यभरात “माफी मांगो” आंदोलन

मुंबई तक

17 Dec 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:34 AM)

मुंबई : पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल जरदारी भूट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भारतात वातावरण तापलं आहे. त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज (शनिवारी) भाजपकडून देशभरात निदर्शन करण्यात येणार आहेत. राज्यातही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात मुंबईत निदर्शन होणार आहेत. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची काही वादग्रस्त विधानं, भाजप नेत्यांकडून केली गेलेली काही […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल जरदारी भूट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भारतात वातावरण तापलं आहे. त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून आज (शनिवारी) भाजपकडून देशभरात निदर्शन करण्यात येणार आहेत. राज्यातही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात मुंबईत निदर्शन होणार आहेत.

हे वाचलं का?

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची काही वादग्रस्त विधानं, भाजप नेत्यांकडून केली गेलेली काही वक्तव्य या सगळ्याचा निषेध म्हणून आज महाविकास आघाडीचा मोर्चा राज्यव्यापी महामोर्चा निघणार आहे. यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, नेते अजित पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सर्वंच प्रमुख नेते सहभागी होणार आहेत.

महाविकास आघाडीच्या या महामोर्चाला भाजपही मोर्चानेच उत्तर देणार आहे. हिंदू-देवदेवता आणि महापुरूषांविरोधात वारंवार अपमानास्पद वक्तव्य करून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी समाजाच्या भावना दुखवल्या आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी युएनएससीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात अकलेचे तारे तोडले आहेत, असा आरोप भाजपकडून करण्यात आला असून त्याच्या निषेधार्ह आज संपूर्ण राज्यभरात “माफी मांगो” आंदोलन करण्यात येणार आहे.

उद्धवजींच्या सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची वक्तव्यं सध्या समाजमाध्यमांवर येत आहेत. त्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्र यांचा अपमान, प्रभू श्रीकृष्णाचा उपमर्द, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची खिल्ली, संतश्रेष्ठ एकनाथांची चेष्टा आणि वारकरी संप्रदायांचा अपमान केला आहे. त्या विरोधात प्रचंड जनप्रक्षोभ निर्माण झाला आहे, असाही आरोप भाजपने केला आहे.

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला यावरुन वाद निर्माण करण्याचे प्रयत्न जाणीवपुर्वक खासदार संजय राऊत यांच्याकडून सुरु आहेत. भारतातील संबंध आंबेडकरप्रेमींच्या मनात यामुळे प्रश्न निर्माण झाले आहेत. या विरोधात राज्यभरात माफी मांगो आंदोलन होणार आहे. या आंदोलनात मुंबईमधून चंद्रशेखर बावनकुळे, पुण्यातून चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन जळगावमधून आणि अतुल सावे औरंगाबादमध्ये सहभागी होणार आहेत.

    follow whatsapp