'तुझी बहीण जिवंत जाणार नाही..' लग्नानंतर चारच दिवसांत सासूची धमकी, भाऊ पोहोचेपर्यंत...
लग्नानंतर अवघ्या चार दिवसांत एका 23 वर्षीय नवविवाहितेचा हुंड्यासाठी बळी घेण्यात आला. धक्कादायक म्हणजे तिच्या माहेरच्या लोकांना न सांगताच नवविवाहितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तुझी बहीण जिवंत जाणार नाही..
सासूची धमकी
भाऊ पोहोचेपर्यंत झालं होत्याचं नव्हतं
Crime News : बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे, जिथे लग्नानंतर अवघ्या चार दिवसांत एका 23 वर्षीय नवविवाहितेचा हुंड्यासाठी बळी घेण्यात आला. जगदीशपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिलापूर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. संजू कुमारी असे मृत तरुणीचे नाव असून, ती बक्सर जिल्ह्यातील रहिवासी होती. 7 मे रोजी तिचा विवाह विनोद पाल याच्याशी झाला होता. मात्र, सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या संजूचा अवघ्या काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी छळ करून अंत केला.
'तिचे प्रेतच बाहेर पडेल'
या घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे संजूच्या सासूने दिलेली उघड धमकी. संजूचा भाऊ शिवम पाल याच्या सांगण्यानुसार, 13 मे रोजी संजू पहिल्यांदाच आपल्या माहेरी परतणार होती. 11 मेच्या रात्री जेव्हा शिवम आपल्या बहिणीच्या पाठवणीबाबत सासरच्यांशी फोनवरून बोलत होता, तेव्हा सासूने फोनवर ओरडत धमकी दिली की, "तुझी बहीण या घरातून जिवंत जाणार नाही, आता तिचे प्रेतच बाहेर पडेल." ही धमकी ऐकत असतानाच शिवमला फोनवर संजूच्या ओरडण्याचा आवाज आला आणि त्यानंतर फोन कट झाला.
हे ही वाचा : निदा खानला आश्रय देणं महागात, नगरसेवक मतीन पटेलांच्या घरावर बुलडोझर कारवाई, नेमकं काय घडलं?
सोन्याच्या चैनीसाठी छळ
मृत संजूच्या कुटुंबियांनी असा आरोप केला आहे की, लग्नात 4 लाख रुपये रोख, दुचाकी, फ्रीज आणि दागिने देऊनही पती विनोद पाल सोन्याच्या चैनसाठी संजूचा छळ करत होता. तिला माहेरच्या लोकांशी बोलण्याचीही परवानगी नव्हती. पती, सासू, सासरे आणि नणंद मिळून तिला टोमणे मारत आणि मारहाण करत असत. 11 मेच्या रात्री संजूची गळा आवळून हत्या करण्यात आली आणि हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी सासरच्यांनी रात्रीच्या अंधारातच तिचा मृतदेह स्मशानभूमीत नेऊन जाळून टाकला.
हे ही वाचा : सासरच्यांनी केला जीन्स घालायला विरोध, सुनेनं केलं नको ते
चिता विझत आली अन्..
जेव्हा शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली, तेव्हा कुठे मुलीच्या माहेरच्यांना या प्रकाराचा सुगावा लागला. 12 मे रोजी संजूचा भाऊ जेव्हा पिलापूर गावात पोहोचला, तेव्हा स्मशानातील चिता जवळपास विझत आली होती; तिथे केवळ कवटी आणि पायाचे काही अवशेष उरले होते. संजूच्या सासरी पोहोचल्यावर घराला कुलूप होते आणि संपूर्ण कुटुंब फरार झाले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. अवघ्या चार दिवसांत एका तरुणीचा असा अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.









