लखीमपूर खीरी हिंसा : प्रियंका गांधी नजरकैदेत; सरकारकडून विरोधकांची नाकेबंदी

मुंबई तक

• 03:51 AM • 04 Oct 2021

लखीमपूर खीरी हिंसाचाराने उत्तर प्रदेशातील वातावरण ढवळून निघालं आहे. आंदोलक शेतकरी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यात रविवारी झालेल्या संघर्षात 8 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. आशिष मिश्राने शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप करण्यात आला असून, गुन्हाही दाखल झाला आहे. दरम्यान, आज काँग्रेसच्या महासचिव लखीमपूर खीरीला भेट देणार आहे. त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला. तर […]

Mumbaitak
follow google news

लखीमपूर खीरी हिंसाचाराने उत्तर प्रदेशातील वातावरण ढवळून निघालं आहे. आंदोलक शेतकरी आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यात रविवारी झालेल्या संघर्षात 8 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. आशिष मिश्राने शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप करण्यात आला असून, गुन्हाही दाखल झाला आहे. दरम्यान, आज काँग्रेसच्या महासचिव लखीमपूर खीरीला भेट देणार आहे. त्यांना रोखण्याचा प्रयत्न झाला. तर पंजाब आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना विमानतळावर उतरू न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

लखीमपूर खीरीमध्ये झालेल्या हिंसाचारात आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून, या प्रकरणात अखेर केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी हिंसाचारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेणार होत्या.

प्रियंका गांधी लखीमपूरच्या दिशेनं रवाना झाल्यानंतर त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी हरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोखलं. त्यानंतर त्यांना सीतापूर जिल्ह्यातील विश्रामगृहावर नेण्यात आलं असून, नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे.

दुसरीकडे पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी लखीमपूर खीरीला भेट देणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या घोषणेनंतर उत्तर प्रदेश सरकारने उत्तराखंड आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या विमानांना लँडिंग करण्यास परवानगी न देण्याचे आदेश लखनऊ विमानतळाच्या संचालकांना देण्यात आले आहेत.

दुसरीकडे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्या घराबाहेरही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अखिलेश यादव हे लखीमपूर खीरीला भेट देणार आहेत. त्याआधीच त्यांच्या विक्रमादित्य मार्गावरील निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येनं पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

लखीमपूर हिंसाचार : माझा मुलगा घटनास्थळी नव्हताच – केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनींचं स्पष्टीकरण

रविवारी काय झालं?

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी भागातील तिकुनिया परिसरात रविवारी हिंसाचाराची घटना घडली. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांच्या विरोधात संयुक्त किसान मोर्चाचे शेतकरी निदर्शनं करत होते. यावेळी झालेल्या हिंसाचारात 8 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. निदर्शनं करत असलेल्या शेतकऱ्यांना केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा टेनीने गाडीखाली चिरडल्याचा आणि गोळीबार केल्याचा दावा किसान मोर्चानं केला आहे.

लखीमपूर हिंसा : मृतांचा आकडा आठ वर,
केंद्रीय मंत्र्याच्या मुलावर गंभीर आरोप

किसान मोर्चानं केलेला दावा केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनी फेटाळून लावला आहे. माझा मुलगा आशिष मिश्रा टेनी सकाळी ११ वाजल्यापासून कार्यक्रमाचा समारोप होईपर्यंत कार्यक्रमाच्या ठिकाणीच होता. काही समाजकंटकांनी आमच्या कार्यकर्त्यांवर हल्ला करून 4-5 जणांची हत्या केल्याचा आरोप अजय मिश्रा टेनी यांनी केला आहे.

    follow whatsapp