छत्रपती संभाजीनगर हिंसा : देवेंद्र फडणवीसांनी दिली अपडेट, राऊतांना सुनावलं

योगेश पांडे

30 Mar 2023 (अपडेटेड: 30 Mar 2023, 02:44 PM)

मराठवाड्यातील महत्त्वाचं शहर असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये काही समाजकंटकांनी सामाजिक शांतता भंग करत हिंसक कृत्ये केले. या हिंसाचाराबद्दल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. त्याचबरोबर त्यांनी राजकीय नेत्यांना जपून बोलण्याचा सल्ला दिला.

devendra fadnavis first reaction on chhatrapati sambhajinagar violence incident

devendra fadnavis first reaction on chhatrapati sambhajinagar violence incident

follow google news

राम नवमी उत्सवाची तयारी सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये हिंसक घटना घडली. दोन समुदायातील तरुणाच्या गटात वाद होऊन परिस्थिती चिघळली. त्यामुळे रात्रभर शहरात तणाव निर्माण झाला होता. या घटनेवर राजकीय प्रतिक्रिया समोर येत असून, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील सद्यस्थितीबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी राजकीय नेत्यांना सबुरीने बोलण्याचा सल्ला देताना संजय राऊतांना टोला लगावला.

हे वाचलं का?

शहरातील किराडपुरा भागातील राम मंदिरासमोर झालेल्या हिंसक घटनेनंतर छत्रपती संभाजीनगरमधील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेबद्दल भाष्य करताना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा – छत्रपती संभाजीनगर हिंसाचार : रात्री बारा ते दुपारी बारा, काय काय घडलं?

हिंसाचाराच्या घटनेमागे इम्तियाज जलील आणि देवेंद्र फडणवीसांचा हात असल्याचा आरोप अंबादास दानवे यांच्याकडून करण्यात आला. तर हेच सरकारच्याच मनात आहे, असं संजय राऊत म्हणाले. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “संभाजीनगरला घडलेली घटना दुर्दैवी आहे. तिथे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. परंतू काही लोकांचा प्रयत्न आहे की, भडकावणारी विधाने करून परिस्थिती आणखी चिघळली पाहिजे. मला इतकेच म्हणायचे आहे की, अशा स्थितीत नेत्यांनी कसे वागले पाहिजे, हे समजून घेण्याची आवश्यकता आहे.”

स्वार्थासाठी परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे, फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं

“कुणी अशा पद्धतीने चुकीची विधाने करत असतील, तर त्यांनी ती करू नये. सगळ्यांनी शांतता पाळावी. आपले शहर शांत ठेवण्याची जबाबदारी सगळ्या नेत्यांची आहे. याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न कुणी करत असेल, तर त्यापेक्षा अधिक दुर्दैवी काहीच नाहीये. अशा प्रकारची विधाने करणे म्हणजे किती राजकीय बुद्धीने बोलले जात आहे आणि किती छोट्या बुद्धीने बोलले जात आहे, त्याचा हा परिचय आहे.”

Photos : रस्त्यावर दगडं, गाड्यांची राखरांगोळी, छत्रपती संभाजीनगरातील ही दृश्ये बघितली का?

“याक्षणी तिथे शांतता आहे. हीच शांतता तिथे राहिली पाहिजे, असा प्रयत्न सगळ्यांनाच करावा लागेल म्हणून मी म्हटले की काही नेते राजकीय विधाने करून तिथली परिस्थिती बिघडली पाहिजे असा प्रयत्न करत आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांचा हा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी तो तात्काळ बंद करावा. माझी सगळ्यांना विनंती आहे की, शांततेत सगळा कार्यक्रम सगळ्यांनी पार पाडावा. किती लोकांवर गुन्हे दाखल झाले याबद्दलची माहिती लवकरच दिली जाईल,” असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

संजय राऊत छत्रपती संभाजीनगरमधील हिंसाचारावर काय म्हणाले होते?

हिंसाचाराच्या घटनेवर बोलताना राऊत म्हणाले होते की, “या सरकारचा एकमेव हेतू आहे की, या राज्यात अशांतता निर्माण व्हावी. दंगली घडाव्यात. मूळात गृहमंत्री किंवा गृहमंत्रालय अस्तित्वात आहे की नाही, हाच प्रश्न आहे. मी वारंवार सांगतोय की, ते फडणवीस दिसत नाही. हे फडणवीस निराश आणि वैफल्यग्रस्त अवस्थेत काम करताना दिसत आहे. त्याची कारणे शोधावी लागतील आणि ती कारणे जाहीरपणे सांगण्यासारखी नाहीये. त्यांच्या चेहऱ्या नाराजी का आहे. छत्रपती संभाजीनगरला जी परिस्थिती निर्माण झाली आहे, हे सरकारचे अपयश आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी अशा प्रकारचे वातावरण निर्माण व्हावं, ही या सरकारची इच्छा आहे आणि त्यासाठी मिंधे गटाच्या अनेक टोळ्या काम करत आहेत”, असा गंभीर आरोप खासदार राऊत यांनी केला आहे.

    follow whatsapp