मिथिलेश गुप्ता, उल्हासनगर
ADVERTISEMENT
पंढरपूरच्या वारीहून परतताच एका दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये घडली असल्याचं नुकतंच समोर आलं आहे. पती-पत्नीने नेमकी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, या दाम्पत्याची दोन मुलं मात्र या घटनेनंतर पोरकी झाली आहेत.
उल्हासनगरच्या कॅम्प 1 भागातील राजीव गांधीनगर परिसरात सचिन सुतार आणि शर्वरी सुतार हे दाम्पत्य त्यांच्या 6 आणि 4 वर्षांच्या दोन मुलांसह राहत होते. रविवार (22 नोव्हेंबर) सकाळी या जोडप्यानं राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, जेव्हा मुलांनी आपल्या आई-वडिलांना गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं तेव्हा त्यांनी त्यांच्या शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली.
सचिन सुतार हे सुतारकाम करत होते. त्यांच्यावर कोणतंही कर्ज नव्हतं, किंवा आर्थिक अडचणही नव्हती. अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. आत्महत्या करण्यापूर्वी सचिन सुतार हे पत्नी आणि मुलांसह कार्तिकी एकादशीला पंढरपूरला देखील जाऊन आले होते. त्यानंतर शुक्रवारी ते शर्वरी यांच्या माहेरी चिपळूणला जाऊन आले, तर शनिवारी ते त्यांच्या वडिलांकडे डोंबिवलीला देखील जाऊन आले होते.
दरम्यान, शनिवारी रात्री हे दाम्पत्य मुलांसोबत जेवण करून झोपी गेले. पण सकाळी त्यांनी गळफास घेतल्याचं आढळून आलं. ज्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली. आपलं आयुष्य संपविण्याचा निर्णय घेऊनच हे दाम्पत्य देवदर्शन आणि परिवाराला भेटण्यासाठी गेल्याची शक्यता दर्शविली जात आहे. या घटनेनंतर त्यांची दोन लहान मुलं मात्र अनाथ झाली आहेत. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुण्यात फेसबुक लाइव्ह करून तेराव्या मजल्यावरून उडी मारत वेटरची आत्महत्या
या घटनेप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
ADVERTISEMENT