भाजप-मनसे युतीच्या मार्गातील ‘तो’ मोठा अडसर दूर?; राज ठाकरेंनी सभेतच सांगितलं

मुंबई तक

• 02:19 AM • 28 Nov 2022

शिवसेना फुटल्यानंतर भाजप सोबत ठाकरे ब्रॅण्ड असावा म्हणून मनसेला सोबत घेऊ शकते अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, परप्रांतियाबद्दल मनसेच्या भूमिकेवर बोट ठेवत भाजपकडून कायम मनसे सोबतच्या युतीच्या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, राज ठाकरेंनी आज झालेल्या मेळाव्यात मनसेच्या परप्रांतियांबद्दल उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नावर भूमिका स्पष्ट केली. ठाकरेंनी गुजरात भाजपचंच उदाहरण देत […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

शिवसेना फुटल्यानंतर भाजप सोबत ठाकरे ब्रॅण्ड असावा म्हणून मनसेला सोबत घेऊ शकते अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. मात्र, परप्रांतियाबद्दल मनसेच्या भूमिकेवर बोट ठेवत भाजपकडून कायम मनसे सोबतच्या युतीच्या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान, राज ठाकरेंनी आज झालेल्या मेळाव्यात मनसेच्या परप्रांतियांबद्दल उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नावर भूमिका स्पष्ट केली. ठाकरेंनी गुजरात भाजपचंच उदाहरण देत अप्रत्यक्षपणे युतीच्या मार्गातील मोठा अडसर दूर केलाय.

हे वाचलं का?

भाजप-मनसे युती होण्यात महत्त्वाचा मुद्दा आड येतो तो म्हणजे मनसेची परप्रांतियांबद्दल असलेली भूमिका! भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांनी हाच मुद्दा वारंवार अधोरेखित करत अप्रत्यक्षपणे हाच युती होण्यातला अडथळा असल्याची भूमिका घेतलेली आहे.

गोरेगावच्या सभेत राज ठाकरेंनी याच मुद्द्याला हात घातला आणि आमचा परप्रांतीयांना विरोध नसल्याचं सांगितलं. महत्वाचं म्हणजे राज ठाकरे यांनी गुजरात भाजपाने घेतलेल्या भूमिकेचाही दाखला दिलाय.

राज्यपाल, भाजप, काँग्रेस, उद्धव ठाकरे ते शिंदे गट : राज यांनी घेतला ‘ठाकरे’ शैलीत समाचार

राज ठाकरे गटाध्यक्षांच्या मेळाव्यात काय म्हणाले?

गटाध्यक्षांना संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले, “काही गोष्टी मुद्दामहून सांगण आवश्यक आहे. मनसेची स्थापना करून 16-17 वर्ष झाली. या काळात ज्या भूमिका घेतल्या. आंदोलनं केली, त्याचा यशस्वी होण्याचा रेट काढला, तर इतर पक्षांच्या आंदोलनापेक्षा आपल्या आंदोलनाला जास्त आलंय”, असा मुद्दा राज ठाकरेंनी मांडलां.

परप्रांतियांच्या मुद्द्यावर राज ठाकरे काय म्हणाले?

“16 वर्षात केलेल्या आणि यशस्वी झालेल्या आंदोलनाची पुस्तिका काढणार आहे. रेल्वेचं आंदोलन असेल… पुढे त्याला काय दिशा दिली गेली. महाराष्ट्रातल्या तरुण-तरुणींना नोकऱ्या आहेत, हे समजणार नाही. महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रात जाहिराती नाही, हे कोणतं राज्य स्वीकारेल. त्याला दिशा दिली गेली की यूपी बिहार विरुद्धचं आंदोलन.”

“ज्यावेळी ते लोक रेल्वे स्टेशनवर झोपले होते, त्यावेळी मनसेच्या लोकांनी जाऊन विचारलेलं की, कशासाठी आला आहात. तिथे मनसे सैनिकांना आईवरून शिवी दिली गेली आणि त्यानंतर जे घडलं, तो पुढचा हंगामा. हिंदी वृत्तवाहिन्यांनी रान उठवलं”, असं राज ठाकरे म्हणाले.

“आजही त्यांना उचक्या येतात. गमंत बघा. बाजूच्या राज्यात… गुजरातमध्ये कल्पेश ठाकूर काँग्रेसचा आमदार होता. एका मुलीवर बलात्कार झाल्यानंतर त्यानं आंदोलन केलं. परप्रांतीय लोकांना मारलं. 20 हजार यूपी बिहारच्या लोकांना हाकलून दिलं. 2019 मध्ये त्याच कल्पेश ठाकूर भाजपनं उमेदवारी दिली”, असं सांगत ठाकरेंनी आपला विरोध परप्रांतीय लोकांना नसल्याची स्पष्ट भूमिका मांडली.

“राज ठाकरेने आणि महाराष्ट्र सैनिकांनी एखादी गोष्ट केली की, सतत चालू ठेवायचं. ते महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी केलेलं आंदोलन होतं. देश फोडायचं आंदोलन नव्हतं. भूमिका समजून न घेता बदनाम करायचं. त्या भूमिका लोकांपर्यंत जायला हव्यात. ते पोहोचवणारे गटाध्यक्ष आहेत”, असं म्हणत राज ठाकरेंनी परप्रांतियाबद्दल विरोध नसल्याचं स्पष्ट केलं.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते यांच्या भेटीगाठी गेल्या वर्षभरात वाढल्या आहेत. सरकार बहुमतावेळी राज ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला. इतकंच नाही तर राज ठाकरेंनी केलेल्या आवाहनानंतर अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीतून माघारही घेतली. मात्र भाजपकडून युतीच्या मुद्द्यावर परप्रांतीय मुद्दा समोर करण्यात आला. आता राज ठाकरेंनी आपला परप्रांतीय लोकांना विरोध नसल्याची भूमिका मांडल्याने युतीच्या मार्गात अडचणीचा ठरणारा मुद्दा निकाली निघाला आहे.

    follow whatsapp