योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर
ADVERTISEMENT
आजचा दिवस दोन बातम्यांनी गाजला पहिली बातमी होती आर्यन खानला भेटायला शाहरुख खान आर्थर रोड तुरुंगात जाऊन आला ती. दुसरी बातमी होती ती नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर केलेल्या आरोपांची. समीर वानखेडे यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आज नवाब मलिक यांनी काही गंभीर आरोप केले. अर्थात हे आरोप समीर वानखेडेंनी फेटाळून लावले. मात्र त्यांचं मावळ येथील एक भाषणही समोर आलं. ज्यामध्ये समीर वानखेडेंना तुरुंगात टाकणार असा इशाराच त्यांनी दिला.
आता या सगळ्याबाबत महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यांनी दिलेलं उत्तर महत्त्वाचं आहे. दिलीप वळसे पाटील म्हणाले, ‘समीर वानखेडे यांची चौकशी करण्याचा काही प्रश्नच येत नाही. ते ज्या खात्यासाठी काम करत आहेत ते केंद्राच्या अखत्यारीत येतं. नवाब मलिक हे त्यांच्याबाबत नेमकं काय म्हणाले हे मी ऐकलेलं नाही. तसंच नवाब मलिक यांनी कोणतेही पुरावे माझ्याकडे दिलेले नाहीत. मी त्यांच्याकडून माहिती घेईन. सध्या माझ्याकडे काही माहिती नाही. मात्र समीर वानखेडेंची चौकशी करण्याचा प्रश्न नाही.’
काय आरोप केले होते नवाब मलिक यांनी?
‘सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणानंतर समीर वानखेडे यांना NCB मध्ये आणण्यात आलं. त्यानंतर ते सातत्याने बॉलिवूडच्या मागे लागले आहेत. कोरोना काळात जेव्हा अख्खं बॉलिवूड मालदिवमध्ये होतं तेव्हाच समीर वानखेडेही तिथे होते. त्यांचे कुटुंबीय होते. समीर वानखेडे तिथे खंडणी वसुलीसाठी गेले होते.
समीर वानखेडे हे दुबईला का गेले होते याचं उत्तर त्यांनी द्यावं. त्यांनी आर्यन खान विरोधात उभी केलेली केस हा बनाव आहे. जाणीवपूर्वक बॉलिवूडला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम केलं जातं आहे’ असे आरोप नवाब मलिक यांनी केले होते.
Aryan Khan bail : आर्यन खानला जामीन नाकारल्यानंतर समीर वानखेडे म्हणाले…
या आरोपांना आता समीर वानखेडे यांनी उत्तर दिले आहे. मुंबई तकचे प्रतिनिधी दिव्येश सिंह यांनी समीर वानखेडे यांना फोन केला आणि नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांविषयी विचारलं. तेव्हा नवाब मलिक यांनी केलेले सगळे आरोप खोटे आहेत आणि आपण या विरोधात कायदेशीर कारवाई करणार आहोत असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
