बापरे! वसईत भात गिरणी मालकाला ८० कोटींचं वीज बिल

मुंबई तक

• 01:45 AM • 24 Feb 2021

वसईतील निर्मळ परिसरात असलेल्या एका भात गिरणी मालकाला दोन महिन्यांचं वीज बिल ८० कोटी रूपये इतके आले आहे. एवढ्या भरमसाठ रकमेचे बिल हाती आल्याने गिरणी मालकाला जबर धक्का बसला आहे. चुकीच्या नोंदींमुळे हे वाढीव बिल आल्याचा आरोप गिरणी मालकाने केला आहे. गणपत नाईक असं या भात गिरणी मालकाचं नाव आहे. त्यांना आलेल्या ८० कोटींच्या बिलावर […]

Mumbaitak
follow google news

वसईतील निर्मळ परिसरात असलेल्या एका भात गिरणी मालकाला दोन महिन्यांचं वीज बिल ८० कोटी रूपये इतके आले आहे. एवढ्या भरमसाठ रकमेचे बिल हाती आल्याने गिरणी मालकाला जबर धक्का बसला आहे. चुकीच्या नोंदींमुळे हे वाढीव बिल आल्याचा आरोप गिरणी मालकाने केला आहे. गणपत नाईक असं या भात गिरणी मालकाचं नाव आहे. त्यांना आलेल्या ८० कोटींच्या बिलावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी हे झोपेत बिल पाठवतात का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

हे वाचलं का?

८१ वर्षीय गणपत नाईक हे गेल्या २० वर्षांपासून भात गिरणीचा व्यवसाय चालवतात. त्यांचा मुलगा सतीश याचा दोन महिन्यापूर्वी मृत्यू झाला. भात गिरणीतले वीज मीटर हे मुलाच्या नावे आहे. मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यातून कसंतरी सावरत असतानाच ८० कोटींचं बिल पाठवून महावितरणने गणपत नाईक यांना नवा धसका दिला आहे. गणपत नाईक यांना ८० कोटी १३ लाख ८९ हजार ६०० रुपयांचे बिल महावितरणने पाठवले आहे. यामुळे नाईक यांना चांगलाच धक्का बसला आहे.

एकीकडे कामगार मिळत नाहीत तर दुसरीकडे भात पिकाचे नुकसान होतं आहे. या सगळ्याला कंटाळून गणपत नाईक यांनी भात गिरणी बंदच ठेवली आहे. तरीही एवढ्या मोठ्या रकमेचे बिल आल्याने हे कुटुंब प्रचंड तणावात आहे.

“वीज बिल पाहिल्यानंतर मला धक्काच बसला. आधी कुणीतरी सांगितलं ८ लाखांचं बिल आहे, मग वाटलं ८ कोटींचं बिल पाठवलं आहे त्यानंतर बिल नीट पाहिल्यावर कळलं की ८० कोटींचं बिल आलं आहे. ते पाहून मला घामच फुटला एवढ्या मोठ्या रकमेचं बिल कसं काय पाठवलं? असा प्रश्न मला पडला. मला धक्का बसून काही झालं असतं तर त्याची जबाबदारी कुणी घेतली असती?” असाही प्रश्न गणपत नाईक यांनी विचारला आहे. महावितरणच्या हलगर्जीपणामुळे एवढं बिल मला आलं आहे असंही गणपत नाईक यांनी स्पष्ट केलं.

आमच्या कुटुंबाला हे बिल आल्याचा मानसिक त्रास प्रचंड मोठ्या प्रमाणावर झाला. माझे सासरे वयस्कर आहेत. बिल आल्यानंतर ते दुपारभर सगळी बिलं चाळत बसले होते, आपण वीजेचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणावर केला नसताना इतकं भरमसाठ रकमेचं बिल कसं काय आलं याचीच माझे सासरे चिंता करत होते. त्यांना शेवटी संध्याकाळी दवाखान्यात घेऊन जावं लागलं त्यांना काही झालं असतं तर कुणी जबाबदारी घेतली असती? असा प्रश्न गणपत नाईक यांची सून प्रतिभा नाईक यांनी विचारला आहे.

    follow whatsapp