केंद्र सरकार काही संस्थांचा गैरवापर करण्याचा प्रयत्न सातत्याने करतं आहे. NCB, CBI, ED यांचा वापर राजकीय दृष्टीने केला जातो आहे हे सातत्याने दिसून येतं आहे असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांंनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर त्यावेळी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी असलेल्या परमबीर सिंग यांनी काही आरोप केले होते. परमबीर सिंग यांनी जे आरोप केले आणि त्यातून जे वातावरण निर्माण केलं गेलं त्यामुळे अनिल देशमुख यांचा राजीनामा द्यावा लागला. एक जबाबदार अधिकारी असे बेछूट आरोप करतो असं कधी घडलं नाही. आता परमबीर सिंग कुठे आहेत? अनिल देशमुख यांनी तातडीने राजीनामा दिला. पण परमबीर सिंगांचं काय? त्यांच्यावर किती आरोप झाले असाही प्रश्न शरद पवार यांनी विचारला.
अनिल देशमुखांनी सत्ता सोडली मात्र परमबीर सिंग गायब झाले हे चित्र आपल्याला बघायला मिळतं. अनिल देशमुख यांच्या घरी काल पाचव्यांदा छापा मारला. एकाच घरात पाचवेळा जाऊन काय मिळतं हे माहित नाही पण त्यांनी विक्रम केला हे मान्य केलं पाहिजे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. याचा विचार नागरिकांनीही करण्याची गरज आहे.
ED, NCB, IT, CBI या सगळ्या संस्थांचा वापर काही विशिष्ट लोकांना आणि काही पक्षांना जाणीवपूर्वक टार्गेट केलं जातं आहे. समीर वानखेडे यांच्याबद्दल काही कथा ऐकायला मिळाल्या ते NCB च्या आधी कस्टम विभागात काम करत होते. ड्रग्जचं प्रकरण त्यांनी बाहेर काढलं त्यावेळी मी त्यांची माहिती काढली त्यावेळी मी कथा ऐकल्या आहेत. त्याचे तपशील न सापडल्याने मी त्यावर भाष्य करणार नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. जसं NCB आहे तसाच मुंबई पोलिसांचाही अंमली पदार्थ प्रतिबंधक विभाग आहे. मात्र दोन्ही संस्थांच्या कामांचा आढावा घेतल्यावर लक्षात येतं की NCB ने केलेली कारवाई ही क्षुल्लक आहे. त्या तुलनेत मुंबई पोलिसांनी चांगली कामगिरी केली आहे असंही शरद पवार म्हणाले.
आर्यन खानला ताब्यात घेणारे के.पी. गोसावी कोण?
आर्यन खान प्रकरणात कुणीतरी के.पी. गोसावी हे कुठे आहेत? गेल्या काही दिवसांपासून सापडत नाहीत. असा माणूस पंच कसा काय असू शकतो? त्यावरून त्यांचं कॅरेक्टर संशयास्पद दिसून येतं. NCB च्या अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल असलेल्या फरार असलेल्या के.पी. गोसावी यांची निवड कशी काय केली हा प्रश्न आहेच.
ADVERTISEMENT