Amravati Crime News, धनंजय साबळे : अमरावती जिल्ह्यात हॅनी ट्रॅपच्या माध्यमातून एका 64 वर्षीय शेतकऱ्याला आपल्या जाळ्यात ओढून तब्बल 70 लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका मोबाईल रिचार्जच्या दुकानात झालेल्या साध्या ओळखीचे रूपांतर आधी मैत्रीत आणि नंतर आर्थिक शोषणात झाले. एका किरकोळ 10 हजार रुपयांच्या व्यवहारापासून सुरू झालेला हा प्रवास ब्लॅकमेलिंगच्या अशा चक्रव्यूहात अडकला, जिथे पीडित शेतकरी गेल्या चार वर्षांपासून आर्थिक आणि मानसिक छळाला सामोरा जात होता. आरोपी पती-पत्नीने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने शेतकऱ्याचा विश्वास संपादन केला आणि नंतर त्याला बदनामीच्या छायेत ढकलून लाखो रुपयांची खंडणी वसूल केली. या प्रकरणी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण जिल्ह्यात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : डोंबिवलीतील तरुण मित्रांसोबत इर्शाळवाडी ट्रेकला गेला, पण घरी डेथ बॉडी परतली, काय घडलं?
स्पाई कॅमेरा आणि बलात्कार केसची धमकी; 4 वर्षे चालला ब्लॅकमेलिंगचा खेळ
या प्रकरणाची सुरुवात एका मोबाईल शॉपवर झाली, जिथे शेतकऱ्याचे येणे-जाणे वाढले होते. दुकानदाराच्या पत्नीने आधी शेतकऱ्याशी जवळीक निर्माण केली आणि त्यानंतर तिच्या पतीने 10 हजार रुपये उसने मागून वेळेवर परत करत त्यांचा विश्वास जिंकला. मात्र, काही काळानंतर या नात्याचा वापर शस्त्रासारखा करण्यात आला. आरोपी पतीने शेतकऱ्याला धमकावण्यास सुरुवात केली की, दुकानात लावलेल्या स्पाई कॅमेऱ्यामध्ये सर्व हालचाली रेकॉर्ड आहेत आणि त्यांच्याकडे कॉल रेकॉर्डिंगसह सर्व चॅट्स उपलब्ध आहेत. हे पुरावे समाज आणि कुटुंबासमोर आणून बदनामी करण्याची तसेच बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देण्यात आली. सामाजिक प्रतिष्ठेला जपण्याच्या भीतीने शेतकरी पूर्णपणे या दांपत्याच्या दबावाखाली आला आणि तिथूनच मोठ्या वसुलीला सुरुवात झाली.
हेही वाचा : 'तुझी बहीण जिवंत जाणार नाही..' लग्नानंतर चारच दिवसांत सासूची धमकी, भाऊ पोहोचेपर्यंत...
1 लाखापासून 70 लाखांपर्यंत वसुली; शेतकऱ्याला आले आत्महत्येचे विचार
नोव्हेंबर 2020 पासून सुरू झालेला हा वसुलीचा क्रम नोव्हेंबर 2024 पर्यंत अविरत सुरू होता. सुरुवातीला 1 लाख रुपयांची मागणी करण्यात आली, ज्याचा पहिला चेक 3 डिसेंबर 2020 रोजी वठवण्यात आला. त्यानंतर 1 लाख, 2 लाख आणि एकदा थेट 10 लाख रुपयांचे चेक आरोपींनी घेतले. याशिवाय 50 हजार ते 2 लाख रुपयांच्या विविध हप्त्यांमध्ये रोख रक्कमही उकळण्यात आली. अशा प्रकारे गेल्या चार वर्षात या दाम्पत्याने शेतकऱ्याकडून तब्बल 70 लाख रुपये वसूल केले. सततच्या धमक्यांमुळे आणि आर्थिक शोषणाने हा शेतकरी पूर्णपणे मानसिकरित्या खचून गेला होता. बदनामीच्या धास्तीने कोणाचीही मदत घेऊ न शकल्याने त्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचे विचारही येऊ लागले होते, मात्र एका ओळखीच्या व्यक्तीने धीर दिल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
नांदगाव पेठ पोलिसांत गुन्हा दाखल; आरोपींच्या अटकेसाठी पथके रवाना
पीडित शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून नांदगाव पेठ पोलिसांनी आरोपी पती-पत्नीविरुद्ध खंडणी, फसवणूक आणि धमकी देणे अशा गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांनी वसुलीसाठी वापरलेले चेक आणि इतर तांत्रिक पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. सध्या हे दोन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे अधिकारी दिनेश दहातोंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना पकडण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल. हा प्रकार डिजिटल युगातील हॅनी ट्रॅपचा एक नवा आणि भीषण चेहरा असून, स्पाई कॅमेरा आणि कॉल रेकॉर्डिंगचा वापर करून कशा प्रकारे गुन्हेगारी कट रचला जातो, हे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
निदा खानला आश्रय देणं महागात, नगरसेवक मतीन पटेलांच्या घरावर बुलडोझर कारवाई, नेमकं काय घडलं?
ADVERTISEMENT











