Dhananjay Munde : अतिवृष्टी मदतीसाठी निकषाबाहेरील जिल्ह्यांना 755 कोटी, मग बीडला 17 लाख का?

मुंबई तक

13 Oct 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:43 AM)

बीड : अतिवृष्टी आणि पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे, त्याचबरोबर विविध कीड व रोगराईने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या नुकसानाची भरपाई म्हणून राज्य सरकारने अतिवृष्टी निकषात बसत नसलेल्या, परंतु नुकसान झालेल्या क्षेत्रासाठी आज (गुरुवारी) 755 कोटींची अधिकची मदत जाहीर केली. प्रचलित दरापेक्षा दुप्पट दराने शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. मात्र या मदतीवरुन […]

Mumbaitak
follow google news

बीड : अतिवृष्टी आणि पावसाने शेतीचे नुकसान झाले आहे, त्याचबरोबर विविध कीड व रोगराईने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. या नुकसानाची भरपाई म्हणून राज्य सरकारने अतिवृष्टी निकषात बसत नसलेल्या, परंतु नुकसान झालेल्या क्षेत्रासाठी आज (गुरुवारी) 755 कोटींची अधिकची मदत जाहीर केली. प्रचलित दरापेक्षा दुप्पट दराने शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. मात्र या मदतीवरुन माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी संताप व्यक्त केला.

हे वाचलं का?

धनंजय मुंडे काय म्हणाले?

बीड जिल्ह्यातील केवळ 160 शेतकरी बाधित असल्याचं दाखविण्यात आलं असून, 17 लाखांची मदत घोषित करण्यात आली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याआधीही अतिवृष्टी व गोगलगायीनी नुकसान केलेल्या पिकांच्या नुकसानीची आकडेवारी पाहता राज्य सरकारनं बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा विक्रम केला असल्याची टीकाही मुंडे यांनी केली.

याआधीही राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसनापोटी 3500 कोटींचे पॅकेज घोषित केले, मात्र त्या पॅकेज मधून देखील बीड जिल्ह्याचे नाव वगळण्यात आले. शेतकऱ्यांची बाजू मांडण्याऐवजी सरकारमध्ये असलेल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी जिल्ह्यात त्या काळात नुकसान झालेच नाही, असा जावई शोध लावला.

त्यानंतर सोयाबीन व अन्य नुकसान झालेल्या पिकांना संबंधित पीक विमा कंपनीने अग्रीम 25% मदत देण्याचा प्रस्ताव चर्चिला गेला, जिल्हा प्रशासनाने 63 पैकी बहुतांश महसुली मंडळांच्या पिकांना अग्रीम देण्याची अधिसूचना देखील संबंधित विमा कंपनीस दिली, मात्र विमा कंपनीने मुजोर भूमिका घेत अग्रीम मदत नाकारली.

गोगलगायींनी नुकसान केलेल्या पिकांसाठी सरकारने तीन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 95 कोटी रुपये मदत घोषित केली, त्यातही बीड जिल्ह्यातील बाधित क्षेत्र कमी दाखवण्यात आले व केवळ 5 कोटी रुपये मदत शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आली.

बीड जिल्ह्यातील शेतकरी सततच्या पावसाने व नुकसानीने त्रस्त आहेत, त्यातच सरकारने कधी निकषांच्या नावाने तर निकषांच्या बाहेर जाऊनही नुकसानच झाले नाही, असा सांगावा करून बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले आहे. किंबहुना सरकारने दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत, अशा परिस्थितीत आमच्या शेतकरी बांधवांनी दिवाळी कशी साजरी करावी? असा सवाल धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.

    follow whatsapp