कुणाल कामराचा माफी मागण्यास नकार, दाखल केलं भन्नाट प्रतिज्ञापत्र

मुंबई तक

• 12:04 PM • 29 Jan 2021

कॉमेडियन कुणाल कामराने सुप्रीम कोर्टाची माफी मागण्यास सपशेल नकार दिला आहे. मी जे काही ट्विट केले होते आणि त्या विरोधात ज्यांनी याचिका दाखल केली होती त्या याचिकाकर्त्यांना विनोदबुद्धी नाही असं मला वाटतं. एवढंच नाही तर कुणाल कामराने उत्तर म्हणून दाखल केलेलं प्रतिज्ञापत्रही चर्चेचा विषय ठरतं आहे. आपल्या देशात जे दिग्गज लोक आहेत किंवा दिग्गज संस्था […]

Mumbaitak
follow google news

कॉमेडियन कुणाल कामराने सुप्रीम कोर्टाची माफी मागण्यास सपशेल नकार दिला आहे. मी जे काही ट्विट केले होते आणि त्या विरोधात ज्यांनी याचिका दाखल केली होती त्या याचिकाकर्त्यांना विनोदबुद्धी नाही असं मला वाटतं. एवढंच नाही तर कुणाल कामराने उत्तर म्हणून दाखल केलेलं प्रतिज्ञापत्रही चर्चेचा विषय ठरतं आहे. आपल्या देशात जे दिग्गज लोक आहेत किंवा दिग्गज संस्था आहेत त्यांनी टीका, टिपण्णी सहन करणं सुरु ठेवलं नाही तर आपला देश हा बंदी कलाकरांचा आणि पाळीव कुत्र्यासारखा होईल असंही कुणाल कामराने म्हटलं आहे.

हे वाचलं का?

काय आहे कुणाल कामराचं प्रतिज्ञापत्र?

“मला असं वाटतं की आपल्या देशात असहिष्णुतेची संस्कृती वाढीला लागली आहे. या संस्कृतीत विरोध करणं हा आपला मूलभूत हक्क आहे असं अनेकांना वाटू लागलं आहे. कुठल्याही गोष्टीला विरोध दर्शवणं हा बंद दारांच्या आडचा प्रत्येकाचा आवडता राष्ट्रीय खेळ होऊ लागला आहे. आम्ही साक्षीदार आहोत भाषण स्वातंत्र्याच्या कशा चिंध्या उडवत मुन्नवर फारुकीसारख्या कॉमेडियनला काय वागणूक देण्यात आली त्याचे. मला असं वाटू लागलं आहे की कोर्टाने आता भाषण स्वातंत्र्य काढून घेतलं पाहिजे आणि तुमच्या बोलण्याला विरोधच कसा योग्य आहे आणि तोच कसा हक्क आहे हे सांगितलं पाहिजे. जर देशातल्या दिग्गज संस्था आणि माणसांनी टीका सहन करण्याची क्षमता ठेवली नाही तर हा देश बेड्या घातलेल्या कलाकारांचा आणि पाळीव कुत्र्यासारखा होईल. जर सुप्रीम कोर्टाला हे वाटत असेल की माझ्या मर्यादा ओलांडल्या आहेत आणि त्यांना माझं इंटरनेट बंद करायचं ठरवलं तर मी सुद्धा दर 15 ऑगस्टला सुद्धा तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणारं ग्रिटिंग पाठवेन अगदी माझ्या काश्मिरी मित्रांना पाठवतो तसंच. मला असं मुळीच वाटत नाही एखाद्या न्यायसंस्थेला किंवा न्यायाधीशांना विनोदांपासून संरक्षण हवं आहे. मी केलेले विनोद हे काही वास्तविक नाहीत, ते विनोद आहेत. अनेक लोक अशा विनोदांवर, जोक्सवर प्रतिक्रिया देत नाहीत. ज्यांना माझे विनोद ऐकून हसू येत नाही ते त्याकडे दुर्लक्ष करतात. जसं सत्ताधारी पक्ष विरोधकांकडे दुर्लक्ष करतो अगदी तसंच. एका विनोदाचं आयुष्य असतंच किती? न्यायाधीश, न्यायसंस्था यांनी आपली कामं सोडून विनोदांकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही.” या आशयाचं एक प्रतिज्ञापत्र कुणाल कामराने कोर्टात दाखल केलं आहे आणि माफी मागण्यास सपशेल नकार दिला आहे.

काय आहे प्रकरण?

कॉमेडियन कुणाल कामराने आपल्या ट्विट्समधून सुप्रीम कोर्टाचा अपमान केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात काही याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने त्याला कारणे दाखवा नोटीसही बजावली होती. रिपब्लिकचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी याना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिल्यानंतर कुणाल कामराने न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्यावर टीका करणारं एक ट्विट केलं होतं. तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्याधीशांविषयीही एक वादग्रस्त ट्विट केलं होतं. त्यावरून हा सगळा वाद निर्माण झाला. आता मात्र कुणाल कामराने आपण माफी मागणार नाही अशी भूमिका घेतली आहे. तसंच याचिकाकर्त्यांचीच खिल्ली उडवणारं प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे.

    follow whatsapp