लातूर: अजूनही खऱ्याची दुनिया आहे… तब्बल 10 तोळे सोने परत करणारा रिक्षाचालक!

मुंबई तक

• 01:46 PM • 01 Dec 2021

सुनील कांबळे, लातूर आजच्या जमान्यात 10 तोळे सोने सापडलं तर कोण नाही म्हणेल? पण लातूर जिल्ह्यातील उदगीर इथं एका रिक्षाचालकाने तब्बल 10 तोळे सोने असलेली बॅग मूळ मालक असलेल्या महिलेस परत करून प्रामाणिकपणाच दर्शन घडवलं आहे. एवढंच नव्हे तर अजूनही खऱ्याची दुनिया आहे हे त्याच्या कृतीतून दिसून आलं आहे. शेख खदिर महंमद रफिक असं या […]

Mumbaitak
follow google news

सुनील कांबळे, लातूर

हे वाचलं का?

आजच्या जमान्यात 10 तोळे सोने सापडलं तर कोण नाही म्हणेल? पण लातूर जिल्ह्यातील उदगीर इथं एका रिक्षाचालकाने तब्बल 10 तोळे सोने असलेली बॅग मूळ मालक असलेल्या महिलेस परत करून प्रामाणिकपणाच दर्शन घडवलं आहे. एवढंच नव्हे तर अजूनही खऱ्याची दुनिया आहे हे त्याच्या कृतीतून दिसून आलं आहे. शेख खदिर महंमद रफिक असं या प्रामाणिक रिक्षाचालकाचं नाव आहे.

उदगीर तालुक्यातील मोघा इथल्या रहिवासी असलेल्या संध्या बालाजी पाटील ही महिला उदगीर शहरातील चौबारा येथे रिक्षा क्रमांक MH-24-J-1541 या रिक्षात बसून उमा चौकात गेली होती. रिक्षाचालक प्रवाशी महिलेला सोडून गेला. पण याचवेळी संध्या आपली 10 तोळे सोने असलेली बॅग रिक्षातच विसरली.

दहा तोळे सोने असलेली बॅग आपण रिक्षातच विसरलो आहोत ही बाब महिलेच्या लक्षात आली तेव्हा तिने तात्काळ उदगीर शहर पोलीस  स्टेशन येथे धाव घेऊन घडलेली घटना पोलिसांना सांगितली.

दरम्यान उदगीर पोलिसांनी तात्काळ उमा चौकातील सीसीटीव्ही फुटेज तपास करुन रिक्षाचा शोध घेतला. दुसरीकडे रिक्षाचालकाला जेव्हा त्याच्या रिक्षात सोन्याने भरलेली बॅग सापडली तेव्हा तो देखील पोलीस ठाण्यातच जाण्यास निघाला.

याचवेळी महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी संबंधित रिक्षाचा शोध सुरु केला असता त्यांना ही रिक्षा शेख खदिर महंमद रफिक याची असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे उदगीर पोलीस ठाण्याचे एक पोलीस हेडकॉन्सटेबल रिक्षाचालकाच्या घराकडे निघाले. त्याच वेळी रिक्षा चालक ती बॅग घेवून पोलीस स्टेशनला निघाला होता. त्यामुळे त्याने तात्काळ ती बॅग पोलिसांना दिली.

दरम्यान, या बाबतची सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर दहा तोळे सोन्यासह बॅग संबंधित महिलेस परत देण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व पोलीस बांधवांनी प्रामाणिक रिक्षाचालकांचा सत्कारही केला.

उच्चभ्रू ‘लोढा’ सोसायटीतील घर फोडून चोरट्यांनी तब्बल साडेचार लाखांचे दागिने पळवले!

सध्याच्या काळात सोन्याचे दर हे गगनाला भिडले आहेत. त्यामुळे दहा तोळे सोने लंपास करुन लाखो रुपयांची कमाई सहजपणे रिक्षाचालकाला करता आली असती. पण अशा परिस्थितीत देखील रिक्षाचालकाने कोणताही मोह न दाखवता सोन्याचे दागिने परत करण्याचा प्रामाणिकपणा दाखवून समाजासमोर एक मोठा आदर्श ठेवला आहे. त्यामुळेच या प्रामणिक रिक्षाचालकाचं आज सर्वत्र कौतुक होत आहे.

    follow whatsapp