पुणे: देशातील ज्येष्ठ बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे आज (28 जुलै) सकाळी वृद्धापकाळामुळे निधन झालं. निधनसमयी त्यांचं वय 88 वर्ष होतं. पुण्यात त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. नंदू नाटेकर हे आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकणारे पहिले भारतीय बॅडमिंटनपटू होते. 1956 साली त्यांनी पहिलं आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकलं होतं. नंदू नाटेकर यांच्या पश्चात त्यांचा मुलगा गौरव आणि दोन मुली असा परिवार आहे.
ADVERTISEMENT
दरम्यान, नंदू नाटेकर यांचे पुत्र गौरव नाटेकर यांनी असं म्हटलं आहे की, कोरोनाचं संकट लक्षात घेता शोकसभेचं आयोजन करण्यात येणार नाही. कृपया आपल्या विचारांमध्ये आणि प्रार्थनेत त्यांची आठवण ठेवा.’
नंदू नाटेकर यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण करत दु:ख व्यक्त केलं आहे.
‘आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बॅडमिंटनपटू श्री. नंदू नाटेकर यांचे निधन दुःखदायक आहे. आंतरराष्ट्रीय पदक प्राप्त करणारे ते पहिले भारतीय बॅडमिंटनपटू व क्रीडा क्षेत्रातील अर्जुन पुरस्कारावर नाव कोरणारे पहिले खेळाडू. नाटेकर कुटुंबीयांच्या दुःखात सहसंवेदना व्यक्त करतो. भावपूर्ण श्रद्धांजली!’
1961 साली नंदू नाटेकर यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. मिळाला होता आणि हा पुरस्कार प्राप्त करणारे ते भारतातील पहिले बॅडमिंटनपटू होते. नंदू नाटेकर यांनी तब्बल सहा वेळा राष्ट्रीय अजिंक्यपद जिंकलं आहे. ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी देखील त्यांनी गाठली होती.
नंदू नाटेकर यांचा जन्म मे 1933 साली सांगली येथे झाला होता. त्यांनी आपल्या आवडीनुसार बॅडमिंटनमध्ये करिअर करण्याचं ठरवलं होतं आणि त्यात ते प्रचंड यशस्वी देखील ठरले होते. त्याआधी त्यांनी क्रिकेटमध्ये देखील हात आजमावून पाहिला होता आणि त्यानंतर टेनिस देखील खेळले होते. ते ज्युनिअर लेव्हलला खेळले होते. तसंच प्रसिद्ध खेळाडू रामनाथन कृष्णन विरूद्धही देखील त्यांना सामना खेळला होता.
नंदू नाटेकर हे आपल्या वयाच्या 20व्या वर्षी म्हणजे 1953 साली भारतासाठी बॅडमिंटनचा पहिला सामना खेळले होते. त्यांनी आपल्या कारकीर्दीत बरंच यश संपादन केलं होतं. 1954 मध्ये त्यांनी ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरी गाठली. त्यानंतर ते या स्पर्धेत कधीही खेळले नाही. परंतु ते या स्पर्धेत व्हेटेरन्स प्रकारात खेळले आणि त्यांनी 1980, 1981 मध्ये डबल्समध्ये विजय मिळवला तर 1982 साली त्यांनी दुसरे स्थान पटकावलं होतं.
1951 ते 1963 या काळात थॉमस चषक स्पर्धेत ते भारतीय संघाचा भाग होते आणि 16 पैकी 12 सामने त्यांनी जिंकले होते. यावरुन त्यांच्या यशाचा अंदाज आपल्याला बांधता येऊ शकतो. दुहेरी प्रकारात त्यांनी 16 पैकी आठ सामने जिंकले आणि 1959, 1961 आणि 1963 मध्ये ते संघाचा कर्णधारही होते. त्याने पुरुष एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरीत राष्ट्रीय स्पर्धाही जिंकली होती. 1956 मध्ये क्वालालंपूर येथे आयोजित सेलांगर आंतरराष्ट्रीय स्पर्धा देखील त्यांनी जिंकली होती.
ADVERTISEMENT